पुनर्शोध सरस्वतीचा (डॉ. श्रीकांत कार्लेकर)

Article by Shrikant Karlekar in Saptaranga
Article by Shrikant Karlekar in Saptaranga

अतिप्राचीन काळात लुप्त झालेल्या सरस्वती नदीच्या अस्तित्वाचा शोध आता पुन्हा नव्यानं घेतला जाणार आहे. केंद्रीय भूजल मंडळ राजस्थानमध्ये पुन्हा अनेक ठिकाणी खोदकाम करणार असून, लुप्त झालेल्या सरस्वती नदीच्या मार्गाचा शास्त्रशुद्ध नकाशा तयार करणार आहे. 

गेल्या वर्षी हरियानातल्या यमुनानगरमध्ये भूगर्भात असलेल्या पाण्याच्या नदीसदृश प्रवाहाचे काही पुरावे सापडल्यानंतर लुप्त झालेल्या या नदीच्या पुनर्शोधाचा विचार सुरू झाला. अलीकडंच जैसलमेरमध्ये खोदण्यात आलेल्या कूपनलिकांमध्येही हजारो वर्षांपूर्वीचं भूजल मोठ्या प्रमाणावर आढळून आलं आहे. या वाळवंटी भागात पाण्याचा कितीही उपसा केला तरी पाणी कमी होत नाही, असं दिसून आलं आहे.

सन २००२ मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारतर्फे सरस्वती नदीच्या शोधाचा एक प्रकल्प तयार करण्यात आला होता. तो तीन वर्षांत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट होतं; पण दोनच वर्षांत संयुक्‍त पुरोगामी आघाडीचं (यूपीए) सरकार आलं आणि त्या सरकारनं तो प्रकल्प बंद करून टाकला. आता भारताच्या पुरातत्व सर्वेक्षण विभागातर्फे आणि सांस्कृतिक मंत्रालयातर्फे हे काम पुन्हा हाती घेण्यात येत आहे. 

सरस्वती नदीचं अस्तित्व हे संशोधकांसाठी आजही मोठं आव्हान आहे. तिचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी आजवर अनेक देशी आणि विदेशी संशोधकांनी भरपूर प्रयत्न केले आहेत; पण त्यात त्यांना यश आलेलं नाही. ख्रिस्तपूर्व १२०० ते  १५०० वर्षांपूर्वीच्या ऋग्वेदातही सरस्वती नदीचा उल्लेख आढळतो. ‘वायव्य भारतात पूर्वेकडची यमुना आणि पश्‍चिमेकडची सतलज या दोन नद्यांच्या दरम्यान सरस्वती नदी होती,’ असा उल्लेख त्यात दिसतो. ‘वाळवंटात कोरडी पडलेली नदी’ असा महाभारतात तिचा उल्लेख आहे. ही नदी बीन्सना (सध्याचं सिरसार) या गावाजवळ लुप्त झाली असावी आणि पुढं छामासोदभेडा या गावाजवळ पुन्हा दिसू लागली असावी, असाही उल्लेख महाभारतात आढळतो.  

आज भूरूपशास्त्रीय व भूगर्भशास्त्रीय नकाशे आणि कृत्रिम उपग्रहांनी घेतलेल्या प्रतिमांच्या अभ्यासातून असं लक्षात आलं आहे, की  वायव्य भारतातल्या घग्गर-हाकरा नदीमधला कोरडा पडलेला नदीमार्ग म्हणजे प्राचीन सरस्वती नदी असावी! कांस्ययुगात (Bronze  age) म्हणजे ख्रिस्तपूर्व १२०० ते ३३०० या काळात घग्गर-हाकरा नदीखोऱ्यात संपन्न अशी हडप्पासंस्कृती अस्तित्वात होती. आजचं संशोधन असंही सांगतं, की प्राचीन सरस्वती नदीची लांबी १५०० किलोमीटर, रुंदी तीन ते १५ किलोमीटर आणि सरासरी खोली पाच मीटर असावी! एका मतप्रवाहानुसार, ‘चार हजार वर्षांपूर्वी भूप्रक्षोभक (Tectonic ) हालचालींमुळं, नदीला पाणी पुरवणाऱ्या मूळ स्रोतात स्थानबदल झाले असावेत आणि त्यामुळं नदीचा उर्वरित मार्ग भूमिगत झाला असावा. नदीला पाणी पुरवणारा मूळ स्रोत हिमालयातच असावा.’ घग्गर आणि हरियाना, पंजाब, राजस्थान, गुजरातमधल्या तिच्या असंख्य उपनद्या सरस्वती नदीचं अस्तित्व अधोरेखित करतात, असाही दावा केला जातो.  

