

Vidarbha Literary Election: Girish Gandhi Wins Amid BJP Influence
esakal
प्रिय बाप्पा, सप्रेम नमस्कार! विदर्भ साहित्य संघाच्या निवडणुकीचे वृत्त कळले, म्हणून घाईघाईत ही इमेल लिहीत आहे. नेमके काय झाले? यंदा डॉ. श्रीपाद भालचंद्र आणि अन्य विद्रोहींनी बराच जोर लावला होता. तुम्हीही चवताळून उठला होतात, तरीही गिरीश गांधी निवडून आले? असे कसे झाले? साहित्यविश्वात हे काय चालले आहे, कळतच नाही. जो येतो तो भाजपवाला निघतो, हे गौडबंगाल मला तरी समजत नाही. तुमचे काय आकलन? कृपया कळवावे.
आमच्या अखिल भारतीय साहित्यविश्वात (पक्षी : पुणे) तर भूकंप झाला आहे. जवळपास सोळा किंवा बावीस रिश्टर स्केलचा असू शकेल. होत्याचे नव्हते झाले आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत आजवर (युद्ध न लढताच) अजिंक्यवीर ठरलेले प्रा. मिलिंद जोशी यांची परिवर्तन उत्कर्ष आघाडी पार झोपली. झोपली म्हंजे अगदी गाई गाई!! खुद्द मिलिंद जोशी आणि वीर विनोद कुलकर्णी यांचाच पराभव झाला. तोही फक्त पंचावन्न मतांनी. शंभरावे साहित्य संमेलन जोरात करायचा दोघांचा प्लॅन होता. पण सगळे गेले!! हे म्हंजे दोनशे पुरणपोळ्यांची ऑर्डर मिळाली असताना ऐनवेळेला ग्यास सिलेंडर संपावा, तशी अवस्था!! चालायचेच. विजयी झालेल्या योगेश सोमणांना तर शब्द फुटेनासे झाले आहेत म्हणे!