

India China Relations
esakal
श्रीराम कुंटे - kunteshreeram@gmail.com
भारत आणि चीनचे संबंध नेहमीच चीन, अमेरिका आणि रशिया या त्रिकोणाच्या परस्परसंबंधांवर अवलंबून राहिले आहेत. १९८० च्या दशकात भारताला अनेकदा भू -राजकीय एकटेपण आलं होतं, त्याचा इंदिरा आणि राजीव गांधी यांनी त्यांच्या परीने सामना केला. अफगाणिस्तानबद्दल आपले निर्णय अचूक ठरले.
भारतापुढे १९८० च्या दशकात प्रामुख्याने तीन भू-राजनैतिक आव्हानं होती. १९७९ ची इराणमधली क्रांती, कंबोडिया-व्हिएतनाम युद्ध आणि रशियाचं अफगाणिस्तानवर आक्रमण. २५ डिसेंबर १९७९ ला ब्रेझनेव्ह यांनी सोविएत लष्कराची ४०वी तुकडी अफगाणिस्तानात पाठवायचा निर्णय घेतला. यामागे काही भू-राजकीय कारणं होती. १९७८ ला रशियाच्या सीमेवरच्या अफगाणिस्तानातल्या कम्युनिस्ट पक्षाने सत्ता बळकावली. अफगाणिस्तान सेन्टो ही लष्करी संघटना तसंच अमेरिका-चीन युतीपासून मध्य आशियातल्या मुस्लिम बहुसंख्य रशियन प्रांतांचं रक्षण करत होता. १९७९ ला अफगाणिस्तानचा शेजारी इराणमध्ये इस्लामी राज्यक्रांती होऊन खोमेनी सत्तेवर आले. यामुळे पश्चिम आशियात इस्लामी मूलतत्त्ववादी संघटनांना पाठबळ मिळालं. हा इस्लामी मूलतत्त्ववाद मध्य आशियातल्या रशियन प्रांतांमध्ये येण्याची भीती निर्माण झाली. हे होऊ नये म्हणून १९७९ ला तिथे लष्करी हस्तक्षेप करण्यावाचून रशियाकडे पर्याय उरला नाही.
रशियाने अफगाणिस्तानात लष्कर पाठवल्यावर त्याला नमवण्यासाठी अमेरिका, पाकिस्तान आणि चीन एकत्र आले. भारतासाठी हा दीर्घकालीन धोका होता. अफगाणिस्तानमधलं कम्युनिस्ट सरकार प्रगतिशील, निधर्मी आणि लोकशाही असलेला अफगाणिस्तान घडवेल आणि त्याचा आपल्याला फायदा होईल असं भारताला वाटत होतं. शिवाय रशियाकडून मदत घेत असल्याने त्याला दुखावणं भारताला शक्य नव्हतं. या पार्श्वभूमीवर १२ जानेवारी १९८० च्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेत रशियाचा निषेध करणारा प्रस्ताव आला. या प्रस्तावाच्या बाजूने १०४ आणि विरोधी १८ मतं पडली. १८ देश अनुपस्थितीत राहिले. त्यात भारत एक होता. त्या दिवसापासून पाश्चात्त्य आणि इस्लामी देशांनी अफगाण प्रश्नावर भारताला वाळीत टाकलं. भू-राजकारण दुधारी तलवारीसारखं कसं असतं, याचा हा धडा होता.