Rabindranath Tagore Punyatithi : मानवी मुक्तीचे भाष्यकार - रवींद्रनाथ टागोर

रवींद्रनाथांनी आपल्या कथा, कविता, नाटक तसेच तत्वज्ञानातून माणसाच्या मुक्तीचे सूर आवळले
Rabindranath Tagore Death Anniversary
Rabindranath Tagore Death Anniversary esakal

साहित्य तसेच ज्ञानाच्या इतर क्षेत्रातही आपले वेगळे स्थान निर्माण करणारे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर हे सच्चे भारतीय व त्याहीपेक्षा सबंध मानवी कल्याणाचा विचार प्रत्यक्ष जगणारे प्रेमळ, हळवे, तसेच स्पष्ट विचारांचे व्यक्ती होते. रवींद्रनाथांनी आपल्या कथा, कविता, नाटक तसेच तत्वज्ञानातून माणसाच्या मुक्तीचे सूर आवळले. त्यास जातपात, धर्म. प्रांत व देश अश्या कुठल्याही आखीव सिमा न ठेवता व्यापक अर्थाने विश्व मानव अशी आपली ओळख त्यातून निर्माण केली. सत्य, निर्भयता, आणि प्रतिष्ठा यांचा सुरेख त्रिवेणी संगम म्हणजे मुक्ती, असा विचार रवींद्रनाथ आपल्या मांडणीतून अभिव्यक्त केला आहे. आत्म्याची शरीरापासून होणारी फारकत व्यापक अर्थाने त्यांच्या मुक्तीच्या धारणेला स्पष्ट करते.फळाची अपेक्षा न ठेवता सफल व्हायचं आहे हा विचार मुक्तीच्या दिशेने जाणारा आहे याची प्रचिती रविंद्रनाथांना वाचताना आपल्याला येत जाते.

इतर श्रेष्ठ भारतीयांप्रमाणे गुरुदेव टागोर स्वातंत्र्य चळवळीत प्रत्यक्षात सहभागी का नव्हते? या सर्वसामान्यपणे विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचे उत्तर टागोरांच्या मुक्तीच्या व्यापक धारणेत सामावले आहे.याचअर्थी त्यांची Heaven of Freedom ही कविता केवळ राजकीय नव्हे तर शाश्वत स्वातंत्र्याची कल्पना स्पष्ट करते. ‘डाकघर’ या नाटकातील निरागस अमल वा ‘पोस्ट मास्टर’ कथेतील अनाथ रतन हे टागोरांच्या मुक्तीच्या व्यापक संकल्पनेचे अपत्य आहेत याचा प्रत्यय आपणास येत जातो.आत्मप्रगटीकरणाची व्यापकता अनुभवने म्हणजे त्यांचे साहित्य समजून घेणे होय.हा स्वतःला रिलेट करण्याचा नितांत सुंदर अनुभव आपणास येत जातो.

आपल्या साहित्यातून एकीकडे स्वतःची ‘सौंदर्याचे उपासक’ अशी प्रतिमा उभी करणारे टागोर दुसरीकडे मात्र मानवी जीवनातील वेदना, दुःख, छोटे –मोठे आनंदाचे प्रसंग याकडे विशेष लक्ष देतात. याअर्थी उपनिषदीक अतींद्रिय (Metaphysical) हा विचार जरी त्यांना भावत असला तरीही गौतम बुद्धाचे मानवी जीवनातील दुःखाचे, वेदनेचे तत्वज्ञान त्यांना तितकेच महत्वाचे वाटले हे आपल्या लक्षात येते.

