जीवघेण्या स्पर्धा आणि  मुलांचे व्यक्तिमत्त्व

children-competition
children-competition

आजच्या जीवघेण्या स्पर्धेच्या आणि अस्वस्थतेच्या युगात मुलांचा ‘व्यक्तिमत्त्व विकास’ या संज्ञेकडे खूप वेगळ्या अर्थाने पाहायला हवे. व्यक्तिमत्त्व विकास म्हणजे केवळ भौतिक यश, भरपूर पैसा मिळवण्याची क्षमता, नावलौकिक मिळवण्यासाठीची क्षमता निश्‍चितच नव्हे. या गोष्टी महत्त्वाच्या आहेतच, त्याचबरोबर चांगला, जबाबदार नागरिक होणं, समाजाप्रती संवेदनाशील बनणं, कुठल्याही परिस्थितीत शांत, स्वस्थ, आनंदी राहू शकणारं, सकारात्मक आणि कणखर व्यक्तिमत्त्व बनणं हे जास्त महत्त्वाचं. आयुष्यातील चढउतार, यश अपयश सहज स्वीकारता येण्याची क्षमता मिळवणं महत्त्वाचं. असं व्यक्तिमत्त्व विशिष्ट प्रयत्नांनी मिळवता येतं. मनाच्या व्यायामशाळेसाठी (Brain Gym) निर्माण केलेल्या काही व्यायामांनी हे साध्य होऊ शकतं. अगदी कुणालाही. या व्यायामाचं उद्दिष्ट काय असावं? तर दोन दिशांनी व्यक्तिमत्त्व विकसित व्हावं. एक दिशा बाहेरच्या जगात यशस्वी होण्यासाठीची तंत्रे, व्यायाम शिकवणारी (Outer Journey) तर दुसरी आंतरिक स्वस्थतेसाठीची साधना शिकवणारी (Inner Journey), म्हणजेच आतलं विश्‍व शांत, स्वस्थ आणि आनंदी बनवणारी. हे जमलं की मग खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्त्व विकास झाला असं म्हणता येईल.

सुरवात महत्त्वाची - या सगळ्याची सुरवात करावी लागते ती मुलांच्या व्यक्तिमत्त्वामधील, स्वभावामधील, विचार करण्याच्या पद्धतीतील दोष दूर करून. मुलांमधली काल्पनिक भीती, स्वत:विषयीच्या चुकीच्या, नकारात्मक कल्पना, जगाविषयीच्या आणि जगण्याविषयीच्या चुकीच्या कल्पना, व्हिडिओ गेम्स वा मोबाईलच्या अतिरिक्त आहारी जाणं, आसपास घडणाऱ्या, टीव्हीवर दिसणाऱ्या गोंधळून टाकणाऱ्या घटनांचा नकारात्मक प्रभाव अशा सगळ्या गोष्टींचा प्रभाव नाहीसा करावा लागतो. तरच नवीन चांगल्या गुणांची, सवयींची लागवड होऊ शकते. मुलांमध्ये आधीपासूनच असलेल्या चांगल्या गोष्टींची मशागत करून व्यक्तिमत्त्व विकासात त्याचा उपयोग करून घ्यायचा असतो.

व्यक्तिमत्त्व विकासातील  काही महत्त्वाची साध्ये 
मुलांमध्ये रुजवायला हवं, की माझे परीक्षेतले गुण, खेळातील किंवा कुठल्याही बाबतीतील यश-अपयश यापेक्षा माझा शंभर टक्के प्रयत्न करण्यातला आनंद, प्रक्रियेतला आनंद महत्त्वाचा आहे. मी प्रत्येकवेळी पूर्ण झोकून देऊन प्रयत्न करायला हवेत. त्याचं फळ बहुतेक वेळा चांगलंच मिळेल. चुकून अपयश आलंच तर मी दुःख करीत बसण्यापेक्षा आत्मपरीक्षण करेन. निराश न होता पुन्हा सकारात्मक प्रयत्न करेन. हे तत्त्व मी आयुष्यभर पाळेन. ते माझ्या विचारसरणीचा भाग बनून जाईल.

माझं ‘आतलं’ विश्‍व मी कायम शांत, स्वस्थ, आनंदी आणि कणखर ठेवू शकतो. आयुष्यात घडणाऱ्या विपरीत घटना, अपयश हा आयुष्याच्या खेळातला एक भाग आहे. मी ते शांतपणे स्वीकारीन. 

आयुष्य सुंदर आहे. प्रत्येक क्षण चांगल्या पद्धतीने आनंदाने व्यतीत करण्याची, उपभोगण्याची कौशल्ये मला मिळवता येतील. 

मी स्वत: आनंदी राहण्याचा प्रयत्न करेन. तसेच माझ्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आनंद देण्याचा प्रयत्न करेन. मी समाजाचा भाग आहे आणि त्याच्याप्रती माझी काही कर्तव्ये आहेत. मी चांगली मूल्ये जोपासीन व कुठल्याही प्रलोभनांना बळी पडणार नाही. 

 प्रत्येक व्यक्तीला निसर्गाने काही बलस्थाने दिली आहेत. माझ्यातील बलस्थाने मी ओळखीन व त्यांचा उपयोग माझ्या विकासासाठी करेन.

