

Marginalised Voices In Theatre
esakal
आशुतोष पोतदार - potdar.ashutosh@gmail.com
समग्रतेचा विचार करणारे नाटक मात्र केंद्र आणि परिघावरील व्यक्ती आणि समाजातील वैविध्यपूर्ण नातेसंबंधांचा साकल्याने विचार करत असते. भारतीय रंगभूमीवर असा विचारी अवकाश वेळोवेळी मांडला गेला आहे. जगभरातल्या नाटकाने परिघावरच्या माणसांना व्यक्त होण्यासाठी अवकाश दिला आहे. एकमेकांना सन्मानाने वागवणाऱ्या समाजात सुसंस्कृततेचा सहयोगी आविष्कार करण्याची आणि तो अनुभवण्याची संधी नाटकाद्वारे मिळत असते.
नाटक असा रंगावकाश आहे जिथे एरवी सहज बोलता येत नाही ते बोलता येतं, सहसा दिसत नाही ते दिसतं, आणि ज्यांचे अस्तित्वच नाकारले जाते त्यांना इथे आपली ओळख मिळते. मानवी इतिहासाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर ज्यांना नाकारले गेले किंवा परिघावर ढकलले गेले आहे त्यांना नाटकाने वावर दिला. जगभरातील कष्टकरी माणसं, मनोदुर्बल व्यक्ती, दिव्यांग, दलित, आदिवासी, श्रमिक, स्त्रिया अशा सर्वांसाठी नाटक मनमोकळं बोलण्याची आणि स्वतःचं जग उभं करण्याची जागा बनली आहे. पण हे इतकं सरळ आणि साधं नसतं. कारण, माणसाची ओळख एकच एक नसते. रंग, वय, जात, वर्ग, लिंग, भाषा, धर्म, स्थान, या सगळ्यांच्या छेदनबिंदूवर ओळख तयार होते. मागणीप्रमाणे पुरवठा करणाऱ्या मुख्यधारेतील नाटक प्रामुख्याने बहुसंख्यांकांना, उच्च-मध्यमवर्गीय आणि उच्चजातीय समाजघटकांना तसेच पुरुषी दृष्टिकोनाला प्राधान्य देते. असे नाटक ''उर्वरित'' लोकांना सहसा जमेत धरत नाही, किंवा स्वतःच्या सोयीसाठी त्यांना जागा ''देते''.
समग्रतेचा विचार करणारे नाटक मात्र केंद्र आणि परिघावरील व्यक्ती आणि समाजातील वैविध्यपूर्ण नातेसंबंधांचा साकल्याने विचार करत असते. भारतीय रंगभूमीवर असा विचारी अवकाश वेळोवेळी मांडला गेला आहे. उदाहरणार्थ, भि. शि. शिंदे यांचे काळोखाच्या गर्भात (१९८१) हे दलितांवरील अत्याचाराला तीव्र नाट्यात्म प्रतिक्रिया देणारे नाटक. अशा नाटकांचा रसरशीत आणि जिवंत नाट्यानुभव देणारी ही दलित रंगभूमी महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित आहे. ही रंगभूमी केवळ मनोरंजनपर नव्हती तर जातिव्यवस्थेच्या विरोधात थेट उभी राहणारी होती. व्यवस्थेविरुद्ध उभे राहणारे असे नाटक उभे केले ते अहमदाबादमधील 'बुधन थिएटर' ने ‘डी-नोटीफाईड’ म्हणून गुन्हेगार ठरवलेल्या छारा समाजाचे. विख्यात अभ्यासक डॉ गणेश देवी यांनी स्थापन केलेल्या आणि दक्षिण बजरंगे नेतृत्त्व करत असलेल्या या संस्थेने पोलिस-कोठडीत मारल्या गेलेल्या बुधन साबर या आदिवासी तरुणाच्या कथेवर 'बुधन' हे पहिलं नाटक सादर केलं.