

अलीकडे प्रगती, विकासाच्या निर्देशांकात आपले राज्य कुठे आहे, याचा ऊहापोह सतत होत असतो. पण विकास म्हणजे केवळ ‘जीडीपी’चे आकडे नव्हेत. ते महत्त्वाचे असतातच; परंतु राज्यातील वातावरण कसे आहे, अभिव्यक्तीसाठी मोकळेपणा आहे की बंदिस्तपणा, व्यक्तिस्वातंत्र्य अबाधित आहे की झुंडशाहीला प्रतिष्ठा आहे, या गोष्टीदेखील अत्यंत महत्त्वाच्या असतात. त्यांच्या मोजमापाची कोणतीही तयार पट्टी नसते. पण अचानकच एखादा प्रसंग उद्भवतो आणि या सगळ्या गोष्टी कसाला लागतात. एका ‘स्टॅंड अप कॉमेडियन’च्या एका गाण्याने राज्यातील सत्ताधारी महायुतीत सामील असलेल्या एका पक्षाचे कार्यकर्ते अस्वस्थ होऊन तोडफोडीला प्रवृत्त होतात. आपला पक्षच मुळी एका व्यंग्यचित्रकाराने स्थापलेला पक्ष आहे, याचेही भान विसरतात.