
सहनशक्तीचा कडेलोट झाल्यावर कोणीही चवताळून उठते. भारताने पाकिस्तानवर केलेला प्रत्याघात तसाच असला तरी ही कारवाई दिशाहीन नाही आणि त्याचे स्वरूप नुसतेच भावनोद्रेकाचे नाही, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. एका जबाबदार राष्ट्राने आपल्या लोकांच्या, मातृभूमीच्या संरक्षणासाठी अतिशय विचारपूर्वक उचललेले हे पाऊल आहे. पहलगाम येथे पर्यटनासाठी गेलेल्या निरपराध व्यक्तींना ज्या निर्घृणपणे ठार मारले गेले, तो हल्ला केवळ त्या कुटुंबांवर नव्हता. त्या हल्ल्याने प्रत्येक भारतवासीय हळहळला होता. साऱ्या देशात शोकसंतापाची लाट होती. अर्थात कोणत्याही जिवंत समाजाचेच हे लक्षण म्हणावे लागेल. त्या सामूहिक संतापाला या ‘ऑपरेशन सिंदूर’ने वाट करून दिली.