भारताच्या पुरातत्व सर्वेक्षण विभागातर्फे हरियानातल्या यमुनानगर जिल्ह्यातल्या आदी-बद्रीपासून ते राजस्थानमधल्या कच्छ जिल्ह्यातल्या खिरसरापर्यंतच्या विस्तीर्ण प्रदेशात उत्खनन करण्यात आलं असून, घग्गरच्या प्राचीन प्रवाहाचा (Palaeo channel ) शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सन २००२ ते २००४ आणि सन २००९ ते २०१४ या काळात पुरातत्व विभागातर्फे  हरियानातल्या आदी-बद्री, कुरुक्षेत्र, फतेहबाद, हिस्सार, राजस्थानातल्या गंगानगर, हनुमानगड, करणपुरा आणि गुजरातमधल्या खिरसारा, आणि कच्छ या ठिकाणी स्वतंत्रपणे उत्खनन करण्यात आलं. सरस्वती नदी नक्कीच अस्तित्वात असावी, असं सिद्ध करणारे पुरावे या उत्खननातून आढळून आले आहेत. 

प्रख्यात शास्त्रज्ञ के. एस. वालदिया यांच्या म्हणण्यानुसार, सरस्वतीला पूर्वेकडं आणि पश्‍चिमेकडं अशा दोन उपनद्या असाव्यात आणि ही नदी हरियाना, राजस्थान व उत्तर गुजरातमधून वाहत असावी. जैसलमेरच्या आजूबाजूला संशोधन करताना तिथल्या स्थानिकांकडून कळलं, की रानाऊ या जवळच्या गावात कधीही पाण्याची कमतरता भासत नाही. एवढंच नव्हे तर, तिथं खोदण्यात आलेल्या कूपनलिकेतून नेहमीच गोड पाणी मिळतं. बाकीच्या गावांमध्ये मिळतं तसं खारट पाणी इथं मिळत नाही. इथल्या गावकऱ्यांच्या धारणेनुसार, ‘या गावांखालून सरस्वती नदीच्या पाण्याचा प्रवाह वाहतोय’! रानाऊपासून साधारणपणे २२ किलोमीटर दूर असलेल्या; पण रानाऊच्याच रेषेत असलेल्या घंटियाली आणि टनोट या गावांतही हीच परिस्थिती आहे. 

सरस्वतीचा उगम उत्तराखंडमधल्या बंदरपूंछ या गढवाल-हिमालयातल्या शिवालिक पर्वतरांगांमधल्या हिमनदीतून झाला असावा. ‘ग्राउंड पेनिट्रेटिंग रडार’चा वापर करून घग्गर नदीपात्रातल्या लुप्त प्रवाहाचा मार्ग निश्‍चित करण्याचा प्रयत्नही आता सुरू झाला आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) संशोधनानुसार, ‘सरस्वतीच्या प्राचीन प्रवाहरेषेवरून आज घग्गर नदी वाहते आणि तोच खरा प्राचीन सरस्वती नदीचा मार्ग आहे.’ या नदीच्या आजूबाजूच्या एकूण १४ विहिरींमधल्या पाण्याच्या ‘कार्बन डेटिंग’ पद्धतीनं केलेल्या कालनिर्णयानुसार, हे पाणी आठ हजार ते १४ हजार वर्षं जुनं असावं. इथली पाण्याची प्रतही खूप चांगली आहे. या प्रवाहमार्गाच्या नजीक असलेल्या वनस्पतीही वर्षभर आणि तीव्र उन्हाळ्यातही टिकून राहत असल्याचं आढळून आलं आहे. नदीकाठची गावं गेली ४० वर्षं या विहिरींचं पाणी वापरत आहेत. असं असूनही एकदासुद्धा पाण्याची कमतरता जाणवली नाही, असं गावकरी सांगतात. 

