
एकाच वैचारिक मुशीत घडलेले दोन शीर्षस्थ नेते गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर नागपुरात एकत्र येत आहेत; निमित्त आहे दृष्टिहीनांना प्रकाशवाट दाखवण्याच्या सेवाप्रकल्पाच्या उद्घाटनाचे! देशहित हेच सर्वोपरी असल्याचे सांगणाऱ्या या दोघांच्याही संघटनांची वाटचाल सुरु झाली ती प्रतिकूल वातावरणातून. कमालीच्या उपेक्षेचे खडक फोडत आज दोन्ही संघटना अशा काही विस्तारल्या आहेत की त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात सर्वोच्च झाल्या आहेत. या दोन संघटना म्हणजे संघ आणि भाजप त्यांचे अनुयायी जेवढे कडवे तेवढेच त्यांचे टीकाकारही ! भारताच्या कानाकोपऱ्यात जसा संघाने विस्तार केला तसाच जीवनाच्या सर्व क्षेत्रांनाही स्पर्श केला. कामगार क्षेत्र असेल, विद्यार्थी वर्ग असेल किंवा जंगलकपारीतले आदिवासी; भारताच्या उत्कर्षासाठी झटणाऱ्या या संघटनेचा ‘परिवार’ विस्तारत गेला. ही निखळ सांस्कृतिक संघटना आहे, असा दावा केला जात असला तरी संघ परिवाराच्या प्रेरणेनेच आधी जनसंघ आणि नंतर भारतीय जनता पक्ष यांनी वाटचाल सुरू केली आणि हा परिवारच राजकारणात भारतीय जनता पक्षाला ऊर्जा देत आला आहे.