Mahaparinirvan Din : डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महा मानवास विनम्र अभिवादन!

प्रिय बाबासाहेब ! आज तुमचा ६६वा महापरीनिर्वाण दिवस. ६६ वर्षापूर्वी अर्थात ६ डिसेंबर १९५६ रोजी तुम्ही आम्हाला सोडून गेलात. याच दिवशी मुंबईच्या चैत्यभूमीवरती अथांग जनसागर लोटला.
Sudhir Maske
Sudhir MaskeSakal
Summary

प्रिय बाबासाहेब ! आज तुमचा ६६वा महापरीनिर्वाण दिवस. ६६ वर्षापूर्वी अर्थात ६ डिसेंबर १९५६ रोजी तुम्ही आम्हाला सोडून गेलात. याच दिवशी मुंबईच्या चैत्यभूमीवरती अथांग जनसागर लोटला.

प्रिय बाबासाहेब !

प्रिय बाबासाहेब ! आज तुमचा ६६वा महापरीनिर्वाण दिवस. ६६ वर्षापूर्वी अर्थात ६ डिसेंबर १९५६ रोजी तुम्ही आम्हाला सोडून गेलात. याच दिवशी मुंबईच्या चैत्यभूमीवरती अथांग जनसागर लोटला. तो तुमचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी. आमचा बाप, वाली, कैवारी गेला आशीच भावना त्यावेळच्या प्रत्येक व्यक्तीमध्ये असल्याची प्रचीती येते. तुम्हाला अलविदा करण्यासाठी त्यावेळी तर माझा जन्म देखील झाला नव्हता. आज मी केवळ तुमच्या आंतयात्रेची तैलचित्रे, व्ही.डी.ओ कील्पस पाहूनच कल्पना करातो की भारतीय जनमाणसात तुमच्याविषय एवढे प्रेम का ? व कशामुळे होते? तेंव्हा मला कळते की तुमचे विशाल प्रज्ञावंत व्यक्तीमत्व. तुम्ही केलेले मानवमुक्तीचे सामतामुलक कार्य हेच त्याचे उत्तर !

बाबासाहेब तुम्ही सांगितलेला विचार आणि त्यालाच अनुरूप तुमचा आचार आज माझ्या सारख्या लाखो तरुणांच्या आयुष्यात स्फूर्ती आणि प्रेरणेचा स्रोत ठरत आहे. तुम्ही शोषित, पिडीत, पशुतुल्य जीवन जगणाऱ्या अस्पृश्यांना स्वाभिमानाने जगता यावे यासाठी स्वतःचे आयुष्य पणाला लावले. आमच्यात आत्मविश्वास जागा केलात तो आजही आमच्या आयुष्यात दीप स्तंभासारखा उभा आहे. तुमचे प्रज्ञावंत, शीलवंत आणि महाकारुणिक व्यक्तीमत्व एक तेजोमय दीपक बनून आमच्यतील अज्ञानरुपी अंधकार दूर करत आहे. आम्हाला दारिद्रयाचा खाईतून बाहेर काढत आहे.

मला वाटते माझे तुमच्याशी असणारे नाते एका अतूट विचाराने बांधील आहे. ते रक्ताच्या नात्यापेक्षा कितीतरी पटीने उच्च कोटीचे आहे. मी शाळेत १४ एप्रिल व ६ डिसेंबरच्या दिवशीच तुमच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून, अगरबत्त लावून तुमची पूजा करायचो. तेवढीच तुमच्याशी असणारी तोंडओळख. पुढे मी १२वी पर्यंतचे शिक्षण घेईपर्यंत देखील मला माझ्या सोशेल आंयडेनटीटी विषयची समज आणि तुमच्या कार्या विषयची पुरेशी माहिती येथल्या शिक्षण व्यवस्थेने होऊ दिली नव्हती. पण बाबासाहेब आज तुम्ही केवळ भारतातीलच नव्हे तर विश्वातील प्रत्येक शोषित, पिडीत समूहाला गुलामीचे जंजिरे तोडून मानवी हक्क आजमावाण्यासाठीची प्रेरक ललकारी देत अहात. आशावादी दृष्टीकोन निर्माण करीत अहात. आज तुम्ही विश्वाचे बाबासाहेब अहात कारण तुमचे विचारच मूलतः वैश्विक आहेत.

