समूहांच्या माध्यमातून भ्रष्टाचार

Anna Hazare
Anna Hazare sakal

देशाच्या राज्यघटनेत निवडणूक लढविण्यासाठी पक्ष असला पाहिजे, असा उल्लेख कोठेही नाही. मात्र, पक्ष स्थापन करून एक मोठा गट तयार केला जातो. त्या गटाच्या, समूहाच्या माध्यमातून निवडणुका लढविल्या जातात. देशातील कोणातही नागरिक वयाची अट पूर्ण केल्यानंतर निवडणूक लढवू शकतो, याचा आता नेत्यांना विसर पडला आहे. पक्ष स्थापन करून राजकारणी मंडळी निवडणुका लढवितात. त्यामुळे पक्षांचे समूह तयार झाले आहेत. या पक्षांच्या व समूहांच्या माध्यमातून सत्ता स्थापन केली जाते. सत्ता स्थापन झाली, की भ्रष्टाचार सुरू होतो. म्हणजे राजकारणी मंडळी सत्तेतून पैसा व पैशातून सत्ता, अशी स्थिती देशात तयार झाली आहे. त्याचा परिणाम देशात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार वाढला आहे. राजकारण्यांसह देशातील जनतेलाही स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, याचा विसर पडला आहे. त्यासाठी जनजागृतीची गरज आहे.

सत्तेतून पैसा आणि पैशांतून सत्ता...

आपल्या देशात लोकशाही आणण्यासाठी १८५७ ते १९४७ दरम्यान सुमारे ९० वर्षे अनेक देशभक्तांनी आपले बलिदान दिले. मात्र, त्यांचा हा उद्देश सफल झाला नाही. त्या देशभक्तांचे लोकशाहीचे स्वप्न मात्र पूर्ण झाले नाही. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशात निवडणुका आल्या आणि त्या जिंकण्यासाठी अनेक राजकीय पक्ष निर्माण झाले. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली असली, तरीही देशात खरी लोकशाही या पक्ष व पार्ट्यांनी येऊ दिली नाही. देशभक्तांच्या मनातील व स्वप्नातील लोकशाही देशात कधीच अस्तित्वात आली नाही. सत्तेच्या लालसेत व साठमारीत देशातील जनतेच्या स्वातंत्र्याचा विचार गळून पडला. देशात अनेक पक्ष स्थापन झाले. या पक्षांनी देशातील सत्ता आपल्या हातात येण्यासाठी सत्तेतून पैसा व पैशातून सत्ता, अशी स्पर्धा सुरू केली. वास्तविक, देशातील व राज्यातील नेत्यांनी पक्षाचा विचार न करता देशाचा व समाजाचा विचार केला पाहिजे.

जनशक्तीचा दबाव हवाच

देशाचा विकास साधावयाचा असेल, तर प्रथम देशाच्या विकासाला लागलेली भ्रष्टाचाराची कीड थांबविणे गरजेचे आहे. त्याशिवाय देशाला, समाजाला उज्ज्वल भविष्य नाही. भ्रष्टाचार मुक्तीसाठी जनशक्तीचा दबाव गरजेचा आहे. माझ्यासारख्या फकिराने जनशक्तीचा दबाव तयार करून देशात माहितीचा अधिकार, दप्तरदिरंगाई व बदल्यांचा कायदा यांसारखे दहा कायदे करण्यास सरकारला भाग पाडले. यांतून देशातील किंवा राज्यातील भ्रष्टाचार थांबला नाही; परंतु काही प्रमाणात ब्रेक नक्कीच लागला. माझ्याजवळ धन, दौलत, सत्ता नसतानाही मी देशात व राज्यभरात हजारो किलोमीटरचा प्रवास करून जनजागृतीसाठी गावोगावी सभा घेतल्या. या जनआंदोलनांसाठी सभा संपल्यावर झोळी फिरविली व सभेसाठी जमा झालेल्या लोकांकडून पाच-दहा रुपये जमा करून निधी उभारला. माझे आंदोलन प्रत्येक वेळी शंभर टक्के यशस्वी झाले नाही, मात्र लाखो व कोट्यवधी रुपये खर्च करून जे लोकशिक्षण किंवा जनजागृती झाली नसती, ती जनआंदोलनांमुळे झाली, याचे मोठे समाधान आहे.

