
भगवान महादेवाचे भक्त श्रावणाबरोबरच वर्षभर शिवपूजा करत असतात. पूजेसाठी पिंडी कशी असावी, पूजेत कोणते साहित्य वापरावे व कोणते वापरू नये याला आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्व आहे. अनेक भक्तांना तर याविषयी काही माहीत नसते. आपण आज याबद्दल काही महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत.
देवघरातील पिंडी
-घरातील देवघरात महादेवाची पिंडी ठेवावी, मूर्ती नको.
-देवघरातील पिंडीवर नाग नसावा.
-पिंडी साधी दगडी असली तरी चालते, मात्र शक्यतो पितळेची असावी.
-देवघरातील पिंडी तीन इंचांपेक्षा मोठी असू नये, ती तीन इंचांपेक्षा छोटी असावी.
भगवान महादेव हे देवाधिदेव असून हे न्यायप्रिय दैवत आहे आणि त्यांचे सर्व प्रकारचे भक्त आहेत. जसे देव, दानव, यक्ष, किन्नर, भूत, प्रेत, पिशाच, आणि इतरही अनेक योनीजीव महादेवास भजतात. जेथे महादेवाची मूर्ती/चित्र असते तेथे त्यांचे सर्व भक्त उपस्थित होतात.
जोतिर्लिंगांच्या ठिकाणी तथा महादेवाच्या पिंडीला संपूर्ण गोल प्रदक्षिणा करीत नाहीत, तर अर्धी प्रदक्षिणा करून नमस्कार करतात कारण उत्तर दिशेला वरील सर्व भक्त अदृश्य रूपाने उपस्थित असतात, तथा उत्तर दिशेने महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक घातलेले पाणी तीर्थरूपाने वाहत असते, ते ओलांडून गेल्याचे पातक लागते.
महादेवाची मूर्ती फक्त स्मशानात असते, देवघरात महादेवाची मूर्ती नसावी. मानवाला पिंडीपूजन सांगितले आहे म्हणूनच संपूर्ण भारतात महादेवाच्या मुख्य शक्तिपीठांवर महादेवाची पिंडी लिंगरूपाने स्थापन केलेली समजते.
बारा ज्योतिर्लिंगे ही लिंगे म्हणजेच पिंडीरूपाने आहेत, यातून संपूर्ण विश्वाला वैश्विक ऊर्जा मिळते. महादेवाला नित्य शुद्ध पाण्यासह रुद्रसूक्त पठण करीत जलाभिषेक करावा. महादेवाला जल अतिप्रिय आहे. एखाद्याने महादेवास जल अर्पण केल्यास ते त्यावर खूप प्रसन्न होतात. महादेवाला मनापासून मोठ्या संख्येने एकत्र येऊन सामुदायिक जलरुद्राभिषेक केल्यास विपुल पर्जन्यमान राहते.
गुरुचरित्रात म्हटले आहे, की नित्याच्या रुद्राभिषेकाने दीर्घायुष्य, आरोग्य मिळते आणि अकाली मृत्यू टळतो.
श्रीमद्भागवतात म्हटले आहे, की महादेवाची नित्य नियमित रुद्राभिषेकाने सेवा केल्यास घरी अखंड लक्ष्मी वास करते आणि त्या भक्तांच्या घरी अखंड श्रिया राहते आणि सर्व सुखसमृद्धी वाढून सर्वत्र कीर्ती पसरते.
भगवान शंकराविषयी थोडी काळजी बाळगण्याची गरज असते. उत्साहाच्या भरात काही चुकीच्या गोष्टी आपल्या हातून घडत तर नाहीत ना, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
खालील सात वस्तू भगवान शंकराला कधीही अर्पण करू नका. का? तर जाणून घ्या.
१. शंख ः शिवपुराणानुसार भगवान शंकराने शंखचूड नावाच्या असुराचा वध केला होता. तो भगवान विष्णूचा भक्त असल्याने त्याची आणि लक्ष्मीची शंखाने पूजा केली जाते.
२. हळद-कुंकू ः भगवान शंकर आजन्म वैरागी होते. त्यामुळे शृंगाराशी संबंधी कोणतीही वस्तू त्यांना अर्पण केली जात नाही. हळदीलाही सौंदर्यवर्धक मानले जाते. त्यामुळेच हळद किंवा कुंकू भगवान शंकराला अर्पण केले जात नाही. या गोष्टी भगवान विष्णूला अर्पण केल्या जातात.
३. तुळशीपत्र ः असुरांचा राजा जलंधर याच्याविषयी असलेल्या एका कथेनुसार त्याची पत्नी वृंदा तुळशीचे रोपटे बनून गेली होती. भगवान शंकरांनी जलंधराचा वध केला होता. त्यामुळे भगवान शंकराच्या पूजेत तुळशीपत्र न वापरण्याचा पण वृंदाने केला होता.
४. नारळपाणी ः नारळाच्या पाण्याचा भगवान शंकरावर अभिषेक केला जात नाही. नारळाला लक्ष्मीचे रूप मानले जाते. म्हणून शुभकार्यात नारळाचा वापर करून त्याचा प्रसाद म्हणून वापर केला
जातो. पण, भगवान शंकराला अर्पण केलेले पाणी निर्माल्य होते.
५. उकळलेले दूध ः उकळलेले दूध किंवा बाजारात मिळणारे पॅकेटमधील दूध कधीही भगवान शंकराला अर्पण करू नये. त्यापेक्षा गंगाजलाने अभिषेक करा. बाजारात मिळणारे पॅकेटमधील दूधही उकळलेले असते. त्यामुळेच त्याचा वापर करणेही टाळावे.
६. केवड्याचे फूल ः भगवान शिवाच्या पूजेत केवड्याचे फूल वर्जित आहे. शिवपुराणानुसार ब्रह्मदेव आणि विष्णूच्या वादात खोटे बोलल्यामुळे केवड्याला भगवान शंकराने शाप दिला होता.
७. कुंकू किंवा शेंदूर ः कुंकू किंवा शेंदुराचा वापरही भगवान शंकराची पूजा करण्यात वर्ज्य केला आहे.
।।ॐ नमः शिवाय।।
(लेखक ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.