

Bihar election results 2025
esakal
भारतीय जनता पक्ष आणि संयुक्त जनता दल यांच्या आघाडीने दोनशे जागांचा टप्पा पार करीत बिहारच्या निवडणुकीत विरोधकांना चारीमुंड्या चीत केले आहे. राष्ट्रीय जनता दल व काँग्रेसची दयनीय अवस्था झाली असून, ‘एनडीए’चे मनोधैर्य या निकालाने वाढणार, यात शंका नाही.
बिहारमध्ये असे कधी झाले होते का? कोणालाच आकडेवारी आठवत नसेल. राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए ) २०१० मध्ये जिंकलेल्या २०६ जागांच्या तुलनेत त्याच्या जवळपास कामगिरी केली आहे. ‘आरजेडी’ला एवढ्या जागा मिळालेल्या नाहीत, की त्यांना विरोधी पक्षनेतेपदाचा दर्जा मिळू शकेल. काँग्रेसची परिस्थिती त्याहूनही वाईट आहे. त्यांना कसेबसे आपल्या पक्षाचे खाते उघडता आले आहे. अतिशय खराब कामगिरी करणारी सीपीआयला (एमएल) देखील दोन जागा जिंकता आल्या आहेत. ज्यांना ‘महागठबंधन’ सोबत घेतले गेले नाही त्या ओवेसी यांच्या पक्षाच्या खात्यात पाचपेक्षा जास्त जागा दिसत आहेत. एकप्रकारे बिहार विधानसभेत विरोधकांचा पार निकाल लागलेला आहे. भारतीय जनता पक्ष राज्यातील सर्वांत मोठा पक्ष बनला आहे आणि आता त्यांनी ठरवले तर ‘जेडीयू’ला सोडून देऊन इतर सहयोगी पक्षांसोबत सरकार स्थापन करू शकतील, पण असा धाडसी निर्णय तो पक्ष घेणार नाही.