गाव बदलाचा ‘पाडोळी प्रयोग’

धाराशिवमध्ये ‘फॅमिली गाइड’च्या प्रशिक्षणाचा कार्यक्रम संपवून मी आता लातूरकडं निघत होतो.
padole village
padole villagesakal

धाराशिवमध्ये ‘फॅमिली गाइड’च्या प्रशिक्षणाचा कार्यक्रम संपवून मी आता लातूरकडं निघत होतो. तितक्यात ज्येष्ठ पत्रकार आणि माझे मित्र योगेंद्र दोरकर (नाना) आले. चहापान झाल्यावर नाना मला म्हणाले, ‘मी मुंबईवरून माझे मित्र शेषराव रावसाहेब टेकाळे यांनी सुरू केलेला प्रोजेक्ट बघायला आलोय.

त्यांनी त्यांच्या गावी सुरू केलेल्या ‘मागे वळून पाहताना’ या उपक्रमाला भेट देण्यासाठी मी आलोय. मलाही माझ्या गावात तसा उपक्रम सुरू करायचा आहे.’ आम्ही टेकाळे यांचा उपक्रम पाहण्यासाठी निघालो. काही वेळामध्येच लातूर-बार्शी रस्त्यावरील ‘पाडोळी’ गावात आम्ही पोहोचलो. टेकाळे आमची वाटच पाहत होते.

त्या उपक्रमाच्या ठिकाणी खूप प्रसन्न वाटत होतं. लहान मुलांसाठी इंग्रजी शाळा, मुलांना कुस्तीसाठी, शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण वर्ग, तरुणांसाठी स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन सेवा, महिला बचत गटाचं प्रशिक्षण असं सारं काही तिथं सुरू होते. समोर भारतमातेचं मंदिर होतं. टेकाळे म्हणाले, ‘चला, अगोदर भारतमातेचे पूजन करू या. मग तुम्हाला मी प्रकल्प दाखवतो.’ दर्शन घेऊन आम्ही तो प्रकल्प पाहत होतो. ही संकल्पना, हा उपक्रम नेमका काय आहे. हे सारं आम्ही टेकाळे यांच्याकडून समजून घेतलं.

जे गावाशी संबंधित आहेत. ज्यांनी गाव सोडून बाहेर आपल्या मेहनतीमधून साम्राज्य उभं केलंय. त्या गावाशी नाळ असणाऱ्या प्रत्येकाला कुठं ना कुठं वाटत असतं की आपण आता खूप मोठे झालो. आता आपण आपल्या गावासाठी, आपल्या माणसांसाठी, आपल्या मातीसाठी काहीतरी केलं पाहिजे. त्या प्रत्येकासाठी हा प्रोजेक्ट म्हणजे एक उत्तम उदाहरण होतं. तो प्रोजेक्ट पाहण्यासाठी दोरकर नाना यांच्यासारखे अनेक जण आले होते. आम्ही प्रोजेक्ट पाहत होतो.

सूर्यकांत टेकाळे, रमाकांत टेकाळे, जनक टेकाळे, शेषराव टेकाळे, शशिकांत टेकाळे हे पाच भाऊ. या पाच भावांमध्ये जनक आणि शेषराव हे दोघे जण सरकारी नोकरीच्या निमित्ताने बाहेर असायचे. आपल्या गावासह पंचक्रोशीतल्या गावांसाठी आपण पाठीराखा बनून काम करायचं या भावनेतून त्यांनी ‘किसान प्रतिष्ठान’ची स्थापना केली. ‘किसान प्रतिष्ठान’च्या माध्यमातून त्यांनी शहर आणि गावामधली दरी कमी करायचं काम केलं.

