ढिंग टांग : घाईलादेखील उशीर लागतो..!

कुठल्याही कामात माणसाने घाई करु नये. अति घाई, संकटात नेई!! केवळ लोक म्हणतात म्हणून उरापोटी धांव धांव धांवायचे आणि कामे मात्र अर्धवट करुन ठेवायची, हे वागणे बरे नव्हे.
british nandi writes bjp shiv sena eknath shinde devendra fadanvis govt cabinet exapansion
british nandi writes bjp shiv sena eknath shinde devendra fadanvis govt cabinet exapansion sakal

आज करै सो कल कर, कल करै सो परसो,

इतनी भी क्या जल्दी है, जब जीना है बरसों?

कुठल्याही कामात माणसाने घाई करु नये. अति घाई, संकटात नेई!! केवळ लोक म्हणतात म्हणून उरापोटी धांव धांव धांवायचे आणि कामे मात्र अर्धवट करुन ठेवायची, हे वागणे बरे नव्हे. पुरेसा वेळ देऊन, साधकबाधक विचार करुन साकल्याने, विवेकबुद्धीने काम घेतले पाहिजे. अचूक निर्णयात कुठल्याही कार्याचे निम्मे यश सामावलेले असते. घाईगडबडीने काही करुं गेल्यास काम नासते!

कल करै सो आज कर, आज करै सो अब,

पल में परलय होगी, बहुरी करैगा कब?

असा दोहा खूप वर्षापूर्वी संत कबीराने लिहून ठेवल्याचे आम्हाला सांगण्यात आले होते. मूळ दोहा आम्ही वर दिला आहेच. त्या काळी प्रलयाचे फार्फार भय असे. आता विज्ञान तंत्रज्ञान पुढे गेल्यामुळे प्रलयाची तितकीशी भीती उरलेली नाही. ‘उगी राहून जे जे होईल तेते पहावें’ अशीही संतवाणी आम्ही ऐकून आहो!

एकंदरित घाई काही उपयोगाची नाही. सांप्रतकाळी मंत्रिमंडळ विस्तारासाठी विरोधकांकडून भयंकर घाई केली जात आहे. आम्ही या घाईचा निषेध करतो. भलत्या गोष्टीत घाई कसली करता? इथे महाराष्ट्राच्या साडेतेरा कोटी जनतेच्या भविष्याचा प्रश्न आहे. उगीच उतावळेपणाने काही करु गेल्यास भलतेसलते काही होऊन बसले मग? कोण जबाबदारी घेणार आहे? तेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार अगदी सावकाश, आरामात पार पाडावा, असा आमचा सल्ला आहे. तुम्हांसही तो पटेल!!

शहाण्या माणसाने ताकदेखील फुंकून प्यावे. उगीच उकळत्या चहाचा कोप तोंडाला लावला तर जीभ पोळते. जीभ पोळली की भाह्या बदयते! हब्द हींट हुय्यायता येत आंहीट! मग बोलणेच खुंटते. बोलणे खुंटले की आपापत: राजकारणही आखुडते. पर्यायाने जनहिताचा घात होतो. ‘ठंडा करके खाव’ अशी म्हणच आहे मुळी. सूड हा पदार्थही थंडच खावा म्हणतात. असो. वास्तविक विस्ताराची घाई कोणालाही नाही. कारभारात सगळे काही ओक्के आहे. चिंता पडली आहे, ती विरोधकांना! रोज मेले दिवस मोजताहेत!! आज पस्तिसावा, उद्या छत्तिसावा, परवा सदतिसावा…घोका म्हणावे पाढे! त्यामुळे काय होणार आहे? नॉन्सेन्स!

येथे आम्ही एक आधुनिक लघु-लोककथा सांगू : कोरोनाकाळात एका भल्या व्यावसायिकाने नाइलाजाने आपल्या मालकीच्या आस्थापनेतील कर्मचारीवर्ग कमी करण्याचे ठरविले. सर्वांना रजा देऊन कोरोनानंतर पुन्हा सेवेत घेऊ असे माणुसकीचे आश्वासन दिले. कर्मचारीवर्ग घरी बसला! नोकरीत फक्त दोघांना ठेवून मालकाने बाकी सर्व स्टाफ घरी पाठवल्यानंतरही आस्थापनेचे काम नीट चालले. कां की उरलेल्या दोघांनी दिवसरात्र मेहनत करुन यश संपादिले. कोरोना गेला! तरीही मालक कर्मचाऱ्यांस कामावर घेईना झाला. असे का? असे विचारताच तो वदला, ‘‘सवंगड्यांनो, जे काम दोघांना जमते, त्यासाठी बारा-पंधरा लोकांना वेतन देण्याइतका खुळा मी आता उरलो नाही! माझे कोठे काय अडले आहे? सबब, तुम्ही दुसरीकडे चाकरी बघा! ’’ कर्मचारी गयावया करु लागले. तेव्हा मालक मायेने म्हणाला, ‘‘सवड मिळेल तेव्हा तुम्हांस पुन्हा नौकरीत घेऊ. जा आता घरला!’’ तरीही कर्मचारी ऐकेनात! मग मालकाने आळस दिला, व म्हणाला, ‘‘ घेऊ हो, लौकरच घेऊ. काय घाई आहे?’’

नीतीपाठ : घाईलासुध्दा थोडा उशीर लागतो!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com