कुटुंब डॉट कॉम : स्वातंत्र्य की समाधान?

आपण-‘सोलो ट्रेन्ड’विषयी बोलत आहोत. मागच्या लेखात आपण लग्न न करता, एकट्यानंच राहणाऱ्या पुरुषांचा विचार केला.
Solo Trend
Solo TrendSakal
Summary

आपण-‘सोलो ट्रेन्ड’विषयी बोलत आहोत. मागच्या लेखात आपण लग्न न करता, एकट्यानंच राहणाऱ्या पुरुषांचा विचार केला.

आपण-‘सोलो ट्रेन्ड’विषयी बोलत आहोत. मागच्या लेखात आपण लग्न न करता, एकट्यानंच राहणाऱ्या पुरुषांचा विचार केला. आता स्त्रियांविषयी बोलू. काही स्त्रिया लग्नाचा पर्याय नाकारून एकटीनंच राहण्याचा निर्णय का घेतात? त्यांची मानसिकता काय असते? नेमकं हेच जाणून घेण्याच्या हेतूनं जयश्री रावळेकर यांनी त्याच्या ‘सई’ दिवाळी वार्षिकाच्या ‘स्वतंत्र स्त्री विशेषांकां’साठी अशाच काही कर्तबगार स्त्रियांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यापैकी फक्त दोनच मुलाखतींचा संदर्भ-तोही संक्षिप्त स्वरुपात मी इथे देत आहे. पण त्यातूनही काही महत्त्वाचे मुद्दे नक्कीच स्पष्ट होतील.

कर्करोग उपचार व ‘परिहार सेवा’ या क्षेत्रात अतिशय मौलाचं योगदान देणाऱ्या डॉ. अनुराधा सोवनी. वयाच्या पंचविसाव्या वर्षापासून साधारण पस्तीशीपर्यंत त्या उच्च वैद्यकीय शिक्षण-प्रशिक्षण यासाठी भारताबाहेर होत्या. पूर्णपणे नव्या वातावरणात... नवी आव्हानं, नवे अनुभव यांना सामोरे जाताना, स्वतःच्या बळावर जगण्याचा संपन्न अनुभव मिळत होता. कामात बुडून जाऊन त्यातली वेगवेगळी क्षितिजं शोधतानाच आनंद इतका मोठा होता की लग्नाची अपरिहार्य गरजच वाटली नाही. त्या म्हणतात, ‘‘केवळ करिअरसाठी लग्न नाही, असा तो एकांगी विचार नव्हता. ‘आपण सुखी आहोत’ असं स्वतःलाच पटवून देण्याची वेळ कधीच येऊ नये, असं मला वाटतं. त्यामुळे लग्नाचा पर्याय आपणच आपल्याला नाकारायचा, असं मी केलं नव्हतं. लग्नाशिवाय आयुष्य आनंदानं जगण्याचे पर्याय समोर होते एवढंच.’’ लग्नाप्रमाणेच स्वतःचं मूल असणं, ही अपरिहार्य गरज त्यांना कधीच वाटली नाही. आपलं मूल असण्यातल्या आनंदाबरोबर एक मोठी ‘जबाबदारी’ आपण स्वीकारतो. त्यासाठी पुरेसा वेळ देता येणार आहे का, याचा आधीच विचार करावा, असं त्यांना वाटतं. आणखी एक - जेव्हा लग्न न करण्याचा निर्णय पूर्वायुष्यातील एखाद्या कटू अनुभवामुळे घेतला जातो, तेव्हा त्यात पुढे असमाधान, नैराश्‍य येऊ शकतं. कारण इतरांना जे मिळालं ते आपल्याला मिळालं नाही, अशी एक बोचरी खंत राहू शकते. मात्र, जेव्हा असा निर्णय डोळसपणे विचार करून घेतलेला असतो, तेव्हा आयुष्य सर्वांगानं सुंदर करण्याचे इतर अनेक पर्याय उपलब्ध असतात.

दुसरं उदाहरण आहे मीरा बापट यांचं. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्किटेक्‍ट म्हणून काम केलेल्या, संयुक्त राष्ट्र संघाच्या सल्लागार म्हणूनही काम केलेल्या मीरा बापट याही उच्च शिक्षणासाठी डेन्मार्क व इंग्लंड येथे वास्तव्यास होत्या. लग्न न करण्याचा निर्णय कसा घेतला या संदर्भात त्या म्हणतात, ‘‘जसजशी मला स्वतःची ओळख होत गेली, तसतशी स्वतःच्या प्रकृतीशी जुळेल अशी जीवनशैली घडत गेली. लग्नाबरोबर साधारणतः येणारी ‘डोमेस्टिसिटी’ मला मानवली नसतीच. मला माझं खाजगी विश्‍व, माझं काम, माझे छंद, माझी स्वतंत्र स्पेस हे अत्यंत प्रिय आहे. त्यात लग्नामुळे आणखी अर्थपूर्ण भर पडली तर ठीक, नाहीतर ते मला मानवणार नाही हे या विचाराचं सूत्र आहे.’’ अर्थात या स्त्रियांप्रमाणेच कौटुंबिक जीवनाबरोबरच, आव्हानात्मक क्षेत्रातील करिअरच्या सर्वोच्चपदी पोहोचलेल्या इंद्रा नुई यांच्यासारख्या स्त्रियाही आहेतच. त्याच वेळी खास असं करिअर किंवा महत्त्वाकांक्षा नसताना, काही कारणांमुळे लग्नच नको म्हणणाऱ्या स्त्रियाही असतात. अशा स्त्रियांना मात्र नंतरच्या काळात ‘एकटेपण’ पेलणं कठीण जाऊ शकतं. तात्पर्य स्पष्ट आहे. लग्न न करण्याचा निर्णय हा पूर्ण विचारांती, डोळसपणे घ्यायला हवा. तुम्ही एकटं राहता का, यापेक्षा स्वतःला हवं तसं जगता का हा खरा प्रश्‍न आहे.

अर्थात एकटं, स्वतंत्र राहणं म्हणजेही स्वकेंद्री असणं नव्हे. अवतीभवतीच्या माणसांशी जोडून घेत, सौहार्दाची नाती जोडत, सुसंवादी पद्धतीनं जगता येणं महत्त्वाचं असतं. फक्त झगमगतं करिअर नव्हे, तर जीवनशैली समृद्ध असणं महत्त्वाचं असतं. होय, स्वातंत्र्य महत्त्वाचं असतंच, पण त्याहीपेक्षा तुम्ही स्वतःशी समाधानी असणं जास्त महत्त्वाचं असतं!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com