

Indian Cinema History
esakal
विद्यार्थ्यांनी रमावे, कृती कराव्यात आणि नावीन्याच्या शोधात घडत जावं, ही शैक्षणिक प्रक्रिया सहजतेने उलगडून दाखवणारे ‘प्रकल्पवाटा - एक प्रभावी शिक्षणपद्धती’ हे पुस्तक आहे. सर्व प्रकल्प अतिशय सहज, सुंदररीत्या मांडल्याने भाषाविषयक शालेय प्रकल्पांचे हे देखणे पुस्तक वाचकांच्या पसंतीस निश्चितच पडेल. शिक्षकांसोबत विद्यार्थी, पालक तसेच मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकासाठीच हे पुस्तक मार्गदर्शन करणारे आणि सुसंवादी झाले आहे.
पावसासंबंधी वर्गप्रकल्प, हा खेळ भावनांचा! (भावना आणि रसविचार यावर आधारित वर्गप्रकल्प), दिवाळी अंकांवर आधारित गटप्रकल्प, कवितांवर आधारित सर्वेक्षण प्रकल्प, शब्दकोश वर्गप्रकल्प, कविता रसग्रहण, ‘काव्यगंधाची रसयात्रा’ या पुस्तकावर आधारित गटप्रकल्प, समाज समजून घेताना... असे मोजकेच भाषाविषयक आठ प्रकल्प सहजतेने उलगडून दाखवले आहेत. लेखिका जयश्री काटीकर यांनी ना कोणाला प्रश्न केला... ना उत्तरांची अपेक्षा केली. मला जे कळले ते तुम्हाला कळावे, मी जे केले ते कसे केले याची माहिती आपल्याला माहीत व्हावी म्हणून प्रकल्पासारखी शास्त्रीय, ललितेतर गोष्ट सहज-सुंदर पद्धतीने आपल्यासमोर मांडली आहे, अशी भूमिका काटीकर यांची आहे. विद्यार्थ्यांचे ज्ञान सतत प्रवाही ठेवून भाषिक समृद्धी वाढवण्याचे काम वर्गप्रकल्पाच्या माध्यमातून कसे झाले, याची माहिती पुस्तकातून मिळते. ‘रसग्रहण’ समजावताना त्यांनी वापरलेले भेळेचे रूपक असो किंवा ‘उपमा’ ही संकल्पना मुलांपर्यंत कशी पोचवायची, यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न असो, पावलापावलावर तो वर्ग, ती मुलं, तो तास आपल्या डोळ्यासमोर जिवंत होतो. वर्गप्रकल्पांचा सविस्तर, रंजक प्रवास सांगताना शेजारी समासात त्यांच्या मनात चाललेलं हितगुज त्यांनी मांडलेलं आहे. ते म्हणजे तर संवेदनशीलतेचं, आत्मपरीक्षणाचं तरल दर्शनच! त्यामुळेच ‘प्रकल्पवाटा’ वाचनीय झाले आहे आणि प्रेरणादायीही!