ओळख जपणारे कासवांचे गाव

ओळख जपणारे कासवांचे गाव

वेळास रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तरेकडील टुमदार कोकणी गाव. हे गाव सावित्री नदीच्या मुखाशी आणि बाणकोट किल्ल्याला लागून. दोन रस्ते आणि दुतर्फा घरे असा आटोपशीर पसारा. मंडणगड तालुक्‍याच्या टोकावरच्या वेळासने गावपण टिकवून ठेवले आहे; काळाच्या ओघात अनेक बदल झाले तरी.  कासव संवर्धन प्रकल्पामुळे ते जगाच्या नकाशावर आले आणि पर्यटकांची मांदियाळी येऊ लागली. येथे पर्यटक गावपण अनुभवतात आणि इवल्याशा कासवांच्या समुद्रप्रवासाचा प्रारंभ अनुभवतात. गावकरी या पर्यटकांचे आदरातिथ्य मनापासून करतात. त्यासाठी काही सुविधा निर्माण केल्या गेल्या, तरीही वेळासचे वैशिष्ट्य कायम राहिले.

वेळासला समुद्रकिनारा आहे. जवळच बाणकोटची खाडीही असल्यामुळे पर्यटकांची चांगली वर्दळ असते. गावातच खूप जुने श्री भैरी मंदीर आहे. नाना फडणवीसांचे मूळ घर आणि लक्ष्मी मंदिरही येथे आहेत. सायंकाळी वेळासच्या समुद्र किनाऱ्यावरून सूर्यास्तही एकदा अनुभवावा असाच. वेळासपासून जवळच बाणकोट गाव आहे. गावाजवळून वाहणारी सावित्री नदी अरबी समुद्राला मिळते. येथे नदीचे खाडीत रूपांतर झाले आहे. बाणकोटजवळ डोंगरावर बाणकोटचा चौकोनी किल्ला आहे. त्याचा इतिहास पहिल्या शतकापर्यंत जातो. त्या काळात त्याचे नाव मनगोर किंवा मंदारगिरी असे होते. तेव्हा बाणकोटची खाडी परदेशी व्यापारासाठी प्रसिद्ध होती. देश विदेशातील व्यापाऱ्यांची गलबते बाणकोटच्या खाडीत मालाची चढउतार करतात. बाणकोटचा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आल्यानंतर त्याचे नाव हिंमतगड ठेवण्यात आले. समुद्रसपाटीपासून किल्ल्याची उंची सुमारे ३००फूट आहे. हा किल्ला १५४८मध्ये आदिलशाहच्या ताब्यात गेला. सन १५४८ते १६९९पर्यंत तो पोर्तुगीजांच्या १६९९ ते१७१३ पर्यंत जंजिऱ्याच्या सिद्धीच्या, १७१३ ते १७५५पर्यंत मराठ्यांच्या आणि १७५५ ते १९४७मध्ये स्वातंत्र्य मिळेपर्यंत तो ब्रिटिशांच्या ताब्यात होता. बाणकोटमधील रामेश्‍वर मंदीर मोरोबादादा फडणवीस यांनी तर काळभैरव मंदीर नाना फडणवीस यांनी बांधले आहे. 

येथून खाली उतरले की झाडांच्या आड लपलेले वेळास दिसते. कासवांमुळे जगभर नाव झालेले. समुद्र किनाऱ्यावर सागरी कासवे रात्रीच्यावेळी खड्डा तयार करतात. त्यामध्ये १००ते १५०अंडी घालून खड्डा बुजवतात. ही अंडी नैसर्गिरित्या उबून ४५ ते ५५दिवसानंतर पिल्ले बाहेर पडतात. अंड्यातून बाहेर पडल्यानंतर ४-५दिवसांनी ती वाळूतून बाहेर पडून समुद्राच्या प्रवासाला निघतात. अंडी घातल्यानंतर कासव कधीही घरट्याकडे परत येत नाही. वाळूवरील कासवांच्या पावलांच्या ठशांचा माग काढून काही लोक अंडी काढून त्यांची चोरी करत. स्थानिक ग्रामस्थ, वन विभाग तसेच सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेच्या जनजागृतीने त्याला आळा बसला. त्यासाटी कासव महोत्सव सुरू केला. ज्या कालावधीत कासवांची पिले समुद्राच्या दिशेने चालू लागतात, ते दृश्‍य डोळ्यांत आणि कॅमेऱ्यात साठविण्यासाठी पर्यटक येथे उपस्थिती लावतात.

गावातील महिला बचत गटाच्या सदस्यांनाही कासव संवर्धन प्रकल्पातून चांगला रोजगार मिळतो. वेळासचा सागर किनारा, माड, काजू आणि पोफळीच्या बागा, आमराया, फणस, रातांबे, विहिरी व पारंपरिक शेती इथे येणाऱ्या परदेशी आणि देशी पाहुण्यांना आकर्षित करते. कोकणी पदार्थ आणि वस्तू तसेच कासव स्मृतिचिन्हांच्या विक्रीतून तरूणांनाही उत्पन्न मिळते. चिपळूणच्या सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेचे अध्यक्ष भाऊ काटदरे म्हणाले, ‘‘सागरी कासव संवर्धनाचे काम १४वर्षे सातत्याने सुरू आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर या कामातून हजारहून अधिक घरटी संरक्षित केली असून, ५०हजारांपेक्षा अधिक पिल्ले समुद्रात सोडण्यात आली आहेत’’. तर ग्रामस्थ अभिनल केळस्कर सांगतात, ‘‘गावात मार्च ते एप्रिल दरम्यान कासव महोत्सव होतो. वेळासमधील घरे अतिशय सुंदर आणि पारंपरिक पद्धतीची आहेत. कोकणी घरात आणि कोकणी वातावरणाचा अस्सल अनुभव वेळासमध्ये मिळतो. सहल आणि प्रकल्प मार्गदर्शक या माध्यमातून गावकऱ्यांना चांगला पैसा मिळतो आहे. वेळासमधील अर्थकारणाला पर्यटनाने गती दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com