पुनरुज्जीवित सभ्यतेचा प्रवाह

पार्वती, शेरणी या राजस्थानमधील नद्या करौली आणि धौलपूर जिल्ह्यातून वाहतात. पूर्वी या नद्यांचा प्रवाह शुद्ध होता. या नद्या कोरड्या पडल्यावर इथल्या संस्कृतीही सुकून गेल्या.
Rajasthan Criminal
Rajasthan CriminalSakal

- डॉ. राजेद्रसिंह, saptrang@esakal.com

पार्वती, शेरणी या राजस्थानमधील नद्या करौली आणि धौलपूर जिल्ह्यातून वाहतात. पूर्वी या नद्यांचा प्रवाह शुद्ध होता. या नद्या कोरड्या पडल्यावर इथल्या संस्कृतीही सुकून गेल्या. त्या वेळी पाण्याअभावी शेतीही करता येत नव्हती, पाण्याअभावी प्राणिजीवन उद्ध्वस्त होऊ लागलं. असाहाय्य, निरुपयोगी आणि आजारी असल्यानं ते पळू लागले.

या सगळ्यात माणसाचे हाल झाले; पण तो अशा संकटाने मरत नाही, तो बंदूक हाती घेऊन वाट्टेल ते करत राहिला. हा संपूर्ण प्रदेश अन्न, पाणी आणि हवामान बदलाच्या संकटांचा सामना करत होता. या भागात जीवाची सुरक्षा उरली नाही. सुरक्षित जीवन नष्ट झालं होतं. त्यामुळे या नद्यांच्या काठावरील जनजीवन विस्कळीत झालं.

विस्थापित झालेल्या लोकांना त्यांच्या घरी परत आणण्याची प्रक्रिया इथल्या महिलांनी सुरू केली. त्यांनी बंदूकधारी पुरुषांना घरी आणून जलकार्यासाठी प्रेरित केलं. या भागातील भगवतीने हा चमत्कार करून दाखवला. मग लोक स्वतःहून जमू लागले.

भगवतीने शेतात पाण्याचं काम करून पहिल्या पिकात मोहरीची पेरणी केली. तिच्या मिळकतीतून तिने आपला बंदूकधारी नवरा जगदीशसाठी कपडे विकत घेतले आणि नवऱ्याच्या संपूर्ण टोळीला बोलावून त्यांच्यासमोर कपडे सादर केले.

हा जगदीश खूप बंडखोर होता, त्याच्यावर अनेक खटले होते. हे लोक डाकू नव्हते, त्यांनी आपला जीव, उपजीविका आणि संसार वाचवण्यासाठी शस्त्रं उचलली. भगवती नावाच्या त्या महिलेने पती जगदीशला कपडे दिले, तेव्हापासून तिच्या पतीने शस्त्र सोडलं आणि सांगितलं की, ‘बंदुकीचा धिक्कार आहे, त्यामुळे माझ्या पत्नीने मला कपडे आणून दिलेला अपमान मला सहन करावा लागला.

माझं लग्न होऊन १२ वर्षं झाली, आजपर्यंत मी तिच्यासाठी काहीही आणू शकलो नाही. म्हणूनच आता मी अशा शस्त्रांचा वापर करणार नाही, ज्यामुळे माझा अपमान होईल आणि माझं व इतरांचं जीवन दुखावलं जाईल.’

बंदूक सोडल्यानंतर साथीदार म्हणाले की, ‘शस्त्र सोडणं सोपं नाही. सरकार आम्हाला जगू देणार नाही. म्हणूनच शस्त्र सोडू नका.’ त्यावर जगदीशने म्हटलं होतं की, ‘मी आज बंदूक सोडून दिली, तर पुन्हा हात लावणार नाही.’ त्यानंतर पोलिस आणि न्यायालयाने उदार होऊन सांगितलं की, ‘ज्या माणसाला पोलिस १२ वर्षं पकडू शकले नाहीत; त्याने शस्त्रं सोडून पाण्याचं काम केलं आहे, म्हणून त्याला माफ केलं जात आहे.’ तो फक्त १० ते ११ महिने तुरुंगात होता आणि तिथून सुटल्यानंतर त्याने शेती सुरू केली आहे.

