
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याची जी अनेक वैशिष्ट्ये होती, त्यातील एक प्रमुख म्हणजे अभेद्य गड-कोट. ते या स्वराज्याचे मानबिंदू होत. या किल्ल्यांनी जसे आपल्या राज्याला सांभाळले; तसाच जनांनाही आधार दिला. हे गड म्हणजे फक्त दगडांच्या वास्तू नव्हेत, त्यांच्या कड्या-कपाऱ्यांमध्ये लढवय्या मराठ्यांची संघर्षगाथा दडली आहे. परकी आक्रमणांना पुरून उरलेल्या या वास्तूंनी नेहमीच शत्रूचा पहिला वार स्वतःच्या छातीवर झेलला. मराठा दौलतीची ही शान आजही देशोदेशीच्या अभ्यासकांसाठी संशोधनाचा विषय ठरते. शिवनेरी, राजगड, रायगड, प्रतापगड, पन्हाळा, साल्हेर, लोहगड, खांदेरी, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग आणि तमिळनाडूतील जिंजी या बारा किल्ल्यांचा नुकताच ‘युनेस्को’च्या जागतिक वारसा नामांकनयादीत समावेश झाला. महाराष्ट्र आणि तमाम मराठीजनांसाठी ही गौरवाची बाब म्हणावी लागेल. शिवकालीन दुर्गांचे सामरिक, स्थापत्यविषयक व सांस्कृतिक महत्त्व यानिमित्ताने अधोरेखित झाले.