Marathi People
Marathi PeopleSakal

मराठी धमण्यांना चेतवू नका...

कुणी कुठे राहावे, कसे राहावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. प्रत्येकाला त्याच्या मर्जीनुसार राहण्याचा अधिकार आहे.

कुणी कुठे राहावे, कसे राहावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. प्रत्येकाला त्याच्या मर्जीनुसार राहण्याचा अधिकार आहे. घटनेनेच त्याला ते स्वातंत्र्य दिले आहे; मात्र घटनेतल्या तरतुदींना गुजराथी महाभागांच्या लेखी काही विशेष महत्त्व असल्याचे दिसत नाही. काहीही करून हेकेखोरपणाने वागायचे.

उद्दाम बतावण्या करायच्या आणि स्वत:चे राज्य सोडून इतरांच्या दारात पडायचे. वर हुकूमशहा असल्याच्या आवेशात स्वत:चे नियम करायचे, ही दादागिरी आता मराठी माणसाने चालवून घेता कामा नये.

मराठी माणूस सोशीक आहे, साधाभोळा आहे, त्याला धंद्याची अक्कल नाही, तो कुणी वीतभर जागा घेतल्याने खवळून उठत नाही. तसाच तुम्ही त्याच्याच बापजाद्यांच्या जागांवर गगनचुंबी इमारती बांधल्या, तरी तो मान वर काढत नाही. कारण इतरांच्या प्रगतीचे इमले बघून त्याच्या बुडाखाली आग लागत नाही. म्हणूनच ‘मुंबई तुमची आणि भांडी घासा आमची’ म्हणेपर्यंत तुमची मजल जाते.

एवढेच नाही, तर आज मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार करण्याचा प्रयत्न होताना दिसतो. मराठी माणसाने कधी बाहेरून येणाऱ्यांना विरोध केला नाही. उलट प्रत्येकाला आपल्यात सामावून घेतले. त्यामुळे त्याच्या हिश्श्याला वाटेकरी होताहेत, याकडे त्याने दुर्लक्ष केले; पण या प्रेमाचा जर कुणी गैरफायदा घेत असेल, तर त्यांना धडा शिकवायलाही तो मागेपुढे पाहणार नाही. तो आपल्या स्वाभिमानाला जागणारा आहे. शेणातला शेंगदाणा वेचून खाणाऱ्यांनी वेळीच आपली वृत्ती सुधारावी; अन्यथा अस्मितेसाठी पेटून उठायला मराठी माणूस तयार आहेच.

या गुजराथ्यांनी कायम मुंबईवर वाकडी नजर ठेवली. काहीही झाले तरी महाराष्ट्राचे, मुंबई नावाचे वैभव आपल्या हातात यावे, ही सुप्त इच्छा कायम गुजराती माणसांच्या मनात राहिली आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात अनेक बलाढ्य गुजराथी नेत्यांनी मुंबई गुजरातला पळविण्याचा घाट घातला; मात्र कुणालाही त्यात यश आले नाही.

अखेर जेव्हा जेव्हा देशाच्या सत्तेवर गुजराथी वर्चस्व आले तेव्हा तेव्हा मुंबईचा मानाचा फेटा फेडण्याचा प्रयत्न करण्यात आला. कधी मुंबई, महाराष्ट्राचे खच्चीकरण करण्यासाठी इथले उद्योग पळविले जातात, कधी सरकारी कार्यालये अहमदाबादला नेली जातात, तर कधी मराठी माणसाला त्याच्याच हक्काच्या जागेत बेदखल करण्याचा प्रयत्न केला जातो. गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात गुजराथी, मारवाडी व्यापाऱ्यांची संख्या वाढली आहे.

मराठी माणसाने त्याला कधी विशेष विरोधही केला नाही; मात्र ज्या मुंबईच्या बाजारपेठेवर गुजराथी उद्योगांची भरभराट झाली, त्याच गुजराथ्यांच्या आता मराठी माणूस खिजगणतीतही नाही. मराठी माणसाकडे तुच्छतेने पाहिले जाते. भूमिपुत्रांनी त्यांच्याच जागेत नाकारण्याचा उद्दामपणा करणाऱ्यांना ते महाराष्ट्राच्याच भूमीत राहतात आणि इथल्याच बाजारपेठेच्या पैशावर त्यांच्या अंगात मस्ती आली आहे, हे विसरू नये.

मुळात कुणी कुठे राहावे, कसे राहावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. प्रत्येकाला त्याच्या मर्जीनुसार राहण्याचा अधिकार आहे. घटनेनेच त्याला ते स्वातंत्र्य दिले आहे; मात्र घटनेतल्या तरतुदींना या महाभागांच्या लेखी काही विशेष महत्त्व असल्याचे दिसत नाही. काहीही करून हेकेखोरपणाने वागायचे, उद्दाम बतावण्या करायच्या आणि स्वत:चे राज्य सोडून इतरांच्या दारात पडायचे.

