यशासाठी प्राधान्यक्रम ठरवा

prof raja aakash
prof raja aakash

आपण अपयशी होतो त्यामागचं एक महत्त्वाचं कारण हे आहे, की कोणत्या कामांना प्राधान्य द्यायचं व कोणत्या कामांना नाही हे आपल्याला ठरवता येत नाही. त्यामुळे आपला महत्त्वाचा वेळ/दिवस/महिने/वर्ष अनावश्‍यक गोष्टीत खर्च होतो. एखादं काम हातघाईला आल्यावर आपण करायला घेतो, कसं तरी धावपळ करत ते करतो. त्यामुळे त्या कामाचा दर्जा खालावतो, आपण अपयशी होतो किंवा अडचणींना तोंड द्यावं लागतं. परीक्षा जवळ आलेली असते. पण टीव्हीवर चांगला चित्रपट असतो. आपण त्याला प्राधान्य देतो. मग मित्र बोलवायला येतात. आपण त्यांच्यासोबत फिरण्याला प्राधान्य देतो. रात्री थकून घरी येतो, मग झोपेला प्राधान्य देतो. अभ्यास करायचा आहे हे माहिती असतं. तो आवश्‍यक आहे हेही कळत असतं. पण त्याचा प्राधान्यक्रम आपण सर्वांत शेवटी लावतो. त्यामुळे आपण तिथपर्यंत पोचतच नाही. कारण आपण थकून गेलेले असतो. मग कुठलीच गोष्ट नीट होत नाही व पश्‍चात्ताप करण्याची पाळी येते. ‘‘आता पुढच्या वेळी असं मुळीच करणार नाही,’’ असं दरवर्षी म्हणता. पण दरवेळी तीच चूक करता. यातून बाहेर पडायचं असेल तर आपल्याला प्राधान्यक्रम ठरवता आला पाहिजे.

एक मोठा कागद घ्या. त्यावर चार रकाने तयार करा व यात चार प्रकारांत पुढे दिल्याप्रमाणे कामांची विभागणी करा. १) महत्त्वाचं व तातडीचं. २) महत्त्वाचं, पण तातडीचं नाही. ३) तातडीचं आहे, पण महत्त्वाचं नाही. ४) तातडीचं नाही व महत्त्वाचंही नाही. टीव्ही बघणं, मित्रासोबत फिरणं, टाइमपास करणं अशा गोष्टी चौथ्या रकान्यात येतील. जी कामं महत्त्वाची नसतात, पण तातडीची असतात, उदा. तहानभूक लागणं, नळाला थोड्या वेळासाठीच पाणी येतं, ते वेळेत भरणं, अचानक येणारी कामं इ. या गोष्टी तिसऱ्या रकान्यात येतील. जर्नल्स पूर्ण करणं, अभ्यास करणं, बिलं भरणं, मीटिंगची तयारी, गाडीत पेट्रोल भरणं यांसारख्या गोष्टी दुसऱ्या रकान्यात असतील. त्या महत्त्वाच्या आहेत, पण तातडीच्या नाहीत. दुसऱ्या व तिसऱ्या रकान्यातल्या गोष्टी हातघाईला येतात, तेव्हा त्या पहिल्या रकान्यात येतील. आपला स्वभाव असा असतो की एखादी गोष्ट पहिल्या रकान्यात येत नाही, तोपर्यंत आपण त्याकडे लक्षच देत नाही. जेव्हा खूप महत्त्वाच्या व तातडीच्या गोष्टी पहिल्या रकान्यात साचतात, तेव्हा आपण गोंधळून जातो. चिडचिड करू लागतो. हातून चुका होतात. आपल्याला कधी कधी दंडही भरावा लागतो. ज्याचा पहिल्या क्रमांकाचा रकाना नेहमी रिकामा असेल, तो जास्त समाधानी राहू शकेल. त्याच्या मनावर अनावश्‍यक ताण येणार नाही. चिडचिड होणार नाही व त्याचं प्रत्येक कामावर पूर्ण नियंत्रण राहील. हे करणं सोपं आहे. त्यासाठी कामाचं पहिलं प्राधान्य दुसऱ्या रकान्यातल्या गोष्टींना म्हणजेच ‘महत्त्वाचं आहे, पण तातडीचं नाही’ अशा कामांना द्या. तिसरं प्राधान्य चौथ्या रकान्यातील गोष्टींना द्या. असं करत गेलात, तर चौथं प्राधान्य ठरवावंच लागणार नाही. कारण तुमचा पहिला रकाना नेहमी रिकामा राहील. प्राधान्यक्रम ठरवून तुम्ही आयुष्यात नियोजन करू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com