बाबासाहेब आज तुमचे तत्त्वज्ञान वैश्विक स्तरावर अनेक राष्ट्रामध्ये, नामांकित विद्यापीठामध्ये स्वीकारले जात आहे कारण ते मूलतः सत्यवादी, व्यवहारिक, सामतामुलक आणि विश्वव्यापी मानवतावादी दृष्टीकोन स्वीकारणारे आहे. तुमचा विचार हा मानव मुक्तीचा, शांतीचा, समतेचा आणि न्यायाचा पथ आहे. तुम्ही शोषितांच्या उत्थानासाठी विशाल प्रज्ञा विकसित केलीत. अनेक स्वरूपाचे दुखः, वेदना, अव्हेलाना झेललात पण काळापुढे कधी तुम्ही झुकला नाहीत. ना कधी तुम्ही थकला नाहीत. आलेल्या परिस्थितीला धौर्याने पुढे गेलात. अहोरात्र ज्ञानार्जन करून, चिंतन, मनन करून धारदार लेखणीच्या बळावर मनुवादी संकुचित विचारांना तिलांजली दिलात. अमानवीय, अन्यायकारक, विषमतावादी विचाराना मातीत गाड्लात. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता या आधुनिक विचारावरती भारताची लोकतांत्रिक, सार्वभौम, प्रजासत्ताक अशी ओळख विश्व पटलावर निर्माण केलात. त्यमुळे बाबासाहबे तुम्ही ग्रेट आहात आणि यापुढेही ग्रेटच राहाल.

बाबासाहेब तुम्ही सांगितलेला संविधानिक मार्गाने हक्क मिळवण्यासाठीचा लढा आज आम्ही संयमानेच लढत आहोत. तुम्ही मार्क्सच्या रक्तरंजीत क्रांतीचे खंडन करून तथागताने सांगितलेल्या साम्यवादी विचाराचा अंगीकार केलात. १४ अक्टोबर १९५६ रोजी तुमच्यामुळेच आम्हाला एक नवीन ओळख मिळाली. विविध जाती, पंथ, प्रांत, धर्म, भाषा अशा वैविध्यपूर्ण भारताला तुम्ही राज्यघटनेच्या एका धाग्यात बांधून ठेवलात. हि खरी तुमच्या सम्यक प्रज्ञचे ताकत. कारण तुम्ही म्हणाला होतात मी प्रथम भारतीय आणि अंतिमतः भारतीय ! तुमच्या ठाई असणरे हे भारताविषयीचे राष्ट्रप्रेम राष्ट्रबांधणीतील तुमच्या भरीव कार्याची ओळख करून देते.

त्यामुळे बाबासाहेब खूप खूप थांक्यू ! बाबासाहेब तुम्ही आमच्यासाठी ज्ञानाचे प्रतिक आणि विश्वबंधुता निर्माण करण्यासाठीचा चालता बोलता आचर-विचार अहात. आज माझ्यासारखे अनेक तरुण तुमचा विचाराचे पाईक बनू पाहतयात. अनेक तरुण उच्च शिक्षण घेऊन विविध संस्थामध्ये नोकरी करत आहेत. हे साध्या झाले ते केवळ तुम्ही आखलेल्या भारतीय संविधानातील सामाजिक न्यायाचा धोरणामुळेच. संविधानाच्या कलम १६ मध्ये तुम्ही तशी समानसंधी आणि सामाजिक न्यायाची तजवीज करून ठेवली. या धोरणामुळेच माझ्यासारखे ग्रामीण, अदिवाशी, दुर्गम भागातील, पाड्यातील, तांड्यतील, वाढाय-वस्तीतील पहिल्या पिढीतील तरुणांना देशातील नामांकित गुणवत्तापूर्ण व दर्जदार शिक्षण देणाऱ्या संस्थामधून शिक्षण घेण्याची संधी प्राप्त झाली.

बाबासाहेब खर सांगू का तुमची आणि माझी भेट तुम्ही लिहिलेल्या पुस्तकातून, लेखातून, आणि भाषणातूनच झाली. तुम्ही लिहले नसते तर आम्ही आजही दारिद्रयाचा खाईत चाचपडत राहिलो असतो. माझ्या सारख्या तरुणाला टाटा समाज विज्ञान संस्थे सारख्या उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थेतून पदवी आणि पदवीव्यतूर पर्यंतचे शिक्षण घेण्याची संधी कधीच मिळाली नसती. टीस आणि इतर उदारमतवादी दृष्टीकोन ठेऊन शिक्षण देणाऱ्या संस्थेमधून तुमचा विषय अधिक जाणून घेता आल. तुमची प्रेरणा आज माझ्यासारख्या लाखो तरुणासाठी रोल मॉडेल ठरत आहे. माझ्या सारखे अनेक तरुणांना गरिबीचे, दारिद्रयाचे चक्रे तोडून बाहेर पडण्यास तुमचे विचार प्रेरक ठरत आहेत. आनेक तरुण परिस्तिथीचा बाऊ न करता उच्च शिक्षण संस्थामध्ये प्रेवश घेऊन शिक्षण घेत आहेत.त्या संस्थामध्ये वंचित समूहाचे प्रतिनिधित्व करत आहेत.

