आई-बाबा, मला दोघेही हवे आहात

reliationship
reliationship

खरंतर हा प्रसंग कुठल्याच मुलाच्या आयुष्यात कधीही येऊ नये, ना लहान ना मोठ्या! अत्यंत अवघड असतं पालकांमध्ये दोघांपैकी एकाला निवडणं... पण आजकाल ही खूप सर्रास गोष्ट झाली आहे. आपण त्या द्विधा मनःस्थितीत अडकलेल्या मुलांच्या मनातील भावभावनांचा विचार करणार आहोत. नवरा- बायकोच्या भांडणात २ मुले घेऊन बायको आई-वडिलांकडे येऊन राहते. दोघांचे अहंकार एवढे वाढलेले असतात, की त्यात २ कोवळ्या मनांचा विचार होतच नाही. तिथूनच सुरुवात होते ती न व्यक्त होणाऱ्या भावनिक हिंदोळ्यांची... 

मुलांचे वय अंदाजे सात वर्षे आणि २ वर्षे. इतक्‍या छोट्या मनाला काय कळणार ते हेवेदावे? त्यांना फक्त आई आणि बाबा एकत्र हवे असतात; पण हे आईबा-बांच्या पचनी पडत नाही. मग मुलांच्या राहण्या- खाण्यापिण्याचा विचार, मुलांच्या मनाचा विचार हा कुठे राहतच नाही. राहतो तो फक्त राग, खुन्नस! मग ताब्यासाठी, भेटीसाठी कोर्टात अर्ज येतात. अहंकाराचे भांडण सुरू होते. कोणी एक माघार घ्यायला तयार नसते. मुलांना याची भनकही नसते. मग त्या कोवळ्या मनांचा, प्रौढत्वाकडे प्रवास सुरू होतो. त्यांना प्रत्येक वेळी आई किंवा बाबांपैकी कोण चांगला आणि एक कोण वाईट याचे प्रात्यक्षिक देण्यासाठी वाटेल तो थर गाठला जातो. 

खरंतर वैयक्तिकरीत्या मला वाटते, अगदी एखादा अपवाद सोडला तर आई ही मुलांच्या मनाचा जितक्‍या हळुवारपणे विचार करू शकते, तितका वडिलांना करता येणं शक्‍य नसतं. इथे आई-वडिलांच्या समजूतदारपणाची कसोटी लागते. पण त्यांची जबाबदारी ते न्यायालयावर सोपवतात. मुलं खरंतर दोघांची, त्यांना दोघांचीही तितकीच गरज असते. मग कोण वाईट, कोण चांगलं या गोष्टी खूप दूर राहतात.  मुलांच्या इतर गरजा बघण्यापेक्षा त्यांना एकमेकांना कमीपणा कसा दाखवता येईल यातच दोघांना जास्त रस असतो. मुलं आईकडे असतील तर वडील स्वतःहून त्यांच्या खर्चाची जबाबदारी उचलतात, असं कधी होताना दिसत नाही. अशावेळी ते न्यायालयाच्या हुकमाची वाट बघतात. 

दोन्ही मुलांच्या ताब्याची वेळ येते तेव्हा मुलांना हे सगळं फार मानसिक त्रास देणारं असतं. ती व्यक्त करू शकत नाहीत. त्यांचे डोळे, त्यांचा चेहरा वेगळंच काहीतरी बोलत असतो. मुलांचे वय लहान असले तरी त्यांना काहीच समजत नाही, असे म्हणणे चुकीचे ठरते. आई-वडिलांच्या भांडणात मुलांचा प्यादासारखा वापर पालकांकडून केला जातो. 

न्यायालयात एका जोडप्याच्या दोन्ही मुलांना आणण्यात आले. इतके दिवस आईबरोबर राहिलेली दोन्ही पिल्लं भेदरलेलीच होती; पण वडिलांना पाहून काहीशी उत्साहितपण होती. खूप उत्साहाने बाबांना मिठी मारली; पण आईलाही बरोबर घेऊन जाऊ असं सतत बोलत होती. आई-बाबांना एकत्र आणणे अशक्‍य होते; पण त्या कोवळ्या मनांची होणारी घालमेल डोळ्यांत पाणी आणणारी होती. 

न्यायालयात घटस्फोट अनेक होतात, त्याचा उद्रेक या लहान मुलांच्या मनामध्ये होताना दिसतो. अशा परिस्थितीत मुलांच्या शारीरिक व मानसिक गरजा काय आहेत हे पाहताना मुलांचे वय, लिंग, मानसिक गरजा, घरातील वातावरण या सगळ्या गोष्टी पाहणे अत्यंत आवश्‍यक असते. कारण मुलांच्या दृष्टीने रोज भांडत राहणाऱ्या पालकांबरोबर राहण्यापेक्षा एका कोणाबरोबर शांतपणे राहणे फायद्याचे ठरते. 

अगदी नवजात बालकालाही बरंच काही कळतं. बारकाईने बघितल्यास, आपण ओरडलो, डोळे मोठे केले तर ते नवजात बाळसुद्धा रडतं आणि आपण हसलो की तेही हसतं. आनंद होतो, दुःख होतं हे सगळं काही त्यांना समजतच असतं. पण शब्दात व्यक्त होता येत नाही. म्हणून प्रत्येक आई-वडिलांना कळकळीची विनंती करावीशी वाटते, की नवरा- बायको होऊन विचार करण्यापेक्षा आई-वडील होऊन विचार करावा. कारण प्रत्येक मुलाला आपले आई-वडील हे आदर्शच वाटत असतात. आईच्या उबदार हातांची मुलांना गरज असते, तसेच बापाच्या कणखर हातांचीही तितकीच गरज असते. प्रेमाने संसार करताना होणारं मूल हे दोघांचं असतं; पण त्या संसारात वादाची ठिणगी पडली, की ते मूल कुणा एकाचं होऊन जातं आणि या वादाची ठिणगी त्या लहानग्याचं आयुष्य उद्‌ध्वस्त करून टाकते. मूल ही एक स्वतंत्र व्यक्ती आहे, याची वारंवार जाणीव पालकांना करून द्यावी लागते. परिणामी, मुलांना समज येऊ लागते तसे आई आणि बाबा दोघेही वाईट आहेत असं त्यांना वाटू लागतं. याचा दूरगामी परिणाम मुलांच्या संपूर्ण आयुष्यावर होतो. पालकांनी एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे, झाड कितीही वाढलं तरी त्याला मातीविना अस्तित्व नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com