बदलती गावे : चवदार वांगी ते रसरशीत अंजीर

वांग्याचं गाव, कांद्याचं गाव अशा ओळखी निर्माण करत या गावाने ‘अंजिराचे गाव’ अशी ओळख निर्माण केली आहे.
अंजिराचे गाव
अंजिराचे गावsakal

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील खोर हे तालुक्याच्या दक्षिण कोपऱ्यात वसलेले मोठे शिवार असलेले गाव. भौगोलिक रचनेमुळे हे गाव तालुक्याच्या उर्वरित भूभागापासून काहीसे तुटकच पडलेले वाटावे असेच. सातत्याने अवर्षणाशी सामना करणाऱ्या या गावाची आर्थिक स्थिती तशी बेताचीच. प्रतिकूल नैसर्गिक परिस्थिती असेल तर त्याच्याशी झगडण्याची शक्तीही निसर्गच देतो, असे म्हणतात. तसंच काहीसं या गावचं झालेले आहे. वांग्याचं गाव, कांद्याचं गाव अशा ओळखी निर्माण करत या गावाने ‘अंजिराचे गाव’ अशी ओळख निर्माण केली आहे. \

साधारण 1960 ते 1972 या कालावधीत खोर (ता. दौंड) गावाची ओळख ‘वांग्याचे गाव’ अशी झालेली होती. आकाराने बारीक असलेले चवदार वांगे ‘खोर वांगे’ म्हणून साऱ्या जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेरही प्रसिद्ध होते. 1972च्या दुष्काळानंतर वांग्याची ही जात इतर ठिकाणीही पिकवली जाऊ लागली. त्या काळात शंभर-दीडशे एकरात पिकणाऱ्या येथील वांग्याने खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटत होते. कालांतराने वांग्याचे अनेक वाण बाजारात आले आणि खोर वांग्याची ओळख पुसत गेली. या गावाने त्यानंतर कांदा पिकवण्यासाठी कंबर कसली. आजही या गावात कांदा लागवडीखाली मोठे क्षेत्र आहे. गावात दोनशे ते अडीचशे एकर क्षेत्रावर कांद्याचे पीक घेतले जाते. ही परिस्थिती इतरही अनेक गावांची असल्याने त्याचे फार कौतुक झाले नाही. मात्र येथील अंजिराने गावाचे नाव जिल्ह्यात, राज्यात इतकेच काय देशाच्या क्षितिजावरही झळकवले आहे.

शेतकऱ्यांना एकत्र आणले

या गावाची विशिष्ट प्रकारची भूरचना अंजीर लागवडीसाठी लाभदायी आहे. पुरंदर तालुक्यातील ‘राजेवाडी अंजीर’ हे राजेवाडी रेल्वे स्टेशनमुळे प्रसिद्ध होते. प्रत्यक्षात त्याच्या उत्पादनात गुऱ्होळी (ता. पुरंदर) हे गाव अग्रेसर होते. याच गावातील आपल्या नातलगांकडून प्रेरणा घेऊन सिदू आणि रावसाहेब जयवंत डोंबे या बंधूंनी साधारणतः 1978च्या सुमारास डोंबेवाडी येथे अंजीर लागवडीचा यशस्वी प्रयोग केला. हळूहळू अंजीर शेती विस्तारत गेली. याच डोंबे बंधूंच्या तिसऱ्या पिढीतील मेकॅनिकल इंजिनियर असलेल्या समीर यांनी या अंजीर शेतीला नवी ओळख निर्माण करून दिली. या त्यांच्या कार्याबद्दल समीर यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्याने परिसरातील शेतकऱ्यांना एकत्र करून अंजीर विक्री आणि प्रक्रियेची नवी पद्धत सुरू केली. ही कंपनी ‘पवित्रक’ नावाने पाकीटबंद अंजिरांची विक्री करत आहे. उकललेल्या अंजिरापासून जाम आणि जेली बनवत आहेत. अंजिरापासून वाईन बनवण्याचा कंपनीचा पुढचा प्रकल्प आहे. त्यावरही काम सुरू झाले आहे.

येथील शेतकरी खोरमध्ये ‘अंजीर महोत्सव’ भरवण्याच्या तयारीत आहेत. ‘अंजीर टुरिझम’ची संकल्पनाही लवकरच साकारेल. अंजिराचे गाव ही देशाच्या क्षितिजावर पोहोचलेली ओळख टिकवून ठेवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे गावातील शेतकरी अभिमानाने सांगत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com