कर्बमुक्तीच्या पाऊलवाट : कृषी क्षेत्राचीही जबाबदारी

कर्ब वायू हा वास्तविक आपला मित्र, याचे कारण त्यामुळेच सभोवतालचे वातावरण उबदार राहते.
Agriculture
Agriculture Team eSakal

कर्ब वायू हा वास्तविक आपला मित्र, याचे कारण त्यामुळेच सभोवतालचे वातावरण उबदार राहते. पण हा झाला भूतकाळ. वर्तमानामधील परिस्थिती फारच वेगळी आहे, वातावरण तर उष्ण झालेच आहे; पण पूर्वीसारखा पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा हे तीनही ऋतू आता सम प्रमाणात राहिले नाहीत. पावसाळा लांबत चालला आहे तर हिवाळा आखडून रखरखीत उन्हाळ्यास रान मोकळे करुन देत आहे. असे का? याचे एकच उत्तर म्हणजे मित्र असलेल्या कर्ब वायूला आम्ही कळत नकळत आपल्या शत्रुस्थानी ठेवत आहोत. (Sakal Editorial Article)

वातावरणामध्ये जेव्हा कर्ब वायूचे प्रमाण त्याच्या उबदारतेच्या मर्यादेमधून म्हणजेच ३०० पीपीएम वरुन वाढू लागते त्या प्रमाणात वातावरण उष्ण होऊ लागते. आज या कर्ब वायूचे हवेतील प्रमाण ४०० पीपीएमच्या पुढे आहे आणि त्याला पुन्हा त्याच्या मूळ पातळीवर आणण्याचा प्रयत्न आपणा सर्वांना करावयाचा आहे. हे काम केवळ सरकारचे आहे, असे समजून जबाबदारी झटकणे योग्य नव्हे. कर्ब वायू निर्माण करण्यामध्ये जसा आपल्या प्रत्येकाचाच सहभाग आहे, त्याप्रमाणेच त्याचे प्रमाण कमी करुन वातावरण सुसह्य करण्यामध्येही आपल्या प्रत्येकाचा वाटा असणार आहे.

वातावरणामध्ये कर्ब वायू वाढण्याची मुख्य कारणे म्हणजे वाढते औदयोगिकीकरण, रस्ते वाहतूक, कृषी आणि आपल्या सर्वांची जीवनशैली. या लेखात प्रामुख्याने कृषी क्षेत्राचा विचार केला आहे. या क्षेत्राच्या बाबतीत येणाऱ्या समस्या पाहू. रासायनिक खतांच्या अनियंत्रित वापरामुळे मृत झालेले कृषी क्षेत्र, शेतामधील जैविक कचरा शेतामध्येच जाळणे, पाण्याच्या अतिरिक्त वापरामुळे पिकांचे अवशेष जमिनीमध्ये कुजण्यापेक्षा सडू लागणे, यांमुळे कर्ब वायूचे उत्सर्जन होते. शेतकरी वर्ग या कर्ब वायूवर सहज नियंत्रण करु शकतो. रासायनिक खते आणि सेन्द्रिय खते यांचा योग्य समन्वय, शेतपिकांचे अवशेष जाळण्यापेक्षा त्यांना शास्त्रीय पद्धतीने कुजवणे, शेत जमिनींना पुन्हा जिवंत करणे आणि ठिबक सिंचन पद्धतीचा वापर या गोष्टी शेतकऱ्यांना करणे सहज शक्य आहे.

आपणही आपल्या जीवनशैलीचा अधिक बारकाईने विचार केला पाहिजे. कर्ब वायू निर्माण करणाऱ्या कोणत्या वस्तू वापरतो, वाहनांचा विनाकारण वापर करतो का, कारण नसताना प्रवास करतो का? आपला राग फळ बागा जाळणे, दूध रस्त्यात ओतून देणे, भाजीपाला, फळभाज्या फेकून देणे यातून व्यक्त केल्यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत असते. कारण या प्रत्येक जैविक प्रक्रियेमधून मोठया प्रमाणावर कर्ब वायू वातावरणात प्रवेश करतो. चीन, अमेरिका युरोपीय समुदाय यांच्यानंतर जगामध्ये कार्बन उत्सर्जनामध्ये आपला देश चौथ्या स्थानावर आहे आणि त्यात कृषीचा वाटा जवळपास २० टक्के आहे, त्यातील किमान दहा टक्के तरी आपण कमी करू शकतो.

भात शेतीमधील पाण्याचे नियंत्रण, रासायनिक खतांचा कमीत कमी वापर आणि शेतामधील शून्य मशागतीमधून आपण हे साध्य करू शकू. अल्पभूधारक शेतकऱ्यांनी सेद्रिय शेतीकडे वळणे, सरकारने त्यांना कार्बन क्रेडिट देणे, बांधावर उपयोगी वृक्ष लागवड, त्याचबरोबर जीवाष्म इंधनाचा कमीत कमी वापर ही कर्ब मुक्तीकडे जाणारी सशक्त पाऊले आहेत. ‘मी हे करणारच’ या निर्धारासह ती भक्कम पडणे गरजेचे आहे. याचे कारण तुमच्या या पावलांचे ठसेच भावी पिढीला खऱ्या अर्थाने दिशादर्शक असणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com