
ऋचा थत्ते-rucha19feb@gmail.com
कधी मूर्ख... कधी शहाणे! कोण? कमी-अधिक प्रमाणात आणि या ना त्या बाबतीत आपणच. असा विचार मनात येण्याचं कारण असं, की पुन्हा एकदा दासबोधातील मूर्खांची लक्षणं वाचली आणि साहजिकच थोर संस्कृत कवी भर्तृहरींच्या नीतिशतकातील मूर्खपद्धतीही आठवलीच. आपली इच्छा तर असतेच आत्मपरीक्षण करण्याची; पण करायचं कसं? याचं उत्तर या दोन्ही ग्रंथांतील मूर्खांविषयीचं भाष्य वाचताना मिळतं. म्हणजे कधी ‘आपणच शहाणे आहोत’ असं वाटलं, की दासबोध उघडावा आणि ‘मूर्खलक्षण’ समास वाचावा आणि तशीच नीतिशतकातील मूर्खपद्धतीही मार्गदर्शक ठरते. काही लक्षणं आपल्या ठिकाणी दिसू लागली, म्हणजे आपण भानावर येतो आणि हे अधूनमधून करतच राहावं लागतं.