From Cloth Trading to Sugar Mills: The Versatile Journey of W. S. Apte
Sakal
डॉ. अविनाश कोल्हे
मराठी माणसाला उद्योग व्यवसाय करण्यापेक्षा (शक्य तो) सरकारी नोकरी करणे आवडते, हे वास्तव असले तरी याच मराठी भाषिकांत किर्लोस्कर, गरवारे आणि आपटे वगैरे कुटुंबे उद्योग व्यवसायात आघाडीवर होती, हे विसरून चालणार नाही. यातही ‘किर्लोस्कर’ ‘स्त्री’, वगैरे मासिकांमुळे ‘किर्लोस्कर’ हे नाव घराघरात गेले होते. ‘आपटे उद्योगसमूह’ही तितकाच महत्त्वाचा होता. या उद्योगसमुहाचे संस्थापक तात्या ऊर्फ वामन श्रीधर आपटे यांचे चरित्र तात्यांची पणती तेजस्विनी आपटे-राम हिने लिहिले आहे. हे चरित्र म्हणजे मुंबईचा एकाप्रकारे १८७५ ते १९५२ या महत्त्वाच्या कालखंडाचा इतिहास आहे. त्याकाळात मुंबई शहर देशाची ‘औद्योगिक राजधानी’ म्हणून आकार घेत होते. तेव्हाच्या मुंबईत कापड गिरण्या झपाटयाने सुरू होत होत्या. वामनराव आपटे मूळचे व्यापारी. त्यांनी वयाच्या सतराव्या वर्षी मुंबईतील कापड व्यवसायात उ़मेदवारी सुरू केली. नंतर त्यांनी कापड गिरण्या, सिनेमानिर्मिती, साखरनिर्मिती वगैरे अनेक क्षेत्रात गुंतवणूक केली, स्वतः कारखाने उभारले, चालवले. जेव्हा वातावरण बदलले तेव्हा विकूनसुद्धा टाकले. हा सर्व इतिहास सर्जनशील लेखिका असलेल्या तेजस्विनीने ओघवत्या शैलीत मांडला आहे.