वर हुकूमशहा असल्याच्या आवेशात स्वत:चे नियम करायचे, ही दादागिरी आता मराठी माणसाने चालवून घेता कामा नये. मुंबईत दररोज लाखोंच्या संख्येने परप्रांतीय लोंढे येतात. उत्तर प्रदेश, बिहारपासून ते झारखंडपर्यंत कुठल्याही राज्यातले लोक येथे रोजगाराच्या शोधात येतात. या शहरात त्यांना सामावून घेतले जाते. उत्तर प्रदेश, बिहारच्या लोकांनी येथे अनेक उद्योग थाटले आहेत.

दाक्षिणात्यांनी उपाहारगृहांचा व्यवसाय ताब्यातच घेतल्यात जमा आहे. मराठी माणूस मात्र अजूनही धंद्यापासून लांबच आहे. मात्र या इतर लोकांनी कधी मराठी माणसाला सापत्न वागणूक दिल्याची फारशी उदाहरणे नाहीत.

गुजराथ्यांकडून मात्र मराठी माणसाचा वारंवार पाणउतारा केला जातो. त्याला कमी लेखले जाते. त्याची समाजातील खालचा घटक अशी निर्भर्त्सना करायलाही ते मागेपुढे पाहत नाहीत. मराठी माणसाने आतातरी या गोष्टीचा समाचार घ्यायलाच हवा.

शेजारचे राज्य म्हणून गुजराथ्यांकडे महाराष्ट्रातल्या मराठी माणसाने कधीही वाईट नजरेने पाहिले नाही. तुम्ही मराठी माणसाचे पहिले प्रेम असलेली मुंबई हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा मराठी माणूस प्राणपणाने लढला. त्याने मुंबई मिळवली, ती टिकवली आणि वाढवलीसुद्धा; मात्र मुळातच धंद्याचे नियम माहीत नसलेल्या मराठी माणसासोबत दगाफटका झाला. राजकारण्यांच्या बोटचेप्या धोरणामुळे मुंबईतल्या जागा हळूहळू गिळंकृत होत गेल्या.

पैशांच्या राशींपुढे काही मराठी पुढारी विकले गेले. मुंबईतल्या जमिनी मराठी माणसाला टिकवता आल्या नाही. मुळात धंद्याचे गणित माहिती नसणे मराठी माणसाच्या मुळावर आले. काही थोडे, मूठभर मराठी उद्योजक सोडले, तर अंबानी, अदाणींच्या पंगतीला बसू शकतील, असे मराठी उद्योजक आपल्याकडे नाहीत, ही आपली शोकांतिका आहे; पण जे काही थोडे लोक धंद्याचे गणित जाणतात, ते इतर मराठी उद्योजक तयार करण्यासाठी मुळीच धडपडताना दिसत नाहीत.

उलट धंद्यात मराठी माणूस असेल, तर त्याला पाय खेचून पाडण्यात ते धन्यता मानतात. त्यामुळे मराठी माणसाच्या नव्या पिढ्यादेखील फारशा उद्योगधंद्याच्या नादाला लागायचा प्रयत्न करत नाहीत. मराठी माणसाची ही बाजू पडती असली, तरीदेखील केवळ त्यावरून कायम मराठी माणसाला कमी लेखण्याचा प्रयत्न करणे, हे चुकीचे आहे. तिकडे गुजराथी मात्र दुसरा कुणी गुजराथी उद्योजक तयार करण्यासाठी गट करतात. त्याला पैशापासून काम मिळवून देण्यापर्यंत, ते त्याला मदत करतात.

त्याचा एकदा जम बसला, की मग तो त्याच्या उपकारांची परतफेड करतो. पुढे आणखी नवा माणूस तयार करण्याची धडपड करतो. मुंबई महापालिकांच्या कंत्राटांमध्येही या लोकांची रिंग असते. त्यात ते इतर कुणाला शिरकाव करू देत नाहीत. मराठी उद्योजक मात्र आपल्यापेक्षा दुसरा कुणी चांगला तयार होणार नाही, याचीच आधी तजवीज करीत असतो.

तसे पाहिले तर गुजराथी माणसाच्या मनात इतके विषमतेचे विष पेरण्याचा प्रयत्न करतेय तरी कोण आणि कशासाठी, याचादेखील विचार व्हायला हवा. ज्या मातीत विषमतेचे विष अधिक त्या मातीत कधीच लोकशाहीचे बीज अंकुरत नाही, हे सत्य आहे. दोन विशिष्ट प्रांतांमध्ये विषमतेची भावना तयार झाल्यामुळे कुणाचा फायदा होतो, याची जरी जाणीव लोकांना झाली, तरी त्यांना यामागचे गुपित ध्यानात येऊ शकेल.

