

India-US Military Agreements COMCASA
esakal
श्रीराम कुंटे- kunteshreeram@gmail.com
अमेरिकेने भारताशी २००६ आणि सप्टेंबर २०१८ मध्ये महत्त्वाचे लष्करी करार केले. २०१७ ला ‘क्वाड’चं पुनरुज्जीवन झालं. ‘क्वाड’ मधला जपान, पूर्व चीन समुद्र, ऑस्ट्रेलिया इंडो-पॅसिफिक, अमेरिका पूर्व पॅसिफिक आणि भारत हिंदी महासागरावर नियंत्रण ठेवू शकतो. त्यामुळे भविष्यात क्वाड चीनची कोंडी करू शकतो. एका पाठोपाठ झालेल्या या घडामोडींमुळे चीन अस्वस्थ होऊ लागला. २०१४ नंतर भारताची तिबेटशी वाढलेली जवळीक, चीनबद्दलची ताठर भूमिका, अमेरिकेशी सुरक्षेबाबत वाढत चाललेले संबंध, क्वाडमध्ये वाढलेला रस आणि ‘बीआरआय’ला विरोध यांतून भारत आपल्याला आव्हान देतोय असं, चीनला वाटू लागलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २६ मे २०१४ रोजी पंतप्रधान म्हणून पहिल्यांदा शपथ घेतली. सर्वसाधारणपणे अशा राजशिष्टाचारी कार्यक्रमांमध्ये फारसं काही वेगळं घडत नसतं. हा शपथविधी मात्र अपवाद होता... कारण त्याला तिबेटच्या निर्वासित सरकारचे पंतप्रधान लोबसांग सांगाय यांनी हजेरी लावली. एवढंच नाही तर मोदींनी शपथविधीनंतर दलाई लामांची जाहीर भेट घेतली. १९५९ पासून भारतातच असलेल्या दलाई लामा आणि तिबेटी जनतेशी भारताचे अतिशय सौहार्दाचे संबंध आहेत. पण तरीही चीनला दुखवायला नको म्हणून भारताने तिबेटशी असलेल्या संबंधांचं असं उघड प्रदर्शन याआधी कधीही केलं नव्हतं.