राज्यकर्ते देशहित विसरले

राज्यकर्त्यांमध्ये जो देशहिताचा ध्येयवाद हवा होता, तो राहिला नाही. देशहिताचा विचार न करणारे इंग्रज परकी होते. त्यांना देशातून हाकलून देता आले, मात्र सध्याचे राजकर्ते आपल्याच देशातील आहेत. आता त्यांना कसे व कुठे हाकलणार? देशातील भ्रष्टाचार थांबावा, विकासकामांना लागलेली भ्रष्टाचाराची कीड कमी व्हावी यासाठी मी देशभरात अनेक दौरे केले. राज्यातील ३३ जिल्हे व २५२ तालुक्यांत आमचे भष्टाचार निर्मूलन समितीचे संघटन उभे केले. कारण, सरकारवर जनशक्तीचा मोठा दबाव असतो. संघटनेच्या माध्यमातून सरकारचे नाक दाबले, की तोंड उघडणार, हे माहीत आहे. त्यासाठी राज्यात मोठे संघटन उभे केले. त्यातून सरकारवर मोठा दबाव तयार झाला व त्यातूनच अनेक कायदे सरकारला करावे लागले आहेत. माझ्या २०११च्या आंदोलनात नको ती माणसे आली. त्यांनी आंदोलनाचा गैरफायदा घेतला. त्यामुळे मी चिंतित झालो व सध्या सुमारे सहा वर्षे आंदोलनाची चळवळच थांबविली. संघटनही बरखास्त केले होते; मात्र अनेक वेळा कार्यकर्त्यांनी विनंती केली. ‘आपले संघटन व चळवळ थांबली, तर देशाचे, समाजाचे मोठे नुकसान होईल. आम्ही प्रतिज्ञापत्रावर स्वच्छ चारित्र्याची हमी देतो,’ असे सांगितले. त्यामुळे आता नव्याने, केवळ कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर पुन्हा नवीन संघटनबांधणीस सुरवात केली आहे. कार्यकर्त्यांना सांगितले आहे, की देशासाठी, समाजासाठी काम करणार असाल, तरच संघटनेत या. त्यामुळे आता पुन्हा एकदा आशेचा किरण निर्माण झाला आहे. एकेकाळी आपले राज्य देशातील इतर राज्यांना दिशा देणारे राज्य होते. आज राज्याची काय स्थिती आहे? राज्याचे गृहमंत्री जेलमध्ये जातात, यापेक्षा वाईट काय आहे? राज्य व केंद्र सरकारे एकाच माळेचे मणी आहेत.

नव्या पिढीसाठी मीडिया सेंटर

माझ्या प्रेरणेतून, तसेच ग्रामस्थांच्या सहकार्यातून व श्रमदानातून राळेगणसिद्धीसारखे एक आदर्श गाव उभे राहिले. या गावाला १७ वर्षांत १४ लाख लोकांनी भेटी दिल्या आहेत. गावावर चार लोकांनी पीएच.डी. केली. तीन लोक सध्या करीत आहेत. गाव कसे उभे राहिले, कसा विकास होत गेला, याचा प्रारंभीपासूनचा इतिहास येथे येणाऱ्या लोकांना पाहावयास मिळावा, तसेच मी केलेली आंदोलने व त्यांचा इतिहास तरुण पिढीला व जनतेला भाविष्यातही माहीत व्हावा, यासाठी लाखो रुपये माझ्या निवृत्तिवेतनातून व बक्षिसांच्या रकमेतून खर्च करून दोन मीडिया सेंटर उभारली आहेत. भविष्यात येथे येणाऱ्या अभ्यासकांना व पर्यटकांना या मीडियाद्वारे गावाचा व माझ्या आंदोलनांचा इतिहास समजणार आहे. मी सध्या ८४ वर्षांचा असल्याने मला मिळालेले आयुष्य मी बोनस समजतो. त्यामुळे शेवटपर्यंत जगायचे ते केवळ समाजासाठीच, देशासाठीच!

''देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशात निवडणुका आल्या आणि त्या जिंकण्यासाठी अनेक राजकीय पक्ष निर्माण झाले. देशाला स्वातंत्र मिळून ७५ व देश प्रजासत्ताक होऊन ७३ वर्षे झाली असली, तरीही देशात खरी लोकशाही या राजकीय पक्षांनी येऊ दिली नाही. ज्या देशभक्तांनी स्वातंत्र्य मिळविण्यासाठी आपल्या प्राणांची बाजी लावली, बलिदान दिले, त्यांच्या मनातील व स्वप्नातील लोकशाही देशात कधीच अस्तित्वात आली नाही, याचे कारण पक्ष स्थापन करून मोठे गट निवडणुका लढवतात आणि भ्रष्टाचार सुरू करतात.''

- अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com