माफ करण्याचे महत्त्व

माफ करण्याचे महत्त्व

एक काल्पनिक गोष्ट आहे. एक शिक्षिका मुलांना सांगते, "तुम्हाला जेवढ्या लोकांचा राग येतो, तेवढे पेरू व एक मोठे कापड उद्या घेऊन या.‘‘ दुसऱ्या दिवशी शिक्षिका मुलांनी आणलेले पेरू कापडात बांधून त्यांच्या कमरेला बांधते व काही दिवस हे असेच राहू देण्याची सूचना करते. पाचव्या दिवशी एक मुलगा म्हणाला, "मला या पेरूमुळे एकाच कुशीवर झोपून चमक भरली.‘‘ दुसरा म्हणाला, ""मला खेळताच येत नाही, पेरूमुळे भरभर पळता येत नाही.‘‘ तिसरा म्हणतो, "पेरू सडलेत - फार वास येतोय.‘‘ चौथा म्हणतो, ""फारच ओझं वाटतंय, त्यामुळे बैचेनी आली आहे.‘‘ चारही मुलांना शिक्षिका म्हणाली - "विद्यार्थ्यांनो, कंबर तुमची, पेरू तुमचेच, कापड तुमचेच. मग ज्या क्षणी त्रास जाणवला, त्या क्षणी कापड सोडून पेरू फेकून का नाही दिले?‘‘ असेच अनेक "पेरू‘ आपण आपल्या कमरेला बांधून ओझे घेऊन आयुष्य काढीत असतो. 


एखादी व्यक्ती आपला अपमान करते, मनाविरुद्ध वागते, नाहक त्रास देते, हे ओझे आपण वर्षानुवर्षे घेऊन बसतो. काही जण तर म्हणतात, "त्याने माझा अपमान केला, सात जन्म विसरणार नाही.‘ जन्मभर आपणच आपल्या मनाची हानी करत आपल्या शरीरात रक्तदाबासारख्या अनेक आजारांना निमंत्रण देत असतो; म्हणून ज्या गोष्टींमुळे आपले मन दुःखी होते, त्या गोष्टींना सोडून देऊन संबंधित व्यक्तीला क्षमा करणे म्हणजे आपणच आपल्यावर कृपा करून आपले हित साधणे. म्हणून सर्व धर्मांमध्ये क्षमा करण्याला खूप महत्त्व दिले आहे. क्षमा केल्यामुळे आपल्या मनातील द्वेषभावना कमी होते. मन शांत राहण्यास मदत होते. संबंध सुधारतात. प्रगतीचा टप्पा गाठण्यास सुलभता येते. मन हलके-हलके राहते. लोकांचा विरोध मावळतो. जैन धर्मात पर्युषण पर्वानंतर "मिच्छामी दुक्कडम‘ म्हणत क्षमायाचना करण्याची, तर इतर धर्मांत मंगलमैत्रीच्या माध्यमातून क्षमायाचना करण्याची साधना शिकवली जाते. 


इतरांनी केलेली हानी व अपमान आपल्याला सोडता आला पाहिजे. दुष्ट माणूस बदला घेण्याची, शहाणा माणूस माफ करण्याची व प्रज्ञावान मनुष्य दुर्लक्ष करण्याची इच्छा बाळगतो. एक गुरू व त्याचा शिष्य प्रवास करत असताना नदीकिनारी एक तरुणी भेटते. नदीला पाणी वाढल्यामुळे तिला पलीकडे जाता येत नसते. तिच्या विनंतीनुसार गुरू तिला आपल्या खांद्यावर बसवून पलीकडे सोडतात. हा प्रकार पाहून त्यांचा शिष्य दिवसभर विचारचक्रात अडकून, बैचेन होऊन सायंकाळी गुरूंना म्हणतो, "गुरुजी तुम्ही तर आम्हाला शिकवलं - स्त्रीस्पर्श करू नये. परंतु, तुम्ही तर खांद्यावर घेऊन फिरलात.‘‘ तेव्हा हसत गुरुजी म्हणाले, "मी तिला किनाऱ्यावर केव्हाच सोडून दिले. तू तिला अजूनही घेऊन बसलास का?‘‘ ही सोडून देण्याची कला शिकणे ही एक साधनाच होय. सॉक्रेटिस हा पत्नीच्या शिव्या खाऊनही ती दमलेली दिसली की तिची विचारपूस करायचा. सोडून देण्याची, माफ करण्याची कला सॉक्रेटिसने आत्मसात केली होती.
तुकाराम महाराज, गौतम बुद्ध, येशू ख्रिस्त यांनी क्षमायाचनेचा उत्तम आदर्श घालून दिला. सुळावर चढवत असलेल्या लोकांविषयी येशू ख्रिस्त म्हणत होते, "हे पित्या, यांना माफ कर, ही तुझीच लेकरे आहेत, ते काय करतात हे त्यांना कळत नाही.‘‘
डोळे मिटून शांतपणे बसा. ज्या व्यक्तीला आपण दुःखावले त्याला आठवून बंद डोळ्यांसमोर त्याची प्रतिमा आणून त्याची माफी मागा व ज्या व्यक्तींनी तुम्हाला त्रास दिला असेल त्याची प्रतिमा बंद डोळ्यांसमोर आणून त्यांना माफ करा. असे वारंवार केल्याने आपल्या सुप्त भावना संबंधित लोकांपर्यंत पोचतात व संबंध सुधारण्याची प्रक्रिया चालू होते. पूज्य आचार्य गोएंकाजी म्हणतात,
"मै करता सबको क्षमा - करे मुझे सब कोय,
मेरे तो सब मित्र है - बैरी दिखे ना कोय।‘‘ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com