

Marathi Mandatory for Rickshaw Drivers: A Satirical Take on Policy Implementation
Sakal
महाराष्ट्रात राहणाऱ्या हरेकाला मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे. महाराष्ट्रात कामधंदा करणाऱ्याला तर ती बोलता आलीच पाहिजे. भलते लाड खपवून घेता कामा नयेत. दक्षिणेत गेलात, तर तिथे झक्कत तिथली भाषा बोलावी लागते. ती येत नसेल, तर खाणाखुणा योग्य पद्धतीने करून संवाद साधावा लागतो. मागल्या टायमाला आम्ही दक्षिणेत कुठेतरी गेलो असता, साधा ‘सुलभ’ पत्ता विचारीत होतो, पण खाणाखुणा चुकल्या. समोरील अण्णाने दातओठ खाऊन, जीभ चावत लुंगीच उचलायला घेतली. अनवस्था प्रसंग गुदरला. असो.
परप्रांतीय रिक्षावाल्यांस मराठी शिकवून सोडण्याचा जो निर्णय परिवहन मंत्र्यांनी घेतला आहे, त्याचे आम्ही स्वागत करतो. मायमराठी ही भाकरीची भाषा बनावी, यासाठी आजवर अनेक दिग्गज विचारवंत, साहित्यिकांनी आपले देह झिजविले. कथा-कादंबऱ्या, कविता लिहू लिहू मायमराठीची सेवा केली. परंतु, परिवहन मंत्र्यांकडे पाहून ‘तुम्ही तर यांच्याही पुढे गेलात?’ असे विनम्रपणे म्हणावेसे वाटते.