
महाराष्ट्राच्या तुलनेत सध्या राजधानी दिल्लीमधील हवामान थंड आहे. या थंड हवामानात साहित्य संमेलनाचे आयोजन करताना मुबलक ‘ऊब’ मिळावी म्हणून अ.भा. मराठी साहित्य महामंडळाने राजकीय वर्गाचे वर्चस्व स्वेच्छेनेच ओढवून घेतले होते. त्यामुळे साहित्य संमेलनात राजकीय वादाचे प्रतिबिंब उमटले नसते तरच नवल. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरील ‘असे घडलो आम्ही’ या संवादाच्या कार्यक्रमात डॉ. नीलम गोऱ्हे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत असतानाचा अनुभव सांगताना तिथे ‘दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळते’, असे सांगून खळबळ उडवून दिली. त्याच मंडपात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची व माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचीही मुलाखत झाली. ‘‘आपल्या प्रतिभेला आणि राजकीय कर्तृत्वाला हवा तसा न्याय मिळाला नाही,’’ अशी खंत पदावरून दूर झालेल्या प्रत्येकच राजकीय नेत्याच्या मनात असते.