चांगल्या पगाराचा नौकरी मिळू लागल्या. तुमच्या मुळेच आम्ही आज खूप साऱ्या सुख-सोयीचा आनंद घेत आहेत. या सर्व सकारत्मक परिवर्तनाची नांदी बाबासाहेब तुमीच अहात. आजदिनी आई-बापा हून भीमाचे उपकार लय हायत रं ! आणि आम्ही खातो त्या भाकरीवर बाबासाहेबाची सही हाय रं ! या कडूबाई खरात यांच्या गाण्याची आठवण होणे आपसूकच खरी ठरते. बाबसाहेब तुमचा विषय माझ्या सारख्या असंख्य तरुणामध्ये असणारे प्रेम, आदरभाव हाच तुमच्या विचाराचा विजय आहे. आज काही शिकलेले तरुण नौकरदार, डॉक्टर, इंजिनीअर, वकील, कॅरपोरेट क्षेत्रामध्ये काम करणारे युवक लोभी-भोगी भौतीकवादाच्या चक्रात अडकत चालले असले तरी मला पूर्ण विश्वस आहे की तुम्ही पाहीलेले प्रबुद्ध भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी आम्हा तरुणांना परत तुमच्या विचारशीच बांधील राहून कार्य करावे लागेल. उद्या आमच्या मुलाबाळांच्या उज्वल भवितव्यसाठी देखील तुम्ही सांगितलेल्या बुद्धाच्या मार्गावरूनच चालावे लागेल. तुम्ही सांगितल्याप्रमाणे धम्माची एक सांस्कृतिक ओळख निर्माण करवी लागेल आणि त्यानुरूप आचरण करावे लागेल.

तुम्ही लिहिलेला १९१६ सालचा पहिला निबंध जो तुम्ही कोलंबिया विद्यापीठा मध्ये सादर केला होतात. भारतातील जातीव्यवस्था : उत्पती, संरचना, आणि विकास, भारतातील जाती व्यावस्थेचे समूळ उच्चाटन (१९३६). बुद्ध आणि त्यांचा धम्म (१९५६). या लेख आणि पुस्तकातून जात आणि अस्पृशता काय असते? ती आम्ही भोगली, अनुभवली होती.याविषयची नेमकी आणि आचुक आता आम्हाला उच्च शिक्षणामुळे येत आहे. तुम्ही लिहिलेले लेख, पुस्तके आणि भाषणे आमच्या वाचनात येत आहेत. तसेच इतरही लेखकांनी तुमच्यावर लिहिलेली अनेक पुस्तके, लेख, निंबध वाचून आम्ही तुम्हाला अधिकाधिक समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. आज जरी मी शिक्षेकी पेशात नौकरी करीत असलो तरी तुमचा विद्यार्थीच आहे. कारण तुम्हाला समजून घेण एवढ सोपं नाही. तुमची प्रज्ञा विशाल अशा महासागरा एवढी आहे. ती आजून तरी माज्या कवेत आली नाही. तुमचे दोन्ही पी.एच.डी विषयाचे संशोधन मूलतः अर्थशास्त्र संबंधीचे होते परंतू अर्थशास्त्राचा उपयोग तुम्ही कधी स्वतःसाठी किंवा कुटुंबाच्या उनायांनासाठी केला नाही. कधी तसा भाव ही तुमच्यात निर्माण झाला नाही. सोबतच तुम्ही कायदा, विधी, शिक्षण, इतिहास, मानववंशशास्त्र, सिंचन, समाजशास्त्र अशा अनेक अंतर-विद्याय शाखेचा ज्ञानाचा उपयोग मानवी कल्याणासाठी केला त्यामुळे तुमचे व्यक्ती बहुआयामी आणि व्यपक आहे.

भारतातील आजची विदारक विषमतावादी, सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक परिस्थितीचे अवलोकन करता तुमचे विचारच मला भरताचा उज्जवल भविष्यासाठी अधिक समर्पक वाटतात. आज तुम्ही आम्हा तरुणांना मानवी कल्याणाचे कार्य करण्याची साद घालत आहत. तुम्ही म्हणाला होतात “लाईफ शुड बी ग्रेट रादर देन लॉंग’’ हा विचार आम्हा तरुणाना विश्वातील तमाम शोषित, दिन, दलित, वंचित, पिडीत आदिवाशी, अल्पसंख्याक

यांचा हक्काचे संरक्षण करण्यासाठी. हिंसावादी, द्वेषमुलक विचाराना छेद देण्यासाठी प्रवृत्त करत आहेत. पहिल्या पिढीतील देशातील उच्च शिक्षण संस्थामधूम शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या, सध्या शिकत असलेल्या लाखो तरुणांनाकडून विनम्र अभिवादन !! जय भीम...जय प्रबुद्ध भारत !!

(लेखक दिल्ली समाजकार्य विभाग, दिल्ली विद्यापीठ येथे असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. email : sudhir.dssw@gmail.com)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com