

Indian food
esakal
एखाद्या कथा-कादंबरीची लेखनप्रक्रिया आणि स्वयंपाक यांत एक समान धागा आहे. अनुभव आणि नेणिवेचा मेळ घालत, कष्टा-सरावानं, प्रसंगी संयमाच्या परीक्षेत उत्तीर्ण होत होतच एकेक कलाकृती तयार होते. लेखकाच्या असो किंवा स्वयंपाक करणाऱ्याच्या... ‘हाताची चव’ महत्त्वाची!
मी तिसरी-चौथीत असल्यापासून एक आठवण माझ्या मनात घट्ट रुतून बसली आहे... शाळेकरता मी डोळे चोळत चोळत उठलो आहे आणि पहाटेच्या अर्ध्यामुर्ध्या अंधार-प्रकाशात नाकात शिरलाय तो आई करत असलेल्या गरमागरम पोळ्यांचा खमंग, स्मोकी गंध. मग त्यापाठोपाठ आलं घातलेल्या चहाचा गोडसर, तिखट सुवास... आमच्या तीनशे स्क्वेअर फुटांच्या ब्लॉकमधल्या लहानशा स्वयंपाकघरात आई एक पोळी लाटतेय, त्याच वेळेस दुसरी भाजतेय आणि कढईतली भाजीही ढवळतेय... तिचं हे मल्टिटास्किंग चालू असताना तिच्या बांगड्यांची मंद किणकिण ऐकू येतीये... आणि मग ऐकू येतोय, दही घुसळताना होणारा रवीचा आवाज किंवा भाज्या चिरताना होणारा सर्र-सर्र किंवा कुर्र-कुर्र आवाज... आमच्या स्वयंपाकघराबाहेरच्या लहानशा जागेत जमिनीवर बाबा बसले आहेत... ते भराभरा भाजी चिरताहेत... किंवा ताक घुसळत आहेत... रवीचा आणि त्यांचा वेग एकलय झालाय... फार क्वचित वेळा मी त्या दोघांना सकाळच्या वेळेस काहीही न करता बसलेलं किंवा लोळत असलेलं पाहिलं आहे.