त्या दिवसापासून तो आदरणीय, प्रामाणिक आणि निर्भयपणे, आनंदाने जगू लागला. आज जेव्हा आपण त्याच्याशी बोलतो, तेव्हा तो म्हणतो की, ‘आता आयुष्यात फक्त आनंद आहे.’ असे लोक समृद्ध सभ्यतेचे प्रतीक आहेत. त्यांनी बंदुका सोडल्याबरोबर सभ्यता आणि आदर दोन्ही त्यांच्यासाठी परत येऊ लागले.

ही घटना सांगते की, निसर्गाचं पुनरुज्जीवन करून आपलाही पुनर्जन्म होतो. जगातील अनेक देश पाहिल्यावर लक्षात आलं की, नद्या कोरड्या पडल्या की संस्कृतीही कोरडी पडते. जर आपल्याला सभ्यतेचं आनंद आणि समृद्धीमध्ये रूपांतर करायचं असेल, तर निसर्गाचं पुनरुज्जीवन केलं पाहिजे.

स्त्री आणि नदीचं अतूट नातं आहे. महिलांनी पाणीबचतीचं काम सुरू केल्यावर बंदूकधारी पुरुषांनी बंदुका सोडून आपापल्या शेतात पाणी धरून पावसाचं पाणी वाचवण्यास सुरुवात केली. शेतात पाणी राहू लागल्यावर निसर्गाने केवढा आनंद दिला आहे. निसर्ग आणि मानवता प्रेमाने आनंदित होते, प्रेमाने केलेला विश्वास आनंद निर्माण करतो.

आपल्याला माहीत आहे की, एकच सर्वशक्तिमान देव आहे, सर्वोच्च परमेश्वर आहे. पाच महान तत्त्वांच्या संयोगाने निर्माण झालेला भगवंताचा आत्मा हा परमात्मा आहे. हा आत्मा एकमेव सर्वशक्तिमान देव आहे. त्यानंतरचे सर्व भाग अवतार होत राहतात.

हे युगप्रवर्तक असे लोक निसर्गाचा आदर करतात. जसं - भारतातील राम, कृष्ण आदी हे असे अवतार आहेत, जे मानवतेला दुष्काळ आणि पूर यांसारख्या संकटांपासून वाचवतात आणि रावण आणि कंसासारख्या राक्षसी प्रवृत्तींशी लढून त्यांचा नायनाट करतात. सर्वशक्तिमान ज्याला आपण निसर्ग म्हणतो, हे विश्व या शक्तीनेच निर्माण केलं आहे.

जमीन, आकाश, वायू, अग्नी आणि जल ही परमशक्ती आहे, जी देव बनवते. जेव्हा मनुष्य या परमशक्तीच्या रक्षण आणि संरक्षणात गुंततो, तेव्हा त्याला आपण अवतार म्हणतो. या अंतिम घटकांच्या संयोगाने निर्माण झालेल्या अवतारांशीही सभ्यता जोडू लागते. सभ्यता आणि संस्कृती नवीन होऊ लागतात.

महिला आणि नदी यांच्यामध्ये खोलवर नातं आहे. महिलांनी पाण्याच्या कामाची सुरुवात केल्यावर ती नदी झाली, नदी वाहू लागली तेव्हा आकाशाने खराब हवामान सुधारलं, त्यामुळे पृथ्वीची हवा शुद्ध झाली आणि पृथ्वीवर वाहणारी नदी निर्मळ आणि अखंड झाली.

त्यामुळे सर्वत्र अन्न, पाणी, हवा यांची सुरक्षा सुनिश्चित झाली आणि आपापसांत प्रेम, श्रद्धा, भक्ती, निष्ठा आणि भक्ती निर्माण झाली, त्यामुळे या पृथ्वीतलावर पुन्हा एकदा आनंद झाला, हा आनंद चांगला माणूस घडवतो.

आपल्या सर्वांना माहीत आहे की, जगातील सर्व संस्कृती नद्यांच्या काठावर तयार झाल्या आणि स्थायिक झाल्या आहेत. नद्यांचीही धूप होते. संस्कृती नष्ट होण्यापूर्वी शेरणी नदीचं पुनरुज्जीवन झालं. इथला समाज उद्ध्वस्त झाला तेव्हा आधी नदी आटली, मग समाज कोरडा झाला. आता प्रवाह पुनरुज्जीवित झाल्यामुळे तिने आपल्या समाजाचंही पुनरुज्जीवन केलं आहे.

सध्या आपण सभ्यतेच्या गतिमान शर्यतीत, विकासाचा लोभ आणि भौतिक रचना यामध्ये पाणी आणि आपलं आरोग्य यांचा संबंध विसरलो आहोत. जेव्हा निसर्गात मानवतेला टिकवण्याची क्षमता नसते, तेव्हा विनाशाचं युग सुरू होतं.

