निखळ मनोरंजनाचा मापदंड

‘ऐसा तो आदमी लाइफ मे दोईच टाइम भागता है, ऑलिम्पिक का रेस हो या पुलीस का केस हो.’ चव्वेचाळीस वर्षांनंतर आजही हा संवाद आठवला की एकांतात असलो तरी चेहऱ्यावर हास्याची लकेर उठते.
Amar Akbar Anthony Movie
Amar Akbar Anthony MovieSaptarang

‘ऐसा तो आदमी लाइफ मे दोईच टाइम भागता है, ऑलिम्पिक का रेस हो या पुलीस का केस हो.’ चव्वेचाळीस वर्षांनंतर आजही हा संवाद आठवला की एकांतात असलो तरी चेहऱ्यावर हास्याची लकेर उठते. मन आनंदून जातं. ‘अमर अकबर अँथनी’ या चित्रपटातील अमिताभचे असेच हलके-फुलके आणि कुठलाही अभिनिवेष नसलेले संवाद आठवले, की मूड ताजातवाना होऊन जातो. काहीही सांगून झालं की लगेच ‘ है की नई? ’ असं विचारण्याची एक खास लकब अँथनी सातत्याने वापरतो. तेव्हा अकराव्या वर्गात असलेल्या आमच्या सारख्या ‘हुशार’ विद्यार्थ्यांना हे असले खाद्य चघळायला वेळ भरपूर होता. दांडगी हौसही होती. सगळं कॉलेज एकमेकाला ‘है की नही..’ म्हणत चाललं होतं. ‘अँथनी’ हे मनमोहन देसाई आणि अमिताभ या जोडगोळीचं पडद्यावरील पहिलं अपत्य. एकट्या मुंबईतील पंचवीस सिनेमाघरांत एकाच वेळी रजत महोत्सव साजरा करण्याचा रेकॉर्ड ‘अमर अकबर अँथनी’ ने केला होता. ‘अँग्री यंग मॅन’ अमिताभचं हे रूप त्याच्या प्रस्थापित प्रतिमेच्या विपरीत होत. अमिताभला या चित्रपटात एकदा विनोद खन्ना आणि दुसऱ्यांदा झेबिस्को नावाच्या एका साधारण कलाकाराच्या हातून बेशुद्ध पडेपर्यंत मार खाताना दाखविण्याची हिंमत मनमोहन देसाईंनी केली आणि लोकांनी त्याला देखील दाद दिली. अमिताभ असला की सगळं सहज वाटत असे.

अँथनीनंतर देसाईनी अमिताभशिवाय सिनेमा काढण्याचा कधी विचारही केला नाही. राज कपूरपासून राजेश खन्नापर्यंत अनेक दिग्गजांना दिग्दर्शन करून झाल्यानंतर त्यांच्या स्वप्नातील ताऱ्याचा शोध अमिताभवर येऊन थांबला होता. हिंदी चित्रपटाच्या हिरोची व्याख्या अँथनीने बदलवून टाकली होती. मनोरंजनाचा असा धबधबा हिंदी चित्रपटसृष्टीनं त्यापूर्वी बघितला नव्हता.

योगायोगांची अविश्‍वसनीय मालिका जोडत आणताना, प्रेक्षकांना विचार करण्याची सवड न देता लोकप्रियतेच्या शिखरावर असणाऱ्या तीन हिरोंना घेऊन तीन तासांचा सिनेमा काढणं हे अफाट काम होतं. एका हिंदू धर्मीय माणसाची (प्राण) तीन मुलं अनुक्रमे हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्‍चन अशा तीन वेगवेगळ्या धर्मीयांच्या सहृदयी माणसांच्या हाती पडतात आणि अनुक्रमे अमर, अकबर, अँथनी या नावाने मोठी होतात. तीन हिरो, तीन हिरोईन, चरित्र कलाकार, गाणी, हाणामारीच्या दाटीवाटीत कथा अंग चोरून बसलेली असते. पूर्ण ख्रिश्‍चन वातावरणात वाढलेला अमिताभ किंवा अस्सल मुस्लिम गेटअपमधील ऋषी कपूर यांचा चित्रपटातील धर्म कुठेच आडवा आला नव्हता. कुणाच्या मनाला भिन्नत्वाची भावना स्पर्शून देखील गेली नव्हती. त्यातील सगळी पात्र आजही हृदयात ठाण मांडून बसली आहेत. धर्माच्या बाबतीत मूळच्याच उदार मतवादी असलेल्या सामान्य भारतीयानी ‘ अमर अकबर अँथनी’ तील जगावेगळी धार्मिक सहिष्णुता सहजपणे स्वीकारली होती.

चित्रपटातली गतिमान घटनाक्रमात अमिताभने रंगवलेल्या ‘अँथनी’ने हृदयाचा ठाव घेतला होता. ‘परदा है, परदा है’ या ऋषी कपूरवर चित्रीत कव्वालीतील अँथनीचा गोंधळ, दारूच्या नशेत आरशासमोरील गमतीदार स्वगत, परवीन बाबीसोबतचा रोमांस, बम्बैया हिंदीतील संवादफेक, मुकरी सोबतचे विनोदी प्रसंग सगळं-सगळं लोकांना हवंहवंस झालं होतं. शिवाय ‘माय नेम इज अँथनी गोन्साल्वीस’ या गाण्याचा गमतीदार, आनंददायी अनुभव लहान-थोर, आबालवृद्ध सर्वांना भावला होता. ‘इस्टर डे’ पार्टीच्या वेळी अंडाकृती घरट्यातून एन्ट्री घेणारा ‘टेलकोटेड आणि टॉप हॅटेड’ अँथनी पूर्ण पाश्‍चिमात्य पोशाखात असतो.

हातमोजे, साखळीचे घड्याळ आणि छत्री ही अतिरिक्त आभूषण जोडीला असतात. अशा सुटाबुटातील माणसाने पत्ता काय सांगावा तर ‘रूप नगर, प्रेम गली, खोली नं. ४२०’. एका अर्थाने इंग्रजी शिष्टाचारांविषयी भारतीयांच्या मनात रुजलेल्या न्यूनगंडाची त्याने या गाण्यात टर उडविली होती. अँथनीने आता ज्याला रॅप म्हणतात तो गानप्रकार तेव्हाच आजमावला होता.

अनुक्रमे अमर आणि अकबर बनलेल्या विनोद खन्ना आणि ॠषी कपूर या दोघांनाही चित्रपटात भरपूर फुटेज होतं. ॠषी कपूरला तर तब्बल पाच सुपर हिट गाणी मिळाली होती, पण अमिताभचा अँथनी जणू सिनेमाचा सूत्रधार होता. अॅक्शन, कॉमेडी, रोमान्स सगळं काही लीलया करणारा अमिताभचा अँथनी गोन्साल्वीस निखळ मौज आणि शुद्ध मनोरंजनाचा मापदंड ठरला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com