सामान्य-असामान्य : नेम चुकला; ‘गेम’ हुकला

नुकतीच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती होऊन गेली. सत्य आणि अहिंसेचा संदेश त्यांनी जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवला.
mahatma gandhi
mahatma gandhiSakal

- डॉ. संजय वाटवे

नुकतीच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती होऊन गेली. सत्य आणि अहिंसेचा संदेश त्यांनी जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवला. भारताचं घोषवाक्य ‘सत्यमेव जयते’ असं आहे; पण समाजाकडे नजर टाकली, तर सत्य दुर्बल होऊन कोपऱ्यात थरथरत उभं असल्याचं दिसतं. असत्याच्या सततच्या आणि बेफाम भडिमारामुळे सत्य घाबरलेलं आहे.

सत्याला आता जिंकण्याची उमेदच राहिलेली नाही. एकंदरीतच समाजात सत्याची चाड आणि किंमत कोणाला आहे? सत्य जाणून घेण्याची आणि सत्याची पारख करण्याची क्षमताच समाजात राहिलेली नाही. त्यामुळे एखादा ऐकीव शब्द, बातमी याची शहानिशा न करता ठाम मतं बनविली जातात, त्यामुळे सत्य बाजूला पडतं.

आयुष्यात भावनांचे हिंदोळे, हेलकावे सारखेच येत असतात. त्या लाटेत, क्षणैक कैफात माणूस वाहवत जातो. भावना विचारांवर मात करते. आणि माणूस बेभान बनतो. त्या जोशात आयुष्यातली मोठी घोडचूक करून बसतात. म्हणून भावनांचा कल्लोळ आवरणारी सद्सद्विवेकबुद्धी सततच्या प्रयत्नांनी जोपासली पाहिजे. नाहीतर आयुष्यात बरबादी निश्चित.

अजय देशमुख एक धडपड्या, कष्टाळू तरुण. २०-२२ वर्षापूर्वी माझ्याकडे येत असे. त्याला आयपीएस व्हायचं होतं. स्पर्धा परीक्षेच्या ताणासाठी माझ्याकडे आला. उपचार नीट झाल्यामुळे पहिल्या झटक्यात पास झाला. चांगली पोस्टिंगही मिळाली. त्याचं काम नावाजलं जायला लागलं. मधल्या काळात दोन-तीन केसेस माझ्याकडून बऱ्या करून घेतल्या होत्या; पण स्वतः आला नव्हता.

एवढ्यातच मावशीची केस घेऊन आला होता. त्या निमित्तानी बरंच येणं-जाणं झालं. कडू-गोड अनुभवांची देवाणघेवाण झाली. विचारविनिमय झाले. त्यांची बऱ्याच ठिकाणी पोस्टिंग असल्यामुळे अनुभवांचा मोठा साठा त्यांच्याकडे होता. त्यातली भावड्याची केस मानसशास्राच्या दृष्टीनं महत्त्वाची वाटली. त्यांनी अनुभवलेली! त्यांच्या कैदेत असलेली केस.

देशमुखसाहेब सावरगावला होते तेव्हाची केस आहे. त्यांनी अनुभवलेली केस सांगत होते. भावड्या एका छोट्या गावातला स्वयंघोषित कार्यकर्ता, राजकारणात नाही; पण समाजकारणात अग्रेसर! गोरगरीबांना, अडल्या नडल्यांना, अन्याय झालेल्यांना मदत करण्यात पुढाकार. असे सच्चे कार्यकर्ते आमच्या नजरेत लगेच येतात. त्याची निस्पृहता आम्ही पारखून बघत असतोच. धडपड्या आणि अनेकांना ‘भाऊ’ म्हणून भावड्या. राखीपौर्णिमेला बांधलेल्या राख्यांना दोन हात पुरायचे नाहीत.

भावड्याला सहा-सात मित्र पण होते. अशाच कामात मदत करणारे उत्साही दोस्त. एकदा रात्री उशिरापर्यत एका केसची हाताळणी कशी करायची हे ठरवण्याचं प्लॅनिंग करत बसले होते. गावातल्या पाटलाची पोरं सोट्या पाटील आणि गोट्या पाटील. दोघं मस्तवाल मग्रूर, गावाला त्रास देणारी माजलेली कार्टी. त्यांच्याशी नेहमी संघर्ष व्हायचे. त्यातल्या गोट्या म्हणजे खंडणीबहाद्दर.

गावातल्या सगळ्यांकडून वर्गणी म्हणजे खंडणी घ्यायचा. सोट्या पाटील खंडणीत नव्हता; पण वाईट नजर. पोरीबाळी, बायकांवर शेतमजुरी करण्याऱ्या बायकांवर. कामधंदा नसल्यामुळे दोघे बेलगाम होते.

रात्री उशीर झाल्यामुळे मित्र एकेकाला सोडत सोडत घरी जात होते. एका दोस्ताच्या घरी गेले, तेव्हा त्याची तरुण बहीण वाईट अवस्थेत निपचिप पडली होती. कपडे फाटलेले. अंगावर जखमा. परत सगळे गोळा झाले. तिला शुद्धीवर आणलं. तिनं सोट्या पाटीलचं नाव घेतलं. सगळे पेटले. बेधुंद झाले. आज सोट्याचा गेमच करून टाकायचा. आता ऐकून घेणार नाही.

जमेल तसे लाठ्या, काठ्या, विळा, कोयता घेऊन आठ जण फटफटीवरून निघाले. पाटलांच्या घरात घुसले. शोध शोध शोधलं. पण सोट्या - गोट्या सापडले नाहीत. मग त्यांच्या आईबापांना हाणल्यावर ‘शेतावर बघा. घरात नाहीत’ असं ते म्हणाले. आठही जणांच्या डोळ्यात खून चढला होता.

शेतावर पोचले तेव्हा बाजेवर पाटील पोऱ्या झोपलेला दिसला. बाहेरच झोपलेला असल्यामुळे आणि शेतात वाऱ्यामुळे तोंडावर पांघरुण घेऊन झोपला होता. लगेच सगळ्यांचे बाहू फुरफुरायला लागले. अंधा कानून त्यांच्यावर सवार झाला होता. सर्वांनी मिळून त्याच्यावर सपासप वार केले. त्यांच्या भाषेत ‘तोडून टाकलं आणि न्याय केला.’ आमच्या पोरीबाळींना हात लावतो काय?

रात्र तळमळत काढली. झोप येणंच शक्य नव्हतं. पहाटे सगळेच पुन्हा जमले. नाक्यावरच्या हॉटेलात चहा पीत पीत गावात होणाऱ्या हालचाली न्याहाळत होते. एव्हाना गावात कोलाहल माजलेला होता. एकच तारांबळ उडालेली होती. पोलिसांची गस्त जोरदार चालू होती. सकाळी आठ वाजता अंत्ययात्रा नाक्यासमोर आली, तेव्हा ते दृश्य दिसलं त्यामुळे सगळ्यांना भोवळ आली.

अंत्ययात्रेच्या पुढे सोट्या हातात मडकं धरुन चालत होता. भावनेच्या सुनामीमुळे माणसांचा पशू झाला होता. त्यामुळे सत्याची शहानिशा न करता न्याय करायला गेले. त्या अंध बेभान अवस्थेत तोंडावरचं पांघरुण काढण्याची तसदीसुद्धा घेतली नव्हती. सोट्याऐवजी गोट्याला तोडून ठेवलं होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com