 या जगातील प्रत्येक सजीव व निर्जीव गोष्ट महत्त्वाची आहे. मी आत्मसन्मान ठेवला पाहिजे तसाच इतरांचाही आदर राखला पाहिजे.

दोन्ही दिशांनी (Inner Journey व Outer Journey) करावयाच्या प्रयत्नांमध्ये मध्ये काय येतं? - वरील साध्ये आत रुजवणे. स्वस्थतेची तंत्रे, साक्षीभाव ठेवण्याची तंत्रे, सकारात्मक विचारसरणी स्वभावाचा भाग बनवण्यासाठीचे मनाचे व्यायाम, भावनांचे सबलीकरण, बुद्धिमत्तेचा, कल्पनाशक्तीचा सृजनात्मक वापर, आत्मविश्‍वास, धैर्य, नेतृत्वगुण, संवादकौशल्यं, टाइम मॅनेजमेंट वगैरे गुणांबरोबरच दडपणाखाली काम करण्याची क्षमता विकसित करण्याची तंत्रे, मित्रमैत्रिणी सहकाऱ्यांबरोबर छान संबंध प्रस्थापित करण्याची क्षमता विकसित करणे, नकारात्मक वातावरणातही काम करण्याची क्षमता आणि मुख्य म्हणजे वैयक्तिक आयुष्य व शैक्षणिक, व्यावसायिक आयुष्य वेगवेगळे ठेवण्याची कला (Compartmentalization), यासाठीची तंत्रे शिकून घेणे.

विकसित व्यक्तिमत्त्वाची   
मुले आयुष्यात काय करू शकतात  
 आयुष्यातल्या कुठल्याही प्रसंगाला सकारात्मक पद्धतीने सामोरे जाऊ शकतात.
 ताणतणाव चांगल्या रीतीने हाताळू शकतात.  
 कठीण प्रसंगात न डगमगता योग्य निर्णय घेऊ शकतात. 
 यश डोक्यात जाऊ देत नाहीत वा अपयश आल्यास खचून जात नाहीत. 
नवीन कौशल्ये खूप लवकर आत्मसात करतात.  
संवादकौशल्ये, आत्मविश्‍वास व सकारात्मकतेने छाप पाडू शकतात. 
आपल्या क्षमता शंभर टक्के वापरण्याचा प्रयत्न करणे व त्या प्रक्रियेचा आनंद घेणे त्यांना जमू शकते. 
 केवळ स्वत:पुरता विचार न करता इतर व्यक्तींच्या दृष्टिकोनातून विचार करू शकतात. 
 स्वत:च्या विकासाबरोबरच कुटुंब, समाज यांच्या सृजनाचे भान त्यांना असते.

पालकांची जबाबदारी 
या सगळ्या आवश्यक संकल्पना मनात रुजवण्यासाठी आईवडिलांनीही प्रयत्न करायला हवेत. आपलं मूल भावनात्मकदृष्ट्या सक्षम करण्यात त्यांचे स्वत:चे वर्तन आणि मुलांच्या विकासाला पाठिंबा या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मुलं नैसर्गिकपणे आईवडिलांच्या वागण्यातील गुण टिपत असतात.

मुलांमधील कुठलाही दोष, वैगुण्य, कमतरता याकडे दुर्लक्ष करू नये. मोठा झाला, की आपोआप सगळं ठीक होईल या गैरसमजात राहू नये.

करिअर संबंधातील आपल्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा आकांक्षा, मुलांवर त्यांची इच्छा नसताना लादू नयेत. त्याने मुलांवर दडपण येईल जे विकासाला मारक ठरेल. मुलांची नैसर्गिक क्षमता व इच्छा जे करण्याची असेल त्याला प्रोत्साहन द्यावे.

आपल्या पाल्याची इतर मुलामुलींबरोबर तुलना करणे टाळावे. प्रत्येक मूल वेगवेगळ्या नैसर्गिक क्षमतेचे असते.

समृद्ध व्यक्तिमत्त्वाचे सहा सोपान नेहमी लक्षात ठेवायला हवेत. उत्तम शारीरिक तब्येत, उत्तम मानसिक आरोग्य, नात्यातील व ओळखीच्या व्यक्तींशी तसेच स्वत:शी छान नाते, निसर्गातील प्रत्येक सजीव, निर्जीव, पशुपक्षी वगैरे सर्वांशीच छान नाते, आवश्यक तितका पैसा व भौतिक सुखसोयी (लालसाविरहित), प्रत्येक क्षणी आनंदी राहण्याची कला आणि कुठल्याही परिस्थितीत असलो तरी समाधानी मन:स्थिती या गोष्टी जिच्याजवळ आहेत ती व्यक्ती समृद्ध मानायला हवी. आजच्या मुलांचा व्यक्तिमत्त्व विकास हा भौतिक यशाबरोबरच, मूल्यशिक्षण व आंतरिक स्वस्थता या दोन्ही उद्दिष्टांच्या दिशेने हवा.

डॉ. विद्याधर बापट,  मानस तज्ज्ञ व ताणतणाव नियोजन तज्ज्ञ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com