

Pickle memories of Mumbai chawls
esakal
तेलाच्या लालभडक समुद्रात पोहणाऱ्या त्या हिरव्यागार फोडी पिवळसर रंगाच्या चिनी मातीच्या बरण्यांमधून जशा काही हाका मारायला लागायच्या. एकदा तरी बरणीत बोट आत घालून तो द्राव जिभेवर टेकवावा अशी इच्छा अनावर व्हायची; पण फोडींचा मुक्तिदिन कधी आणायचा आहे हे घरातली कर्ती बाईच ठरवणार. तिथे पोरासोरांना वाव कुठला ! आणखी जादा खबरदारी घेण्यासाठी म्हणून बरण्यांच्या तोंडावर सुती कापडाचा दादरा बांधला जायचा.
तू हिरवी कच्ची... तू पोक्त सच्ची
तू खट्टीमिठ्ठी ओठांची... तू तेव्हा तशी...
या कविवर्य आरती प्रभू यांच्या ओळी कानावर पडल्या, की अगदी हिरव्याकंच रंगाच्या, तजेलदार अंगाच्या, करकरीत कैऱ्यांची रास नजरेसमोर तरळल्यासारखी होते माझ्या. मान्य आहे, की इतक्या तरल काव्याची, सुरेल रचनेची, उत्कट गायकीची एवढी ‘ऐशीतैशी’ करण्याचा मला काहीएक अधिकार नाही; पण डोळे द्यायचा तो दगा देतातच. मधली एवढी वर्ष चटकन नजरेआड होतात आणि उन्हाळ्याच्या शेवटाकडचे, घराघरात वर्षभरासाठीचं लोणचं घालण्याचे, आठवणीतूनही तोंडाला पाणी सुटेल असे रसरसलेले दिवस आठवायला लागतात.