परीक्षा जवळ आली की तुमच्यावरील ताण वाढतो का? मग हे वाचाच...

Article about stress and performance for students
Article about stress and performance for students

रिव्हिजन करण्यासाठी आपण पुस्तक हातात घेतो तेव्हा आपल्या लक्षात येते की, आजपर्यंत आपण केलेल्या अभ्यासातील काहीच आठवत नाही. तुम्ही तो भाग पाठ करायला घेता. इतर विषयातील प्रकरण आठवते का, हे चेक करता आणि तुम्हाला जाणीव होते की, आपल्याला कुठल्याच विषयातील काहीच आठवत नाही. खरे तर आजपर्यंत दिवसरात्र एक करून जीव तोडून अभ्यास केलेला असतो. प्रचंड मेहनत घेतलेली असते; पण काहीच आठवत नाही. ही वस्तुस्थिती लक्षात आल्यावर आपण हतबल होतो. 

अभ्यास व परीक्षा हे संकट नसून मनावरचा ताण असतो; म्हणून अशा प्रसंगात फाइट म्हणजे लढताही येत नाही व फ्लाइट म्हणजे पळताही येत नाही. जेव्हा शरीर फाइट आणि फ्लाइट यापैकी कोणताच प्रतिसाद निर्माण करू शकत नसेल तर तिसरा एक प्रतिसाद आपल्या शरीरात निर्माण होतो, तो म्हणजे फ्राइट म्हणजे घाबरणे. 

आपल्या मनात तीव्र स्वरुपाची भीती किंवा धास्ती निर्माण झाली, तर आपण कितीही वाचले तरी आपल्या लक्षात राहत नाही. आपला मेंदू ब्लॅंक होतो. धास्ती वाढत जाते. शारीरिक असंतुलन तर निर्माण होतेच; पण एकदा हा अनुभव मनात नोंदवला गेला की, पुढे प्रत्येक परीक्षेच्या वेळी (मग ती कुठलीही परीक्षा असली तरी) अभ्यास करताना, इंटरव्ह्यू असला तर अथवा ज्या ठिकाणी आपल्याला खूप चांगला परफॉर्मन्स द्यायचा आहे, अशा प्रत्येक प्रसंगात धास्ती निर्माण होते व आपण अपयशी होतो. 

अशा प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी वेळेवर योग्य मार्गदर्शन मिळाले नाही, अशा अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षण अर्धवट सुटले आहे. त्यांचे करिअर उद्‌ध्वस्त झाले आहेत. याचा अर्थ आपल्या मनावर ताण असायलाच नको, असादेखील नाही. जर आपल्या मनावर कामाचा, अभ्यासाचा, परीक्षेचा अथवा कुठल्याही गोष्टीचा ताण नसेल तर आपण कृतीच करणार नाही. जसा आपल्या मनावरचा ताण हळूहळू वाढत जातो, तसतसे आपण ती कृती अधिक परिश्रम घेऊन, मन लावून करायला लागतो. त्यामुळे त्या गोष्टीतील आपला परफॉर्मन्स हळूहळू वाढत जातो. एका विशिष्ट मर्यादेपर्यंत आपल्या मनावरचा ताण वाढत गेला की, आपला परफॉर्मन्स उत्तम होतो. पण, त्यानंतरही मनावरचा ताण सतत वाढत राहिला तर मात्र फ्राइट रिस्पॉन्स (धास्ती) निर्माण होतो. 

शाळा-कॉलेज सुरू होते तेव्हा जुलै-ऑगस्टमध्ये आपण ठरवले तरी आपला अभ्यास होत नाही. पण परीक्षा जवळ आली की आपला अभ्यास खूप चांगला होतो. काही व्यक्ती याचा खूप चांगला फायदा आपल्या करिअरसाठी करून घेतात. पण, काही विद्यार्थ्यांना परफॉर्मन्सबाबत जी समस्या निर्माण होते, ती मनावरचा ताण वाजवीपेक्षा खूप जास्त वाढल्यामुळे. या समस्येवर उपाय आहे. काही मानसशास्त्रीय पद्धती, रिलॅक्‍सेशन मेथड, संमोहन यासारखे तंत्र वापरून आपण मनावरचा अतिरिक्त ताण कमी करू शकतो व आपला परफॉर्मन्स जास्तीत जास्त वाढवू शकतो. 

नकारात्मक विचारांची मालिका अन्‌ तणावनिर्मिती

परीक्षा इतकी जवळ आलेली. आपल्याला कुठल्याच विषयातील काहीच आठवत नाही. आपल्याला पुन्हा सर्व पाठ करावं लागणार. इतक्‍या कमी वेळात सर्व पाठांतर शक्‍यच नाही. मी नापास होणार. मला परीक्षेत काहीच आठवत नाही. माझी व माझ्या पालकांची खूप बदनामी होईल. नेहमी माझं असंच होतं. माझ्या हातात यशच नाही. अशा प्रकारच्या असंख्य नकारात्मक विचारांची मालिका आपल्या मनात सुरू होते आणि यातूनच आपल्या मनात तणावनिर्मिती प्रक्रिया सुरू होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com