
आपण या सृष्टीचे पाहुणे आहोत हे कधी कळेल मानवाला? जिथे माणुसकी संपली तिथे अनादराची वागणूक, खोटं बोलणं, अपमान करणे, फसवणूक करणे, छळ करणे, पैशासाठी, धनासाठी नाते संपविणे इत्यादी सुरू होतात. समोरील व्यक्ती माझ्यासोबत चांगले, योग्य वागले पाहिजे ही जशी माझी अपेक्षा असते तसेच समोरची व्यक्ती सुद्धा आपल्याकडून तीच अपेक्षा करतो. हे समजण्याची प्रामाणिक पद्धत म्हणजे माणुसकी.
या पृथ्वीतलावावर सर्वात बुद्धिमान प्राणी म्हणजे मनुष्य प्राणी आहे. त्याने प्रगती करून संपूर्ण पृथ्वी काबीज केली. अवकाशात झेप घेतली. परंतु हे सगळ करीत असताना त्याने माणुसकी मागे ठेवली. स्वतःच्या लोभापायी त्याने जंगले कापली. मुक्त भ्रमण करणाऱ्या प्राण्यांना त्याने पिंजऱ्यात टाकले. जंगले आपल्या ताब्यात घेऊन तो त्यावर टॉवर बांधून राहू लागला. पृथ्वीचे सौंदर्य असलेल्या निसर्गाला मानवाने संपविले. अतिशय बहुमोल असणाऱ्या पाण्याचा सर्रास दुरुपयोग होऊ लागला. काय म्हणावे या माणसाच्या बुद्धीला?
महात्मा गांधी यांच्या मते एखादा देश किती महान आहे किंवा नाही हे ठरवायचे असेल तर तेथील लोक प्राण्यांना कशी वागणूक देतात यावरून ठरवायला हवे. काही दिवसांपूर्वी केरळ मधील अलप्पुरम जिल्हात काही लोकांनी गर्भवती हत्तीणीला फटाक्यांनी भरलेले अननस खाऊ घातले. जे तिच्या तोंडात फुटले आणि तिच्या गर्भात असणाऱ्या पिल्लाचा मृत्यू झाला. फटाक्यांच्या स्फोटांनी हत्तीणीला ज्या वेदना झाल्या त्यामुळे ती तीन दिवस सतत नदीमध्ये उभी होती. शेवटी तिचाही मृत्यू झाला. परंतु हा मृत्यू नसून हत्या आहे. काय म्हणावं या माणुसकीला?
या घटनेवरून वाटतं की माणुसकी ही रक्तातचं असते, अशा वागणुकीला काही जण पशूंची उपमा देऊन मोकळे होतात. हा विरोधाभास त्याहूनही लज्जास्पद आहे. कारण पशूंच्या जगण्यात निसर्गाचे नियम पाळले जातात. पशू आपल्या संरक्षणार्थ आक्रमक होतात. परंतु मनुष्य प्राणी क्रूरता आणि लोभाच्या संपूर्ण मर्यादा ओलांडून माणुसकीच्या स्तरापासून खाली पडला आले. माणुसकी हा चार अक्षरांचा अतिशय साधा, सोपा शब्द आहे. माणुसकीचे बरेच अर्थ असतील. पण माझ्या मते माणुसकी म्हणजे मनुष्याच्या अंगी असलेला सुयोग्य गुण, माणुसकी म्हणजे योग्य वागणूक, माणुसकी म्हणजे संस्कार जे आपल्या कार्यातून, कर्तव्यातून समाजापुढे प्रकट होत असतात.
डॉ. आंबेडकर, संत गाडगे बाबा, मदर टेरेसा, सिंधूताई सपकाळ, बाबा आमटे यांनी खऱ्या अर्थाने आपल्याला माणुसकी शिकवली आहे. आपण कितीही धन कमविले तरी आयुष्यात जिंकलेली मने, मिळविलेलं प्रेम, केलेली मदत मरणानंतर सुद्धा जिवंतच राहते. यालाच माणुसकीचा धर्म म्हणतात. गरजूंना मदतीचा हात द्यावा हीच खरी माणुसकी आहे. हाच खरा माणुसकी धर्म आहे.
- सौ. अरुणा मस्के हिंगणा एमआयडीसी, नागपूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.