कोणाची मदत न घेता पदरमोड करून या कामामधून हजारो शेतकरी आधुनिक शेतीकडं वळवले. युवक गावातून शहराकडं जाण्यासाठी स्वप्न पाहू लागले. सरकारी मानसिकतेमध्ये अडकलेली अनेक कामे तातडीने मार्गी लागू लागली. या प्रकल्पाची १९९७ ला कामाला सुरुवात झाली. पिंपरीला टेकाळे बंधूंच्या आई, केवळाबाईंच्या नावाने जमीन होती. ती जमीन या उपक्रमासाठी कामाला आली. तिथं भारतमातेचं मंदिर उभारलं गेलं. ज्या भारतमातेसमोर प्रत्येक जाती धर्मातला माणूस येऊन हात जोडत नतमस्तक व्हायचा.

तिथं सावित्रीबाई फुले यांच्या नावानं वाचनालय सुरू झालं. आज त्या वाचनालयात चार हजार पुस्तकं आहेत. लोकांसाठी काहीतरी करायचं एवढ्यापुरतं आता काम मर्यादित राहिलेलं नाही, तर इंग्रजी माध्यमाच्या शाळेपासून ते यूपीएससीच्या मार्गदर्शनापर्यंतचा सोयी एकाच ठिकाणी आहेत.

स्वच्छता अभियानामध्ये पाडोळी गाव पहिलं आलं. असे अनेक सुखद धक्के या उपक्रमामध्ये सहभागी झालेल्या अनेक गावांना मिळू लागले. पाहता पाहता पंचक्रोशीत, जिल्हा आणि राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये या उपक्रमाची माहिती पोहोचली. लोक पाहायला येऊ लागले. ‘मी माझ्या गावासाठी मागे वळून पाहिले पाहिजे, मी माझ्या गावातल्या लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे,’ ही मनामध्ये असलेली छोटीशी इच्छा हा प्रयोग जाऊन पाहिल्यावर विशाल रूप धारण करू लागते.

जनक आणि शेषराव या दोन भावांनी मिळून या कामाला प्रचंड गती दिली होती. हे दोघे जण शासकीय अधिकारी होते. आता सेवानिवृत्तीनंतर या दोघांनाही प्रचंड वेळ मिळतो, ज्या वेळेमध्ये त्यांनी तिथल्या कामाला अधिक गती दिली आहे. जनक मला सांगत होते, प्रत्येकाला सतत वाटत असते, आपण आपल्या गावासाठी काहीतरी केलं पाहिजे.

सुरुवात काय करायची आणि सुरुवात केल्यानंतर त्याला गती कशी द्यायची, हा विषय होताच होता. आम्ही सुरुवातही केली आणि त्याला गतीही मिळवून प्रशिक्षणाच्या माध्यमातून शेकडो शेतकरी आणि उद्योगाच्या प्रशिक्षणातून जेव्हा शेकडो युवक कामाला लागले, तेव्हा कळलं की आपलं काम किती मोठं झाले.

शेषराव टेकाळे (९५९४९३५५४६) म्हणाले, ‘आमच्या वडिलांना सामाजिक कामाची आस्था जबरदस्त होती. लोकसेवा करायची तर त्याचा इतिहास झाला पाहिजे, हे ते सातत्यानं सांगायचं. त्यातून मग आम्हाला प्रेरणा मिळाली.’

मी, दोरकर नाना, टेकाळे बंधू, त्यांची आई, आम्ही सगळे जण गप्पा मारत बसलो होतो.

तिथल्या अनेक उपक्रमांमध्ये सहभागी झालेल्या मुलांशी, महिलांशी आम्ही बोलत होतो. ती सगळी जण त्या प्रकल्पाच्या माध्यमातून खूप समृद्ध झाल्याचं जाणवत होतं. बचत गटाच्या महिलांनी तयार केलेल्या स्वयंपाक समोर आला. जेवण झालं. सर्वांचाच निरोप घेऊन निघालो.

आम्ही रस्त्याला लागलो. मी, दोरकर नाना गाडीत चर्चा करत होतो. तुम्हालाही वाटत असेल, आपण आपल्या गावासाठी ‘मागे वळून पाहिले पाहिजे’, पण सुरुवात कशी करायची, हे पाहायला एकदा तुम्हाला पाडोळीला नक्की जावे लागेल. बरोबर ना...!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com