कुटुंब डॉट कॉम : धर्मग्रंथ काय सांगतात?

भारतीय संस्कृतीत कुटुंबव्यवस्थेला फार महत्त्वाचं स्थान आहे. पाश्‍चात्त्य देशातल्या मंडळींना आपल्या कुटुंबपद्धतीविषयी काहीसं आकर्षण व कुतूहल असतं.
Scripture
Scripturesakal
Summary

भारतीय संस्कृतीत कुटुंबव्यवस्थेला फार महत्त्वाचं स्थान आहे. पाश्‍चात्त्य देशातल्या मंडळींना आपल्या कुटुंबपद्धतीविषयी काहीसं आकर्षण व कुतूहल असतं.

भारतीय संस्कृतीत कुटुंबव्यवस्थेला फार महत्त्वाचं स्थान आहे. पाश्‍चात्त्य देशातल्या मंडळींना आपल्या कुटुंबपद्धतीविषयी काहीसं आकर्षण व कुतूहल असतं. काही समाजशास्त्रज्ञांच्या मते भारतीय कुटुंबपद्धती आदर्श अशीच आहे. हे सगळं असलं तरीही या कुटुंबव्यवस्थेनंच स्त्रियांवर दुय्यमत्व लादलं, हा एक सार्वत्रिक आक्षेप असतोच. मग साहजिकच हे प्रश्‍न उभे राहतात - भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीचं दुय्यमत्वच अभिप्रेत आहे काय? ते रुजविण्यासाठी `कुटुंबा’चा साधन म्हणून तर उपयोग केला गेला नाही? प्रश्‍न तसे धारदार आहेत. शिवाय त्यासंदर्भात मतमतांतरे आहेतच. एकूणच हा मोठा विषय आहे; पण तरीही महत्त्वाचा आहे. अर्थात आपल्याला फार तपशिलात जाण्याची गरज नाही. म्हणूनच पुढील काही लेखांत आपण याचा अगदी थोडक्‍यात परामर्श घेणार आहोत.

असं म्हटलं जातं - आपल्या संस्कृतीत स्त्रीला एक तर पुरुषाच्या डोक्‍यावर तरी बसवलं आहे किंवा त्याच्या पायाशी तरी... बरोबरीचं स्थान तिला नाहीच. एक तर निश्‍चित, धर्माचा आणि संस्कृतीचा जनमानसावर खूपच मोठा प्रभाव असतो. अभ्यासकांच्या मते धर्म, परंपरा, संस्कृती या साऱ्या पुरुषप्रधान संस्था, व्यवस्था असतात. त्या हाताशी धरून स्त्रियांना जाणूनबुजून दुय्यमत्व दिलं जातं. भारतीय संस्कृतीत, हिंदू धर्मात स्त्रियांना दुय्यम लेखलं गेलं ते मुख्यतः धर्मग्रंथांच्या आधारे असं म्हटलं जातं. यातील तथ्य शोधताना बऱ्याच अडचणी येतात. कारण असं की हिंदू धर्माचे असे मानले जाणारे अनेक ग्रंथ आहेत. श्रुती, स्मृती, पुराणं इ. ग्रंथांतून त्याचं बदलतं स्वरूप दिसून येतं. त्याशिवाय असंख्य जाती-जमाती, त्यांच्यातील चालीरीती यांतही खूपच वैविध्य आढळतं. तरीही प्रमुख धर्मग्रंथांचा अगदी धावता आढावा घ्यायचा झाला तर सर्वांत प्रथम येतात ते वेद. त्यातही प्राचीन म्हणजे ऋग्वेद. ‘ऋग्वेदा’त स्त्रियांवर बंधनं घालणाऱ्या ऋचा अपवादानंच येतात. बहुसंख्य देव जरी पुरुष असले तरी स्त्री-देवतांचीही प्रार्थना आहे. ‘यजुर्वेदा’त गृहस्थाश्रम धर्माचा गौरव आहे. पतिनिष्ठेचीही स्तुती आहे; तरीही स्त्रियांवरील बंधनं आढळत नाहीत. किंबहुना अपाला, घोषा, लोपामुद्रा अशा स्त्रियांनीही काही वेदमंत्रांची रचना केल्याचं इतिहासकार सांगतात. यानंतर येतो तो ‘ब्राह्मणग्रंथां’चा काळ. ब्राह्मणग्रंथांत ‘विवाहा’ची प्रशस्ती आहे. ‘‘पत्नी’शिवाय पुरुष अपूर्ण आहे, तो विवाह केल्यानंतरच पूर्ण होतो,’ असं ‘ऐतरेय ब्राह्मणा’त म्हटलं आहे. तर ‘पती हेच पत्नीचं आश्रयस्थान आहे' असं ‘शतपथ ब्राह्मण' ग्रंथ सांगतो. स्त्रीनं पतीच्या आज्ञेनुसार आचरण करावं. त्याच्या अगोदर जेवू नये, अशी वचनं आहेत. मुलगी ही दुःखाचं कारण आहे, तर पुत्र आकाशातील सूर्याप्रमाणं प्रकाशमान आहे. या कल्पना प्रथम ब्राह्मणग्रंथांतच आढळतात. मुलीचा पती ठरवण्याचा अधिकार पित्याला दिलेला आहे.

