बदलती गावे : गुहागर - ‘पुढची कवाडी’कडून पर्यटनाच्या द्वाराकडे

guhagar
guhagar

गुहागरकरांची ऐंशीच्या दशकापर्यंत हेटाळणी ‘पुढची कवाडी’ म्हणून केली जात असे. ‘पुढची कवाडी’ याचा अर्थ, ‘आपल्या दारात आलेल्या पाहुण्याला पुढील घरी जा,’ असे सांगणे. त्याची कारणेही अनेक होती; मात्र आज तेच गुहागर पर्यटक, पाहुण्यांना पायघड्या घालत आहे. नव्वदच्या दशकात गुहागरमध्ये दाभोळ वीज कंपनी आल्यानंतर हा अमुलाग्र बदल झाला. आज गावामध्ये 36 आस्थापनांमधून 1500 पर्यटकांची व्यवस्था अगदी आस्थेने केली जाते. याशिवाय, 10 हॉटेल व तीन खानावळींमधून पर्यटकांचा नाश्‍ता व भोजनाची व्यवस्था केली जाते.

- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
कोकणातील सर्वात विस्तीर्ण साडेसात किलोमीटर लांबीचा रुपेरी वाळू किनारा असलेलं, नारळी पोफळीच्या सदाहरित बागांनी नटलेलं गाव म्हणजे गुहागर. निसर्गाने भरभरून दान देऊनही 1993पर्यंत गुहागरमध्ये पर्यटक फारसे फिरकत नव्हते. व्याडेश्वर आणि दुर्गादेवी ही दोन देवस्थाने ज्यांची कुलदैवते आहेत, अशीच अनेक मंडळी इथे येत असत. ती मंडळी पुजाऱ्यांकडे राहत आणि धार्मिक विधी झाले की निघून जात. १९९३च्या दरम्यान दाभोळ बंदरालगत गुहागर तालुक्‍यातील अंजनवेल, रानवी व वेलदूर परिसरात दाभोळ वीज प्रकल्प उभारण्याचा निर्णय झाला. 70 टक्के बहुराष्ट्रीय मालकीच्या या कंपनीच्या उभारणीसाठी देश-विदेशातून सुमारे 2 ते 3हजार मंडळी इथे काम करत होती. त्यांच्या निवासासाठी अनेकांनी आपल्या घरांमध्ये थोडे बदल करून खोल्या भाड्याने दिल्या. काहींनी लॉज बांधून कंपनीला भाडे तत्वावर दिले. काहींनी हॉटेल व्यवसाय सुरू केला.

- राज्यभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या कर्मचाऱ्यांसाठी विरंगुळ्याचे साधनही समुद्रकिनाराच होता. त्यामुळे रविवारी समुद्रकिनाऱ्यावर गर्दी होत असे. ही गर्दी पाहून गुहागर समुद्रकिनाऱ्यावर एकाने भेळपुरीची गाडी सुरू केली.  याच कालावधीमध्ये "दाभोळ'' प्रकल्पाला विरोध करणारी आंदोलने सुरू झाली. प्रदीर्घ काळ चालेल्या या आंदोलनाने राज्याचे राजकारणही ढवळून निघाले. दाभोळ वीज प्रकल्पात परदेशी कंपन्यांचा सहभाग असल्याने विदेशी प्रसारमाध्यमेही या आंदोलनांच्या बातम्या प्रसिद्ध करत होती. याच सुमारास भारतात इलेक्‍ट्रॉनिक माध्यमे आणि इंटरनेटचा वापर होऊ लागला. त्या माध्यमातून गुहागरचे नाव जागतिक पटलावर चर्चेत आले. पुढे 1999मध्ये दाभोळ वीज कंपनी बंद पडली आणि त्याचा मोठा फटका गुहागर, दापोली आणि चिपळूण तालुक्‍याला बसला. अनेकांच्या हातचा रोजगार केला. येथून पुढे गुहागरच्या पर्यटन विकासाला आरंभ झाला. 

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
कंपनी बंद पडल्याने रिकाम्या खोल्यांमध्ये पर्यटकांची राहण्याची व्यवस्था होऊ लागली. हॉटेल, लॉज उभे राहिले. भाड्याने वाहन देण्याचा व्यवसाय सुरू झाला. बाजारपेठेत अस्सल कोकणातील पदार्थांची उत्पादने दिसू लागली. समुद्रकिनाऱ्यावर खाऊगल्ली उभी राहिली. या बदलांची दखल घेत शासनानेही पर्यटनाभिमुख विकासाला प्राधान्य देण्यास प्रारंभ केला. गुहागरमधील सांस्कृतिक व खाद्य संस्कृतीच्या दर्शनासाठी "पर्यटन महोत्सव'' भरवले जाऊ लागले. "नमन खेळे'' त्यातील संकासुर ही लोककला, ऑलिव्ह रिडले कासव संवर्धन उपक्रम, खाडी सफर, मगर दर्शन, चित्रीकरण, प्रिवेड शूट असे वेगवेगळे आयाम टप्प्याटप्यावर पर्यटनाला जोडले गेले. या सगळ्यांमुळे गुहागरचा पर्यटन व्यवसाय बहरू लागला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com