पुन्हा पुन्हा मी पुन्हा...!

पण ‘मी पुन्हा येईन’ या ओळीचा अर्थ काही (राजकीय) लोकांनी शब्दश: घेतला.
satirical news
satirical newssakal

आजची तिथी : श्रीशके १९४५ शोभन संवत्सर आश्विन शु. पौर्णिमा.

आजचा वार : संडेवार.

आजचा सुविचार : सांग त्या कोजाऽऽगिरीच्या चांदण्याला काय सांऽऽगू? (पुढची ओळ कामाची नाही.)

नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे.) लोक सुखाने एखाद्या माणसाला जगू देत नाहीत. तसे बघायला गेले तर मी कुणाच्या ना अध्यात ना मध्यात. आपण बरे, आणि आपला पक्ष बरा, असे वागणारा मी एक सीधासाधा, मोकळाढाकळा नागपुरी माणूस आहे. माझे कुठे दूधसंघ नाहीत की साखर कारखाने नाहीत. ना एखादे मेडिकल कॉलेज किंवा शाळा…विद्यापीठ तर दूरची गोष्ट राहिली. गरजेनुसार मुंबई किंवा दिल्लीला जावे, आणि आपल्या वाट्याचे राजकारण करुन परत यावे, असे मी वागत आलो आहे. पाच वर्षापूर्वी एक पाच ओळींची कविता कुठेतरी म्हटली होती, ती आता माझ्याच डोक्याची शकले करु लागली आहे. कुठून दुर्बुद्धी झाली

आणि ती वैताग कविता म्हटली

असे आता वाटू लागले आहे...

मी पुन्हा येईन. याच ठिकाणी, याच निर्धाराने,

नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी...

मी पुन्हा येईन गावांना जलयुक्त करण्यासाठी,

शहरांचा चेहरा बदलण्यासाठी,

माझ्या महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी.

नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी...

मी पुन्हा येईन!

..या त्या वैतागवाण्या चार-पाच ओळी. एरवी कुणी दिवाळी अंकातही छापली नसती, अशी ही बंडल कविता. पण त्याला आता ऐतिहासिक मोल आले आहे. ‘पुन्हा येईन’ या माझ्या वचनामुळे मध्यंतरी केवढा गहजब उडाला होता. साधी कविता, पण लोक तिला प्रतिज्ञा समजून बसले. आता एखादा कवी ऐन भरात ‘मी गिळेन सूर्य एका घासात’ असे म्हणाला, तर ते मनावर घ्यायचे असते का?

पण ‘मी पुन्हा येईन’ या ओळीचा अर्थ काही (राजकीय) लोकांनी शब्दश: घेतला. काहींना हायसे वाटले, काहींना डोक्यात तिडीक गेली. काहींची बोबडी वळली आणि काहींनी तर धीरच सोडला!! मी आपला जमेल तसे राजकारण करत होतो...

परवा हीच कविता पुन्हा एकदा व्हायरल झाली. का झाली? कुणी केली? काही कळेना. कविता प्रसारित झाल्याचे मला क़ळलेच नव्हते. पण आमचे परममित्र कर्मवीर (मु. पो. ठाणे) यांचा घाबऱ्याघुबऱ्या फोन आला. म्हणाले, ‘‘आमचं काही चुकलं का?’’

‘‘छे, कुठं काय?’’ मी गोंधळून म्हणालो.

‘‘काही चुकलं असेल तर कान पिळा, दाढी ओढा काहीही करा, पण हे असले बॉम्बगोळे टाकू नका!’’ भरल्या गळ्याने ते म्हणाले, आणि फोन ठेवलाच!! मी चक्रावून गेलो होतो. तेवढ्यात आमचे दुसरे नवे परममित्र दादासाहेब बारामतीकर यांचा फोन आला. त्यांचे सगळे थेट काम असते.

‘‘हे बघा, महत्त्वाकांक्षा ठेवण्याचा अधिकार घटनेने सर्वांनाच दिलेला आहे, आणि जो तो आपापलं ठरवतो. पण ज्याने पहाटेच्या पारी उठून तुम्हाला साथ दिली, त्याच्या पोटात गोळा आणण्याचं काम का करता?’’ दादासाहेब रागावल्यासारखे बोलले. अर्थात ते रागावल्यासारखे वाटतात; पण प्रत्यक्षात रागावलेले नसतात, हे आता मला कळून चुकले आहे.

‘‘काय झालं? मस्त चाललंय की आपलं! कोण कोणाच्या पोटात गोळा आणतंय?’’ मी नागपुरी दिलखुलासपणाने म्हणालो.

‘‘ हे बघा, आम्ही पडलो शेतकरी माणसं, सरळसोट काय ते सांगून टाका आणि विषय संपवा!’’ एवढे बोलून दादासाहेबांनी फोन आपटला. यावर आता एकमेव उपाय उरला आहे. मी नवी कविता लिहायला बसलो आहे!!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com