हे टाळण्यासाठी सभ्यता जिवंत ठेवायची असेल, तर प्रवाहाशी जोडून सभ्यता जपली पाहिजे, हे लक्षात ठेवावं लागेल. जेव्हा जेव्हा नदीचा प्रवाह आटतो, तेव्हा संस्कृती टिकणं शक्य नसतं. म्हणूनच आपण पार्वती-शेरणी नदीपासून शिकलं पाहिजे.

अरवरी नदीपासून शेरणी नदी शिकली होती. अरवरी नदीचा उगम अलवर जिल्ह्यातील थानागाजी तालुक्यातील भावता-काल्याळा, सेवाचा गुवाडा आणि प्रतापगड या गावांमधून होतो. ही नदी आटली, लोक उजाड झाले. मग तरुण भारत संघाने काम सुरू केलं, मग नदीचं पुनरुज्जीवन सुरू झालं.

मनभर, रमा आदी येथील महिलांनी भरभरून साथ दिली. त्यातून तयार झालेल्या आत्मविश्वासाने पुढे काम केलं आणि नदी परिवाराला एकत्र केलं. असे बरेच लोक होते, ज्यांनी त्यांच्या घरी बसून काम केलं आणि अरवरीची सभ्यता पुन्हा जिवंत झाली.

कामाच्या सुरुवातीस इथं तरुण लोक नव्हते, फक्त वृद्ध लोक होते. हे लोक माती, हवा, पाण्याशी संबंधित होते, ज्यांना त्यांच्या सर्वोच्च नैसर्गिक देवाची ओळख होती. हे लोक लवकरच नदीचं पुनरुज्जीवन करण्यात गुंतले. मग हळूहळू तरुणही पुढे येऊ लागले. तसंच सरसा, भगाणी, जहाजवाली नदीतही काम करण्यात आलं. या नद्या वाहू लागल्यावर समाज पुन्हा जागृत झाला आणि पुनरुज्जीवित झाला.

आज त्याचा परिणाम जमिनीच्या आत नद्यांमध्ये दिसून येत आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागावर थोडीशी घट झाली आहे, भूजल पुनर्भरण होण्याऐवजी भूजलाचं शोषण वाढलं आहे. अजूनही पृथ्वीवर कुठंतरी नदीचा प्रवाह दिसतो. नदी तळापासून वाहते, त्यामुळे या भागात अखंड शेती आहे. हे काम राजस्थानमधून सुरू झालं, आता हे काम ठिकठिकाणी सुरू आहे.

महाराष्ट्रातील अग्रणी आणि महाकाली नद्या आजही चांगल्या रीतीने वाहत आहेत. मात्र, त्यामध्ये कृष्णा नदीचं पाणीही येतं, कारण या भागातही भरपूर शेती आहे. महाराष्ट्रात ऊस लागवडीचं प्रमाण जास्त असल्याने भूगर्भातील पाणी खाली जात आहे. तसंच कर्नाटकमधील इच्चनहल्ला नदीचं पुनरुज्जीवन करण्यात आलं आहे.

ज्वारी, तीळ आदी मूलभूत धान्यांचं उत्पादन या भागात होतं, त्यामुळे इथं नदीही वाहत असून धान्याचंही उत्पादन होत आहे. भारत सरकारने आणि संयुक्त राष्ट्रांनी आता मूलभूत धान्यांचं वर्ष घोषित केले आहे, तर भारताची सभ्यता आणि नदीच्या खोऱ्यातली मूलभूत धान्यं शतकानुशतकं तयार केली गेली आहेत.

आज जिथं जिथं आपण नद्या, सभ्यता आणि मानवी आरोग्य यांच्यातील नातं विसरत चाललो आहोत, तिथं तिकडे संस्कृती आणि नद्या कोरड्या पडत चालल्या आहेत. राजस्थानची पार्वती-शेरणी, कर्नाटकची इच्चनहल्ला, महाराष्ट्राची अग्रणी नदी इत्यादींप्रमाणे लोकांनी त्यांची पुन्हा जिथं आठवण काढली, तिथं तिथं संस्कृतीचे प्रवाहही पुनरुज्जीवित होत आहेत.

(लेखक आंतरराष्ट्रीय जल-पर्यावरणतज्ज्ञ अन् मॅगसेसे पुरस्कारविजेते आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com