उपग्रह-प्रतिमांचा अभ्यास आणि प्रदेशाला देण्यात आलेल्या प्रत्यक्ष भेटींवरून, या भागातल्या सरस्वती नदीच्या परित्यक्त (Abandoned) प्रवाहाच्या अस्तित्वाचा अंदाज येऊ शकतो. रैनी आणि वहिंदा या नद्या सरस्वती नदीत समाविष्ट होण्यापूर्वीपासूनच अस्तित्वात असाव्यात आणि त्यांनी नदीखोऱ्यात भरपूर गाळसंचयन केलं असावं, असंही या अभ्यासातून सूचित होत आहे. पंजाब, हरियाना आणि उत्तर राजस्थानातून वाहत सरस्वती नदीचा प्रवाह खंबातच्या आखातात समुद्राला जाऊन मिळत असावा. राजस्थानमधे प्रवाह कोरडा होऊन पुढं हनुमानगड, पिलिबंगन, अनुपगडच्या दिशेनं जात असावा. भूशास्त्रज्ञांना या खोऱ्यातल्या प्रचंड गाळसंचयनाबद्दल आणि दरवर्षी १५ सेंटिमीटरपेक्षाही कमी पाऊस पडणाऱ्या थर वाळवंटाच्या पश्‍चिम भागात आढळणारी पाण्याची विपुलता याबद्दल नेहमीच उत्सुकता लागून राहिली आहे. 

सरस्वती नदीचा नेमका मार्ग सापडणं कठीण झाल्यामुळं आणि तिच्या अस्तित्वाबद्दल अजूनही ठोस पुरावे न सापडल्यामुळं ‘सरस्वती नदी ही एक कपोलकल्पित गोष्ट असावी,’ असं अनेकांना अजूनही वाटतं. गेली दोन दशकं या नदीचं अस्तित्व सिद्ध करण्यात गेली आहेत. जोधपूरच्या ‘केंद्रीय रुक्ष प्रदेश संशोधन संस्थे’नं भरपूर आणि नेमकं संशोधन करून ‘सरस्वती नदी अस्तित्वात होती’ असं मत मांडलं आहे. उपग्रह-प्रतिमांच्या अभ्यासातूनही काही गोष्टींचा उलगडा होऊ शकला आहे. नदीमार्गातल्या ‘क्षत्रना’च्या ईशान्येला सरस्वतीचा एक प्रवाह ‘मार्कंडा नदी’ म्हणून वाहत असावा. आजची छाऊतांग नदी आणि तिचा सुरतगडजवळ घग्गर नदीशी होणारा  संगम यावरूनही जुन्या, कोरड्या पडलेल्या प्रवाहाची कल्पना येऊ शकते. उपग्रह-प्रतिमांवरून असाही तर्क करता येतो, की जुन्या घग्गर नदीचे अनुपगडजवळ दोन प्रवाह झाले असावेत. त्यातला एक मारोटजवळ व दुसरा बैरिनाजवळ लुप्त झाला असावा. म्हणजेच प्राचीन नदी इतकी रुंद असावी!    

लुप्त झालेल्या सरस्वती नदीचा नव्यानं घेतला जाणारा पुनर्शोध हा वायव्य भारतातल्या प्राचीन नद्या आणि त्यांच्या काठी बहरलेल्या वस्त्यांचा इतिहास आणि संस्कृती आपल्यासमोर नेमकेपणानं आणण्यासाठी मोलाची कामगिरी बजावणार आहे, यात शंका नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com