

Swami Vivekanandanchi Jeevansutre Book
esakal
बबन गुळवे
लेखक, व्याख्याते, कीर्तनकार रमेश वाघ लिखित ‘स्वामी विवेकानंदांची जीवनसूत्रे’ हे पुस्तक वाचताना वाचकाला एक आगळा-वेगळा आनंद मिळतो. याचं कारण म्हणजे, या वैचारिक पुस्तकातून वाचकाची मानवी जीवनाकडे पाहण्याची सकारात्मक वृत्ती वाढते आणि त्याला वैचारिक ठेवा अनुभवल्याची खात्री पटते. वाघ यांनी या पुस्तकात मानवी जीवन जगताना आपण एखाद्या बालकाप्रमाणे राहावे, आनंदाने जगावे, जीवन दोषमुक्त कसे होईल यावर भर द्यावा याबाबत आपले चिंतन मांडले आहे.
जगातील प्रत्येक ध्येयवेड्या व्यक्तीला यशाकडे घेऊन जाणारा मूलमंत्र लेखकाने अतिशय सोप्या भाषेत व शैलीदार लेखनातून उलगडून सांगितला आहे. या पुस्तकात एकूण २१ प्रकरणे असून, पहिलेच प्रकरण आहे - दुसऱ्यांना दोष देऊ नका. हे प्रकरण वाचनीय आहे. यात बेजबाबदार व्यक्ती कशी ओळखायची? हे सोप्या पद्धतीने सांगताना बेजबाबदार व्यक्तींची सहा लक्षणे लेखकाने ठळकपणे व अचूक शब्दांत मांडली आहेत. याच प्रकरणात लेखकाने स्वतःमध्ये जबाबदार वृत्ती कशी निर्माण करायची? यासाठीची सहा मूलतत्त्वेही दिली आहेत. प्रत्येक माणसाने जबाबदारीने का वागायचे? आणि ते का महत्त्वाचे आहे? हे दहा सूत्रांमधून सांगितले आहे.