इतरांपेक्षा आपण श्रेष्ठ आहोत, हे भासवण्याच्या नादात आपण एका चांगल्या राज्याच्या निकोप एकोप्याला नख लावतोय, याचेही भान लोकांना राहत नाही आणि त्यामुळे मग गफलत होऊन बसते. स्पर्धा करण्यात गैर काहीच नाही. स्पर्धा व्हायलाच हव्यात; पण त्या निकोप वातावरणात व्हाव्यात.

स्पर्धेत असूया असता कामा नये. मराठी माणूस हा मुळातच लढवय्या आहे. कुठल्या स्पर्धेला तो घाबरणारा नाही. कुठल्याही प्रकारच्या बौद्धिक युद्धात जिंकण्याची त्याची तयारी असते; मात्र जर कुणाला खेटराचीच भाषा कळत असेल, तर मग मात्र काही पर्याय उरत नाही.

मराठी माणसाला धंद्याची अक्कल नाही, तशीच त्याला स्वत:ची जागाही टिकवता येत नाही. मुंबई, पुण्याच्या सोन्यासारख्या जागा त्यानेच कवडीमोल दराने इतरांना विकल्या आणि आज त्याच जागांवर छोट्या-मोठ्या नोकऱ्या करण्याची वेळ त्याच्यावर आली आहे. तेदेखील त्याने आता स्वीकारले आहे; तरीदेखील काही मराठी माणसे अजूनही काहीतरी वेगळे करण्याच्या प्रयत्नात आहेत.

फक्त त्याचा स्वाभिमान ढवळून काढणाऱ्या अस्मिता वेगळ्या आहेत. त्यांना जर कुणी हात लावण्याचा प्रयत्न केला, तर त्याचे परिणाम या शहराला भोगावे लागतील. धंद्यातले मागासलेपण मराठी माणसाची कमकुवत बाजू असेलही कदाचित; पण म्हणून कुणीही येऊन त्याच्यावर तोंडसुख घेणार असेल, तर ते खपवून घेतले जाणार नाही. कुणाला ही प्रांतीय लढाई वाटत असेलही; पण मराठी माणूस आजवर कधीच प्रांतिक राजकारणात अडकला नाही.

इथे रोज लाखोंचे लोंढे येऊन धडकतात; पण मराठी माणूस त्याला विरोध करीत नाही. आज मुंबई शहराची या वाढत्या लोकसंख्येला सुविधा पुरविण्याची क्षमता अपुरी पडायला लागली आहे; पण तरीही रोज येथे लाखोंचे जथ्थे येऊन धडकतात आणि गर्दीचा भाग होतात. इथला मराठी माणूसही याच गर्दीत हरवलाय. तुम्हाला तो वारंवार दिसतो. तुमच्या जीवनात तो डोकावतो.

तुम्ही भाजी घ्यायला जाता तेव्हा कोथिंबिरीच्या जुडीसोबत स्मीत करीत तुमच्या पिशवीत कढीपत्त्याची पाने टाकतो, तो मराठी माणूस; रेल्वेच्या डब्यात चौथ्या सीटवर तुम्हाला बसायची जागा देणारा असतो, तो मराठी माणूस. त्याला माहिती आहे की तोच या मुंबईचा राजा आहे; मात्र तरीदेखील तो तुम्हाला जागा करून देतो, कारण महाराष्ट्र हे एकमेव असे राज्य आहे, ज्याच्या नावातच राष्ट्र सामावले आहे.

वसुधैव कुटुंबकम्‌ची व्याख्या शिकायची असेल, तर मराठी माणसापेक्षा अधिक चांगली कुणी ती सांगू शकणार नाही. तुम्हाला तुमच्या जाती, धर्माचा, राज्याचा, प्रांताचा अभिमान असायला हरकत नसते; पण तुमच्या मनात इतरांबद्दल असूया असता कामा नये. एखाद्या विशिष्ट समाजाला जागा नाकारणे म्हणजे त्या समाजाच्या, व्यक्तीच्या अस्तित्वाला हात घालण्यासारखे असते.

जेव्हा तुम्ही एखाद्याच्या अस्तित्वालाच हात घालायला जाता तेव्हा त्याच्या अस्मिता जाग्या व्हायला लागतात. साधेपणाने वागणारा मराठी माणूस साधाभोळा आहे, असे समजत असाल तर त्याला पुन्हा एकवार आपल्या इतिहासाच्या पाऊलखुणा उमटवायला लागतील. मग अस्तित्वासाठी वाटेतले काटे काढायचे काम मराठ्यांसारखे इतर कुणीच करू शकत नाही, हे लक्षात असू द्यावे.

rahulgadpale@gmail.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com