जिंकलेले रण आणि धुमसते बर्फ

india-pakistan
india-pakistan

भारताने १९६५च्या युद्धात पाकिस्तानला धूळ चारली आणि अखेर रशियाच्या मध्यस्थीने त्या युद्धाची समाप्ती २३ सप्टेंबरला झाली होती. त्या युद्धाला साडेपाच दशके पूर्ण झाली आहेत. आत्ताच्या काळात सीमेवरील भारतापुढची आव्हाने उग्र होत असताना त्या युद्धाचे स्मरण आवश्‍यक आहे.

हिमालयावरचा प्रचंड हिम वितळून गेला आहे. झेलम, चिनार, सतलज, रावी व बियास या नद्यांमधून प्रचंड पाणी वाहून गेले आहे. कृतघ्न शेजाऱ्यांना शहाणपण सुचलेले नाही. पंचशीलचा नारा, ताश्‍कंद करार हे दिवास्वप्न ठरत असून आपली वायव्य सीमा पंचावन्न वर्षांनंतरही तापलेली आहे. शत्रू सीमेवर वाकुल्या दाखवत कुरापती काढत आहे. एक शेजारी सख्खा असून सावत्रासारखा वागत आहे, तर दुसरा अजूनही ‘चाऊ-माऊ’च्या ( चौ एन लाय व माओ) स्वप्नातच वावरत आहे. दोन महायुद्धे अनुभवल्यामुळे पाश्‍चिमात्य देशांना युद्ध पेटले तर ते पूर्वेत पेटावे असे वाटत आहे. त्यामुळे आशिया हे युद्धक्षेत्र राहो, ही त्यांची इच्छा. पौर्वात्य देशांनी याचे भान ठेवणे गरजेचे आहे. या पार्श्‍वभूमीवर ५५ वर्षांपूर्वी पाकिस्तानशी झालेल्या युद्धाचे स्मरण ठेवणे आवश्‍यक आहे.

