

Importance of Books in Human Life
esakal
तुम्ही एवढे हल्ले होऊनही टिकून राहिलात, असा प्रश्न मला नेहमी पडतो. त्याची उत्तरं शोधताना मन अनेक दिशांना भरकटत जातं आणि सगळ्या उत्तरांच्या घुसळणीतून एक उत्तर समोर येतं. ते म्हणजे तुम्ही तुमच्या कवेत माणसांचं अनुभवविश्व साठवून ठेवता. तुम्ही जगलेल्या, दुःख भोगलेल्या, आनंद साजरा केलेल्या, विरह सोसलेल्या माणसांच्या कितीतरी अनुभवविश्वांना, कथाकहाण्यांना आणि कथनांना तुमच्या आत जपून ठेवलं. त्यांना आईसारखं वाढवलंत. जपलंत. जोजवलंत... आणि हे विश्व, या कहाण्या, या कथाच तर माणसांना जगण्याचा आधार देतात. त्याला वेगळ्या जगात नेतात.
अजून चार दिवसांनी म्हणजे नेमकेपणाने सांगायचं तर २३ एप्रिल रोजी तुमचा दिवस- जागतिक पुस्तक दिन! म्हणून तुम्हाला हे पत्र...
खरं सांगायचं, तर माझ्यासाठी आणि माझ्यासारख्या तमाम पुस्तकप्रेमी, पुस्तकवेड्या आणि पुस्तक-संग्राहकांसाठी पुस्तक दिन रोजच असतो. किंबहुना प्रत्येकासाठी तो रोज असला पाहिजे, अशी आयडिअल सिच्युएशन निर्माण झाली तर किती चांगलं होईल?
लौकिकार्थाने तुम्ही निर्जीव वस्तू. अर्थशास्त्राच्या रोखठोक, कोरड्या भाषेत एक उत्पादन. किंवा विक्रेत्यांच्या भाषेत- माल. आणि या दोन्ही शब्दांमधून प्रतीत होणारा अर्थही तसा खरा, ठोक. पण तरी माझ्यासारख्या अनेकांना तुम्ही जिवंत माणसांसारखे वाटता. जरी तुम्ही बोलत नसलात, तुम्हाला पाय नसले आणि हलतडुलत नसलात तरीही...
कारण एकदा मन तुमच्यात शिरलं की तुम्ही त्याला कुठच्या कुठे नेऊ शकता. आजूबाजूचं वास्तव विसरायला होतं. मन सिंदबादच्या सफरीवर जाऊ शकतं, किंवा ॲलिसच्या रॅबिटहोलमध्ये शिरू शकतं किंवा जीएंच्या अद्भुत विश्वात प्रवेश करू शकतं. किंवा दया पवार, शरणकुमार लिंबाळे यांच्या दाहक अनुभवांच्या चटक्यांनी होरपळून निघू शकतं किंवा नामदेव ढसाळांच्या कवितांनी हादरून जात पेटून उठू शकतं. तुम्ही कुणाला विचारप्रवृत्त होऊ शकता, नवी दृष्टी देऊ शकता आणि जगलेल्या अनुभवांकडे पार वेगळ्या दृष्टिकोनातून, उलटंपालटं पाहायला लावू शकता.