माणसाच्या आयुष्यातील वेगवेगळी बंधने झुगारून स्वतंत्रपणे विचार करण्याची क्षमता तसेच प्रतिभा रविंद्रनाथांच्या साहित्य विचारात आपल्याला जागोजागी दृष्टीस पडते. रवींद्रनाथांच्या साहित्यातून, त्यांच्या तत्वज्ञानातून प्रवाहित होणारा मुक्ती विचार त्यांचा उपनिषदाशी असलेला अनुबंध, त्यावरची श्रद्धा आपणासमोर स्पष्ट करतो.ज्याप्रमाणे स्वामी विवेकानंद, श्री अरबिंदो या प्रतिभावंतांनी उपनिषदातील याच मध्यवर्ती विचारास आपली प्रेरणा मानले अगदी त्याचप्रमाणे टागोरांनी स्वातंत्र्य वा मुक्तीचे बहुआयामी स्वरूप सहज पद्धतीने मांडले. ‘होम कमिंग’ या त्यांच्या प्रसिद्ध कथेतील फतिक मुक्तीचे स्वप्न पाहतो. गावापासून, निसर्गापासून दूर आपल्या मामाच्या घरी मोठ्या शहरात शिक्षणासाठी आलेला हा खोडकर परंतू प्रेमळ मुलगा सुरुवातीच्या शहरी आकर्षणानंतर आपल्या मूळांकडे परतण्याची आस बाळगून आहे. मामीच्या कटकटीतून, तिच्या जाचातून तसेच न्यूनतेच्या भावनेतून त्याला मुक्ती हवी आहे. शेवटी अकाली मृत्यूतूनच ही मुक्ती त्याला लाभते.

Rabindranath Tagore Death Anniversary
Rabindranath Tagore : टागोर यांचे स्मृतिशिल्प रत्नागिरीत

जीवन आणि आनंद यातील सेतू याअर्थी त्यांचा मुक्तीचा विचार प्रगट होत जातो. रवींद्रनाथांच्या ‘रक्तकरबी’,’रथयात्रा’ या प्रसिद्ध नाटकांमधून हाच विचार आपलेपणाचे नाते प्रस्थापीत करतो. मुक्ती म्हणजे पळपुटेपणा नव्हे तर जीवन अधिक चैत्यनाने जगण्यासाठी आपल्या सभोवती उभे केलेले जाचक रुढींचे,नियमांचे बंधन झुगारून स्वतःशी मोकळा संवाद साधने होय.स्व:ताच्या खोलवर जाण्याचा, स्व:ताला अधिक निटपणाने समजून घेण्याचा प्रयत्न यात आहे. आजच्या धकाधकीच्या, आत्मलीनतेच्या काळात तर टागोरांचा हा मुक्ती विचार आपल्या जगण्याचे मार्ग अधिक प्रशस्त करणारा आहे. (Rabindranath Tagore)

Rabindranath Tagore Death Anniversary
Rabindranath Tagore : नोबल विजेते पहिले भारतीय; दोन देशांचं लिहिलंय राष्ट्रगीत

सामान्य अनुभवातून, रोजच्या चांगल्या वाईट प्रसंगातून आयुष्याचे मर्म शोधणारी त्यांची पात्रं माणसाच्या अवतीभोवती माणसानेच ऊभी केलेली न्यूनता भेदत स्व:ताला सिद्ध करीत जातात. हे करताना आयुष्याबद्दल घृणा नव्हे तर प्रेम उत्पन्न होत जाणे आपणास रविन्द्र्नाथांची सकारात्मकता, जगण्याशी एकरूप होण्याची अनिवार इच्छा दर्शविणारे आहे. म्हणून तर व्यक्तिगत आयुष्यात अनेक संकटांचा ,कटू अनुभवांचा मुकाबला करूनही त्यांचे जीवनावरील प्रेम तसूभरही कमी होत नाही त्याउलट त्यांच्या साहित्यातून सबंध मानवजातीच्या मुक्तीसाठीची असलेली त्यांची तळमळ अधिक स्पष्ट करीत जाते.

- डॉ. दुर्गेश रवंदे, सहयोगी प्राध्यापक, इंग्रजी विभाग, के. के. एम. महाविद्यालय, मानवत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com