

Marathi New Book
esakal
गावकुसाची आठवण करून देणारी ‘मांजरखिंड’ ही मारुती ज्ञानू मांगोरे यांची कादंबरी गाव, वाडी-वस्ती, शिवार, राजकारण, शिक्षण, बेकारी, भ्रष्टाचार अशा विविध अंगांनी वाचकाला भिडत जाते. कोल्हापुरी भाषेचा बाज जसाच्या तसा ठेवून मांगोरे यांनी आपला लेखनपट उलगडला आहे. ग्रामीण बोलीतले संवाद, निवेदनशैली ही वाचकाच्या काळजाचा ठाव घेते.
ही कादंबरी म्हणजे सुखदुःखांशी समरस झालेलं गाव न्हानगं आणि मानेवाडीची कथा आहे. खस्ता खात शिक्षक झालेल्या जोतीरामवर ह्या गावाची धुरा आहे. विंचू दंशावर औषध देणारा दाजीबा त्या औषधाचा थांगपत्ता कुणाला न सांगता मेला हा प्रसंग वाचकाला अंतर्मुख करतो. दुसरीकडे, त्याच्या माघारी त्यांनं दिलेलं औषध चोरून बघणारा मानेवाडीतला सिद्धाप्पा विंचू उतरवत असतो, पण त्याच्याकडे गावातलं कुणी जात नाही. कारण, त्यांची सावली पडली की जखम चिघळती अशी लोकांची अंधश्रद्धा असते, यातून जातिभेद, वर्गसंघर्ष प्रामुख्याने दिसतो.