पाकिस्तानी सेनेची धूळधाण
११ऑगस्ट १९६५ ह्या दिवशी हाजीपीर खिंडीच्या क्षेत्रात आपल्या वीर जवानांनी एक डिव्हिजन म्हणजे अंदाजे तीस ते बत्तीस हजार ‘जिब्राल्टर फोर्स’च्या पाकिस्तानी सैनिकांचे कंबरडे मोडून काढले. १९४७-४८ च्या युद्धाप्रमाणे या युद्धातही पाकिस्तानी लष्कराने टोळीवाले म्हणून प्रशिक्षित सैनिक भारतीय काश्‍मीरच्या हद्दीत घुसवायचा प्रयत्न केला. आमच्या इन्फन्ट्री ब्रिगेडने छाम्ब-जेरियामध्ये हवाई छत्री (एअर कव्हर) मिळताच १००च्या आसपास पॅटर्न रणगाड्यांनी हल्ला करणाऱ्या पाकिस्तानी सेनेची धूळधाण उडवली.  भारताने त्या युद्धात पाकिस्तानचा ८०० चौरस किलोमीटरपेक्षा अधिक प्रदेश जिंकला होता, तर पाकिस्तानने आपला अंदाजे दोनशे चौरस किलोमीटरएवढा प्रदेश जिंकला होता. आठ एप्रिल ते ३० जून १९६५पर्यंत ‘ऑपरेशन जिब्राल्टर’ या नावाने व  एक सप्टेंबर ते २३ सप्टेंबर या काळात ते युद्ध ‘ऑपरेशन ग्रॅंडस्लॅम’ या नावाने लढवले गेले. पाकिस्तानला तत्पूर्वी अमेरिकेने आठशे पॅटर्न रणगाडे, ५५० लढाऊ विमाने पुरवली होती. त्या अस्त्र-शस्त्रांची चाचणी घेण्याकरता आणि  देशांतर्गत पातळीवर विरोधी वातावरण तयार झाल्यामुळे अयुबखान यांनी या युद्धाचे दुःस्साहस केले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अतुलनीय शौर्य
या युद्धात भारतीय वीरांना २१३ शौर्यपदके जाहीर झाली होती. लेफ्टनंट कर्नल अर्देशीर तारापोर हे पुण्याचे रहिवासी होते. त्यांना परमवीर चक्र(मरणोत्तर) जाहीर झाले होते. अर्देशीर तारापोर ह्यांचे पूर्वज मराठ्यांच्या आरमारात दर्यासारंग होते. त्यांचे शालेय शिक्षण पुणे येथील दस्तूर माध्यमिक शाळेत झाले. चविंदाच्या संग्रामात तुटपुंज्या सैन्य व रसदीसह त्यांना जसोर-बुत्तुर-डोंगराडी या प्रदेशात पाकिस्तानी सैन्याला हुसकावण्याचे आदेश देण्यात आले होते. ते ‘सतरा पूना हॉर्स कॅव्हलरी’चे नेतृत्व करत होते. त्या रणक्षेत्रात पाकिस्तानची एक डिव्हिजन ( तीस हजार सैनिक) तैनात होती. बझीरअली या भागातून तारापोरांची पलटण फिलोराकडे कूच करत असताना कर्नल जखमी झाले. त्यांना रूग्णालयात दाखल होण्यास सांगण्यात आले. त्यांनी नम्रपणे नकार देत लढत राहणे पत्करले. त्यांच्या तुकडीने पाकिस्तानी साठ पॅटर्न रणगाड्यांना धुळीस मिळवले. तारापोर यांनी रणांगणात देह ठेवला. ६५ च्या युद्धात तत्कालीन लेफ्टनंट कर्नल अरुणकुमार वैद्य यांनी एक सप्टेंबर ते २३ सप्टेंबर दरम्यान अस्सलउत्तर व चिमा या पश्‍चिम सीमेवरील ‘डेक्कन हॉर्स तुकडी’चे नेतृत्व करत शत्रूच्या छत्तीस पॅटर्न रणगाड्यांना नामोहरम केले आणि खेमकरण सेक्‍टरमध्ये घुसत शत्रूचे नापाक इरादे धुळीस मिळवले म्हणून त्यांना महावीर चक्र देऊन गौरविण्यात आले. पुढे ते देशाचे लष्करप्रमुख होऊन निवृत्त झाले. त्यांना बांगलादेश मुक्ती संग्रामात (१९७१) महावीर चक्र मिळाले होते. ज्या भागात हा संग्राम घडला त्या भागाचे नाव ‘पॅटर्न नगर’ पडले. याच परिसरामध्ये अब्दुल हमीद यांनाही अशाच पराक्रमाबद्दल परमवीर चक्र (मरणोत्तर) जाहीर झाले.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

   बर्फाचे तट पेटून उठले... 
उत्तर-पश्‍चिम सीमा आजही पेटली असून हिम वितळत आहे. ‘ बर्फाचे तट पेटूनि उठले | सदन शिवाचे कोसळले ||  हे कुसुमाग्रजांचे काव्य आठवते. सांप्रतकाळी अशीच अभद्र युती तयार होऊन चीन व पाकिस्तान भारताकडे वाकड्या नजरेने पाहत आहेत. चीनच्या वाढत चाललेल्या वसाहतवादाच्या राक्षसी आकांक्षेला खीळ बसणे गरजेचे आहे. अनेक राष्ट्रांशी चीनचा सीमेवरून संघर्ष चालू आहे. आज ती राष्ट्रे आपल्याबरोबर असून आपल्याकडे अपेक्षेने पाहत आहेत. अमेरिका आजच्या घडीला भारताबरोबर आहे. भारतीय सेनादल शस्त्र सज्ज असून ‘गरुड भरारी’ घेण्यास उत्सुक आहेत. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आठवण पासष्टच्या युद्धाची

  • आठ एप्रिल ते ३० जून १९६५पर्यंत ‘ऑपरेशन जिब्राल्टर’  एक सप्टेंबर ते २३ सप्टेंबर या काळात‘ऑपरेशन ग्रॅंडस्लॅम’ या  नावाने  ते युद्ध लढवले गेले. 
  • अमेरिकेकडून पाकिस्तानला शस्त्रपुरवठा.
  • पाकिस्तानच्या पॅटर्न रणगाड्यांचा धुव्वा
  • भारताने पाकिस्तानचा ८०० चौ.कि.मी. भूभाग जिंकला.

( लेखक निवृत्त लष्करी अधिकारी आहेत )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com