‘नाम’मुद्रा : लढवय्यी पत्रकार

उत्तर प्रदेशात सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अनेक राजकीय आश्वासनांचा पाऊस पडतोय. मात्र पिचलेले, दलित, मागास, गरिबांच्या व्यथा तशाच राहिल्या आहेत.
Kavita Devi
Kavita DeviSakal
Summary

उत्तर प्रदेशात सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अनेक राजकीय आश्वासनांचा पाऊस पडतोय. मात्र पिचलेले, दलित, मागास, गरिबांच्या व्यथा तशाच राहिल्या आहेत.

उत्तर प्रदेशात सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अनेक राजकीय आश्वासनांचा पाऊस पडतोय. मात्र पिचलेले, दलित, मागास, गरिबांच्या व्यथा तशाच राहिल्या आहेत. त्यामुळेच कविता देवी यांनी हे विषय समाजासमोर मांडण्याचे ठरविले आणि पत्रकारितेची कास धरली. त्यांच्या याच यशस्वी प्रयोगाची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली जात आहे. ‘रायटिंग विथ फायर’ या रिंटू थॉमस आणि सुश्मित घोष दिग्दर्शित माहितीपटाला ऑस्कर पुरस्कारांत नामांकन मिळाले आहे. एका गावातील दलित महिलांनी सुरू केलेल्या एका वृत्तपत्राची कथा ‘रायटिंग विथ फायर’मध्ये मांडली आहे.

कविता देवी यांची ही कथा. उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातील एका छोट्या गावातील दलित कुटुंबात त्यांचा जन्म झाला. घरातील सहा मुलांमध्ये त्या मोठ्या. त्यामुळे साहजिकच वयाच्या बाराव्या वर्षीच त्यांचे लग्न झाले. काहीही शिक्षण नाही. त्या वयात ही लग्नाची जबाबदारी; मात्र त्यांच्या आकांक्षापूर्तीसाठी असावे, एका स्वयंसेवी संस्थेने त्यांच्या गावात एक केंद्र सुरू केले. तिथे त्यांनी अभ्यासाला सुरुवात केली. सलग सहा महिने तिथे शिक्षण घेतले. अर्थात गावातून, कुटुंबातून अपेक्षित विरोध झाला. मात्र तोवर त्यांची इच्छाशक्ती तयार झाली होती. पुढे उच्च शिक्षण घेऊन त्यांनी पत्रकारितेत पदवी घेतली. त्या छोट्याशा गावातील त्या पहिल्या शिक्षित महिला ठरल्या. आपल्या आजूबाजूचे अनेक प्रश्न त्यांना दिसत होते; पण मांडण्याचे साधन त्यांच्याकडे नव्हते. त्याला कुठेतरी वाचा फुटावी म्हणून कविता देवींनी ‘महिला डाकिया’ नावाची पत्रिका सुरू केली आणि पत्रकारितेला प्रारंभ केला. नंतर २००२ मध्ये त्यांनी ‘निरंतर’ या संस्थेच्या मदतीने ‘खबर लहरिया’ नावाचे अनियतकालिक सुरू केले. सुरुवातीला त्यांच्यासोबत सात महिला होत्या.

पुरुषप्रधान संस्कृतीने केलेले अन्याय, महिलांवरील लैंगिक अत्याचार, पोलिसी अत्याचाराचे प्रकार याबरोबरच दलित वस्त्या, रस्ते, पाणी, महिलांचे प्रश्न त्यांनी या माध्यमातून मांडले. ग्रामीण भागातील खाणकामगारांची पिळवणूक आणि त्यातून होणारी मृत्यूंची लपवाछपवीही या महिलांनी उघड केली. अवघ्या दोन वर्षांत त्यांच्या या प्रयोगाला बळ मिळाले पुरस्काराच्या स्वरूपात. २००४ मध्ये या महिलांना चमेलीदेवी जन पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यानंतर अनेक महिला सोबत आल्या. २०१४ पर्यंत या वृत्तपत्राच्या उत्तर प्रदेश, बिहारच्या ग्रामीण भागात सहा आवृत्त्या सुरू झाल्या. शिवाय एक डिजिटल वृत्तवाहिनीही त्यांनी सुरू केली. आता त्यांच्या पत्रकार महिला स्मार्ट फोनच्या मदतीने मुलाखती घेतात. अनेक राजकीय नेते, पोलिसांना निडरपणे सामोऱ्या जातात. त्यांना अडचणीचे प्रश्न विचारतानाही त्या घाबरत नाहीत. विशेष म्हणजे यातील अनेक महिलांनी पहिल्यांदा स्मार्ट फोन पाहिले आहेत.

मात्र आता त्या उत्तमपणे त्याचा वापर करतात आणि त्यातून अनेक महत्त्वाचे विषय मांडतात. बलात्काराच्या प्रकरणातला एक आरोपी खुलेआम फिरताना आढळल्यामुळे ‘खबर लहरिया’च्या प्रतिनिधीने थेट पोलिसांनाच जाब विचारला. या महिलांचे पत्रकारितेतील अनुभवही विलक्षण आहेत. ‘आम्ही लोकांना त्यांच्यामधलेच वाटतो, त्यामुळे ते मोकळेपणाने बोलतात. अनेकदा लोक जात विचारतात, तेव्हा चाणाक्षपणा दाखवतो’, असेही या महिला सांगतात. ‘खबर लहरिया’मध्ये ४० महिला पत्रकारांचा चमू कार्यरत आहे. कविता देवींनी संस्थेत अनेक पदे भूषविली. २०१९ पासून त्या मुख्य संपादक पदाबरोबरच डिजिटल वृत्तवाहिनीचे प्रमुखपदही सांभाळत आहेत. तिथे त्या ‘कविता शो’ नावाचा एक कार्यक्रमही करतात. कविता देवी यांचा हाच कार्यपट ‘रायटिंग विथ फायर’मध्ये प्रेक्षकांना भावतो. सर्व दलित महिलांनी चालवलेले ‘खबर लहरिया’ हे एकमेव वृत्तपत्र असावे. या माहितीपटाचा २०२१ मध्ये ‘सनडान्स फिल्म फेस्टिव्हल’मध्ये गौरव करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com