हौस ऑफ बांबू : वयम् मोठम् खोटम्...!

नअस्कार! स्त्री, साहित्यिक आणि ऋषी यांना कधीही कध्धीही वय विचारु नये. माझं मेलं ठीक आहे. मी अवघी पंचविशीच्या आसपासची तरुणी.
Hous of Bamboo
Hous of Bamboosakal

नअस्कार! स्त्री, साहित्यिक आणि ऋषी यांना कधीही कध्धीही वय विचारु नये. माझं मेलं ठीक आहे. मी अवघी पंचविशीच्या आसपासची तरुणी. गेली कित्येक वर्षं मी पंचविशीचीच आहे, असं काही नतद्रष्ट पुणेकर म्हणतील. म्हणोत!

स्त्रियांच्या वयाची उठाठेव करणं शोभत नाही, येवढंसुद्धा त्यांना कळत नसेल तर काय म्हणावं? साहित्य कालातीत असतं, म्हणून साहित्यिकही कालातीत असतो.

पण महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे) यांना ते मान्य नसावं. पाऊणशे वयमान झालेल्या साहित्यिक आणि साहित्यरसिकांना कटाप करण्याचा कट टिळक रोडवर पंतांच्या गोटात शिजतो आहे, असं मला सुप्रसिद्ध ‘सूत्रां’कडून समजलं आहे. खात्रीशीर बातमी आहे.

‘मसाप’च्या कार्यकारिणीनं आपल्या घटनेत ‘कालानुरुप’ बदल करण्याचा घाट घातला असून तरुणाईला जास्तीत जास्त जागा करुन देण्यासाठी वयोवृद्धांना ‘आजोबा, आता घरी बसा!’ असं सांगायचं ठरवलं आहे म्हणे. पाऊणशे वयमानाची मर्यादा ओलांडलेल्या कुणाही सराईत, नामवंत, दिग्गज किंवा आदरणीय साहित्यिकाला किंवा साहित्य रसिकाला ‘मसाप’ची निवडणूक यापुढे लढवता येणार नाही. तशी घटनादुरुस्ती सध्या केली जात आहे.

कार्यकारिणीच्या येत्या बैठकीत घटनाबदलाचा मसुदा चर्चेला येईल. त्यानंतर सर्वसाधारण बैठक बोलावून तो मंजूर केला जाईल, अशी पद्धतशीर योजना आखण्यात आली आहे. ज्येष्ठांना असं तोंडावर ‘पिकलं पान’ ठरवणं योग्य की अयोग्य, हे तुम्हीच ठरवा!

पाऊणशे वयमानाचा साहित्यिक हा वयानं रंजलेला, संधिवातानं गांजलेला असतो असा का ‘मसाप’चा समज झाला आहे? तसं असेल तर कठीणच आहे. मी स्वत: पाऊणशे वयमानाचे तरुण साहित्यिक दाखवून देईन. (त्यातले कितीतरी मला अजूनही पत्रबित्र पाठवतात. -तेही गुलाबी कागदांवर!

इमेल पाठवली तर बदाम, लाल गुलाब, स्माइली असं बरंच काही कवितेसकट पाठवतात.) पुण्यातच नव्हे, तर अखिल महाराष्ट्रात तरुण वृद्ध साहित्यिकांची संख्या कमी नाही.

आजमितीला साहित्य संमेलनांत किंवा अन्य वाङमयीन कार्यक्रमात कुणाची गर्दी सर्वाधिक असते?

काही वर्षांपूर्वी संमेलनाध्यक्ष ‘हिंडता फिरता’ असावा, असा वर्मी घाव आमचे मराठवाडाभूषण कौतिकरावांनी घातला होता. वयोवृद्धांना कटाप करण्याच्या व्यापक कटाची ही प्रारंभिक फेज होती. फेज-२ मध्ये ‘मसाप’च्या निवडणुकीच्या वर्तुळातून ‘पाऊणशे आणि अबव्ह’वाल्यांना कटाप करण्यात येत आहे. ‘फेज ३’मध्ये या वयोवृद्धांचं वेगळं संमेलन (पर्वतीच्या पायथ्याशी किंवा सारसबागेत किंवा पेशवे पार्कात) घेण्याचा बूट काढला जाईल. छे, छे, काय हे?

‘मसाप’नं अचानक हे पाऊणशे वयमानाचं कलम का काढलं असावं, हे कोडंच आहे. आजवर ही संस्था बव्हंशी बुजुर्गांनीच टिकवली आहे, हे अमान्य करण्यात अर्थ नाही. पाऊणशे वयानंतर साहित्यिक चळवळीत कार्य करता येत नाही का? किंबहुना, साहित्य जसं कालातीत असतं, तशीच साहित्याची चळवळही असतेच.

साहित्यिकांचं वय हा एक निव्वळ आकडा आहे, हे वैश्विक सत्य ‘मसाप’ने नम्रपणे स्वीकारावं, असा माझा आग्रह आहे. पुण्याचा चालता बोलता इतिहास म्हणून नावलौकिक मिळालेले ज्येष्ठ लेखक म. श्री. दीक्षित यांनी प्रदीर्घ काळ ‘मसाप’च्याच उन्नतीसाठी घालवला. ‘मसाप’चा १०५ वर्षांचा इतिहास लिहून काढणारे मश्री आज हयात असते तर?

ज्येष्ठ साहित्यिकांना असं सक्रिय साहित्य चळवळीतून बाहेर काढून थेट ‘आडियन्स’मध्ये बसवण्याचा हा ‘मसाप’वाल्यांचा डाव (पुण्यात) यशस्वी होणं कठीण आहे. कुणीतरी थेट मोदीजींकडे तक्रार केली पाहिजे! ज्येष्ठांच्या अनुभवाचा लाभ घ्या, अशी ‘मन की बात’ त्यांनी सांगितल्यावर अनेक बुजुर्गांनी ‘कळलं ना आता?’ असं तरुणांकडे पाहिलं होतं. मोदीजी, ‘मसाप’कडे जरा लक्ष द्याल काय?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com