यानंतरचा काळ आहे ‘धर्मसूत्रां''चा. या सूत्रांनुसार स्त्री ही बालपणी पित्याच्या, तरुणपणी पतीच्या आणि वृद्धापकाळात पुत्राच्या सर्वाधीन आहे. स्वतंत्रपणे धर्मकृत्य करण्याचा तिला अधिकार नाही. विवाहित स्त्रियांच्या कर्तव्यांबाबत धर्मसूत्रांनीच प्रथम काटेकोर आदेश दिले आहेत. ते त्या काळात प्रचलित अशा ‘पुरुषप्रधान संयुक्त कुटुंब’ पद्धतीला अनुसरून आहेत. पुढे प्रादेशिक व नागरी संस्कृतीच्या उदयाबरोबर स्वतंत्र कुटुंबसंस्था सुरू झाली. कुल किंवा गण यांची जागा ‘कुटुंबा’नं घेतली. त्यातूनच विवाहाचा उद्देश हा आपल्या संपत्तीला व पितरांना पिंड देण्याकरता ‘वारस’ मिळवणं हा झाला. तशा अर्थाची वचनं ‘धर्मसूत्रां’त आहेत. स्त्रीला पतीकडूनच पुत्र व्हावा, यासाठी स्त्रियांवर अनेकविध मर्यादा घातल्या गेल्या.

‘धर्मसूत्रां’नंतरचा काळ आहे ‘कौटिल्याच्या अर्थशास्त्रा’चा. अर्थशास्त्र हा काही धर्मग्रंथ नव्हे; पण विवाहधर्म, स्त्रीधन, घटस्फोट, पोटगी, पुनर्विवाह अशा अनेक तरतुदींची त्यात तपशिलानं चर्चा केली आहे. मुख्य म्हणजे विवाहांचे अनेक प्रकार दिले आहेत. आर्ष, दैव, गांधर्व,आसुर,राक्षस आणि पैशाची. पहिल्या चार प्रकारांत घटस्फोटाची तरतूद नाही, फक्त शेवटच्या दोन प्रकारांत ती आहे. मुलगी बारा वर्षांची आणि पुरुष सोळा वर्षांचा झाला, की दांपत्यव्यवहारास योग्य होतो, असं म्हटलं आहे. स्त्रियांच्या बाबतीत कौटिल्य हा ‘धर्मग्रंथां’पेक्षा उदार होता, असं दिसतं. काही अटींसह पुनर्विवाहाची तरतूद आहे. स्त्रियांना नोकरीवर ठेवण्याचे व त्यांना योग्य वर्तणूक व मजुरी न दिल्यास पुरुषांना दंड करण्याचे नियम इथे प्रथमच आढळतात. कौटिल्याच्या ‘अर्थशास्त्रा’नंतर कालानुक्रमे नंबर येतो तो सर्वाधिक वादग्रस्त अशा "मनुस्मृती''चा. त्याविषयी... पुढच्या लेखात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com