जीना यहाँ मरना यहाँ...

जीना यहाँ मरना यहाँ, जीना यहाँ मरना यहाँ, इसके सिवा जाना कहाँ, जी चाहे जब हमको आवाज़ दो, हम हैं वहीं हम थे जहाँ... अपने यहीं दोनों जहाँ, इसके सिवा जाना कहाँ... ।।
Actor Raj Kapoor
Actor Raj Kapoorsakal
Summary

जीना यहाँ मरना यहाँ, जीना यहाँ मरना यहाँ, इसके सिवा जाना कहाँ, जी चाहे जब हमको आवाज़ दो, हम हैं वहीं हम थे जहाँ... अपने यहीं दोनों जहाँ, इसके सिवा जाना कहाँ... ।।

- किरण फाटक, Kiranphatak55@gmail.com

जीना यहाँ मरना यहाँ

जीना यहाँ मरना यहाँ, इसके सिवा जाना कहाँ

जी चाहे जब हमको आवाज़ दो, हम हैं वहीं हम थे जहाँ...

अपने यहीं दोनों जहाँ, इसके सिवा जाना कहाँ... ।।

हे गाणं ऐकल्यावर डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहत नाही. या गाण्याला एक कारुण्याची झालर आहे. अत्यंत हृदयस्पर्शी असं सर्कसच्या पार्श्वभूमीवर केलेलं चित्रीकरण, अत्यंत सुंदर आणि हृदयाला हात घालेल अशी चाल आणि शब्द, यामुळे हे गाणं जीवनातील वास्तव सांगण्यात यशस्वी झालं आहे. गाण्यातील अर्थसुद्धा भावस्पर्शी असा आहे.

हे गाणं ‘मेरा नाम जोकर’ या बहुचर्चित चित्रपटातील असून, पडद्यावर राज कपूर यांनी सादर केलं आहे. हा चित्रपट १९७० मध्ये प्रदर्शित झाला. हे गाणं शैलेंद्र यांनी लिहिलेलं असून, शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेलं आहे आणि मुकेश यांनी ते गायलं आहे.

हे गाणं किरवाणी या रागात बांधलेलं आहे आणि पुढल्या कडव्यांमध्ये ‘शुद्ध ग’चा वापर केल्याने याला एक करुण अशी झालर आलेली आहे. किरवाणी हा दक्षिणात्य राग असून तो संगीतकारांचा अत्यंत आवडता असा राग आहे. दक्षिणात्य राग हे सगळेच श्रवणीय आणि मनाची पकड घेणारे असे आहेत. त्यांमध्ये सरस्वती, चारुकेशी, वसंत मुखारी, कलावती, अमृत वर्शिणी... असे अनेक राग येतात.

‘बेकरार दिल तू गाये जा, इक राधा इक मीरा, गीत गाता हूँ मैं, आये ना बालम, मैं प्यार का राही हूँ, मेरा दिल ये पुकारे आजा, मेरी भिगी भीगीसी पलकोमे रह गए, नींद न मुझको आये, याद न जाये बिते दिनोंकी...’ अशी बरीच लोकप्रिय गाणी राग किरवाणीमध्ये संगीतकारांनी संगीतबद्ध केली आहेत.

एकेका कडव्यामधून जीवनाचं उलगडत जाणारं अंतिम सत्य, या गाण्याच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आपल्या जातिवंत अभिनयाने जिवंत केलं आहे, ते जोकरच्या वेशातील राज कपूर यांनी. अत्यंत सुंदर असा कोरस या गाण्याच्या शेवटी शेवटी आपल्याला ऐकायला मिळतो.

जीना यहाँ मरना यहाँ, इसके सिवा जाना कहाँ

जी चाहे जब हमको आवाज़ दो, हम हैं वहीं हम थे जहाँ...

अपने यहीं दोनों जहाँ, इसके सिवा जाना कहाँ...।।

आज ज्ञानेश्वर हे ज्ञानेश्वरीच्या रूपाने जिवंत आहेत, संतश्रेष्ठ रामदास स्वामी हे दासबोधाच्या रूपाने जिवंत आहेत, तर जगद्‍गुरू तुकाराम महाराज हे त्यांच्या गाथेच्या रूपाने जिवंत आहेत. ग्रंथ सामान्य माणसांना जीवन कसं जगावं याचं मार्गदर्शन करीत असतात. ज्ञानेश्वरी वाचणं म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांशी संवाद साधण्यासारखंच आहे. त्याचप्रमाणे दासबोध वाचणं म्हणजे, साक्षात श्री रामदास स्वामींकडून बोध आणि उपदेश घेण्यासारखंच आहे. जीवनाच्या या खेळामध्ये उद्या आपण असू किंवा नसू; पण हा खेळ अव्याहतपणे सुरूच राहणार आहे. सगळं जग जिथल्या तिथे राहणार आहे. चंद्र, सूर्य, तारे आणि नवीन नवीन जन्म घेणारी माणसं, त्यांची सुख-दुःखंही तीच राहणार आहेत. पाऊस पडणार आहे, नद्या वाहणार आहेत, थंडी पडणार आहे आणि उन्हाळासुद्धा होणारच आहे.

अशावेळी कविवर्य भा. रा. तांबे यांची एक कविता आठवल्याशिवाय राहत नाही.

जन पळभर म्हणतील हाय हाय

मी जाता राहील कार्य काय ।।

सूर्य तळपतील चंद्र झळकतील

तारे अपुला क्रम आचरतील

असेच वारे पुढे वाहतील

मी जाता त्यांचे काय जाय ।।

प्रत्येक कलाकाराचं नेहमीच एक स्वप्न असतं. ते म्हणजे, ‘माझ्या कलाकृतीच्या माध्यमातून मी पुढली अनेक वर्षं लोकांच्या मनात आणि हृदयात वास करावा. मला लोकांनी आठवावं.’

या चित्रपटातील जोकरलासुद्धा असंच वाटत असावं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com