सुटी : घरातली, मनातली! (राजीव तांबे)

rajiv tambe
rajiv tambe

सुटी ही एक संधी आहे मुलांना वेगवेगळ्या माध्यमांची ओळख करून देण्याची. त्यांना नवनवीन गोष्टी शिकण्यास प्रवृत्त करण्याची; पण सक्तीनं शिकवण्याची नव्हे. पालकांनी सुटीसाठी एक मंत्र लक्षात ठेवायलाच हवा ः "या सुटीत मुलांना सतत काय कर ते सांगू नका. तू काय करायचं ठरवलं आहेस, त्यासाठी मी काय मदत करू शकतो, असं विचारा आणि मग काय-काय केलंस आणि काय नवीन शिकलास हेही विचारा.'
"घरानं' घराकडून आनंदानं शिकण्यासाठी ही सुटी आहे. घरातल्या नातेसंबंधांचा अधिक उत्कटपणे अनुभव घेण्यासाठी ही सुटी आहे. स्वत:मध्येच "डागडुजी' करण्यासाठी ही सुटी आहे. आपलं मन मोठं करत त्यात "घराला' सामावून घेण्यासाठी ही सुटी आहे.


वर्षभर मुलं आणि पालक "रुटिन' नावाच्या चाकोरीत गरगरत असतात. जो तो आपापल्या व्यापात. दिवसभरात घड्याळाचे दोन काटे जसे एकमेकांना फारच कमी वेळा आणि कमी वेळ भेटतात, तसंच मुलांचं आणि पालकांचं दहा महिने सुरू असतं; पण सुटीची चाहूल लागते तेव्हा पालकांची खरी कसोटी लागते. कारण आता सुटी सुरू होणार म्हणजे एका काट्याची गती मंदावणार आणि दुसऱ्या काट्याची गरगर मात्र तशीच सुरू असणार. म्हणूनच घराचा बॅलन्स सांभाळण्याची ही वेळ खूप महत्वाची असते.

"आता इतक्‍या मोठ्या सुटीत करायचं काय,' असा प्रश्न अनेक पालकांना पडतो. "यांना कुठंतरी बिझी ठेवलं पाहिजे' असंही पालकांना वाटू लागतं. मुलांविषयीच्या अनेक शंका कुशंका त्यांच्या मनात दाटून येतात. उदाहरणार्थ, आता हा उशिरा उठणार, दिवसभर टाइमपास करणार, गादीवर लोळत मोबाइलवर गेम खेळत बसणार, आणि संध्याकाळी सायकली फिरवत बसणार इत्यादी. मात्र, तरीही या सगळ्यापेक्षा पालकांना भीती वाटते ती "मोबाईल' नावाच्या राक्षसाची. काही ठिकाणी अगदी लहानपणीच मुलांना या "राक्षसाची' ओळख "मित्र' म्हणून पालकांनीच करून दिलेली असते. उदाहरणार्थ ः "जेवत नाही तर लाव मोबाईलवर गाणं', "अभ्यास झाला असेल तर आता खेळ मोबाईलवर थोडा वेळ', "रडू नकोस; पण हा घे मोबाईल.' लहान वयातच मुलं सफाईदारपणे मोबाईल वापरू लागतात, तेव्हा पालक त्याचं तोंडभरून कौतुक करतात; पण हा "मित्र' मोबाईल "राक्षस' होऊन डोक्‍यावरच बसतो, तेव्हा मात्र पालक हादरतात.

हादरतात कारण, मुलं मोबाईलवर काय काय पाहतात, हे त्यांना समजत नाही. मोबाइलवर ती कुठले खेळ, किती वेळ खेळतात याचा अंदाज येत नाही. मुलं सतत मोबाईलवरच असतात, हे पालकांना आवडत नाही. यासाठी सुटीत मुलांचा मोबाईल परत घेणे हा त्यावरचा उपाय नव्हे, तर मुलांना योग्य तऱ्हेनं मोबाईल वापरायला शिकविणे हे पालकांकडून अपेक्षित आहे. यासाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक, मुलांवर विश्वास ठेवणं. दोन, आपल्या बोलण्यातून नव्हे, तर आपल्या कृतीतूनच मुलांना शिकवणं.

आपण मुलांवर विश्वास ठेवतो, तेव्हा मुलं बेताल वागण्याचा संभव असतो; पण अशा वेळी न भडकता, न चिडता आणि मुख्य म्हणजे शिक्षा न करता मुलांना चूक सुधारण्याची संधी द्यावी लागते. आता तुम्ही म्हणाल किती वेळा? तर याचं सोपं साधं उत्तर आहे ः "अनेक वेळा!' होय! हे खरं आहे! कारण प्रेमाची अत्युच्च पातळी ही शासन करणं नव्हे, तर माफ करणं आहे. मुलांना वारंवार सुधारण्याची संधी द्यावी लागते. लक्षात घ्या, ज्या क्षणी मुलांना तुमच्या निरपेक्ष प्रेमाची खात्री पटते, त्याच क्षणी मुलं पूर्णत: बदललेली असतात. समजून घ्या, की ही सुटी त्यासाठीच आहे!
मोबाईलच्या वापरासंबंधात एक टिप : प्रत्येकाचे मोबाईल पाहण्याचं म्हणजे "स्क्रीन टाइम'चं वेळापत्रक सर्व घरानं मिळून संमत करू या. जे सर्व घरासाठी असेल आणि सर्वांसाठी बंधनकारकसुद्धा असेल. याबाबत चूक झाली, तर मोकळेपणानं कबूल करू या आणि स्वशासन आणि स्वयंशिस्त याचा अनुभव घेऊ या.
काही वेळा पालकांना असं वाटतं, की "आत्ताच मी काही केलं नाही, तर हा मुलगा सुटीची वाट लावणार.' अशा वेळी पालकांना आपले लहानपणचे सुटीचे "अहाहा दिवस!!' आठवतात. विटी-दांडू, लगोरी, गोट्या खेळणं, नदीत पोहणं, झाडावर चढणं, जांभळं खाणं, डोंगरावर जाणं वगैरे. अनेक पालक मुलांना खिंडीत गाठून त्यांच्या लहानपणीच्या या गोष्टी मुलांना वारंवार सांगत राहतात; पण त्याचा मुलांवर काहीच परिणाम न झाल्यानं मग ते बेचैन होतात.

कृपया तुमचा भूतकाळ एखादवेळेस गोष्ट म्हणून किंवा गंमत म्हणून मुलांना सांगणं ठीक आहे; पण तो सतत उगाळत बसू नका. त्यामुळं मुलं अजिबात प्रेरित तर होत नाहीतच; पण पार कंटाळून जातात. लक्षात ठेवा, मुलांना भूतकाळ नसतो. मुलं वर्तमानात जगतात आणि भविष्याचा वेध घेत असतात. मुलांशी बोलताना भविष्यातल्या नियोजनाविषयी बोला- मग ती तुमचं बोलणं लक्षपूर्वक ऐकतील.
काही पालक मुलांना बिझी करण्यासाठी ते मुलांचा कल लक्षात न घेता किंवा त्याची आवड समजून न घेता त्याला एखाद्या शिबिरात, छंदवर्गात किंवा संस्कार वर्गात अडकवतात आणि सुटकेचा निःश्वास सोडतात. जे पालक मुलांवर विश्वास ठेवायला कचरतात, तेच पालक असा आततायी निर्णय घेऊ शकतात.
आपलं मूल एक स्वतंत्र व्यक्ती आहे. आपल्या मुलाच्या आशा आकांक्षा किंवा त्याच्या आवडी निवडी या आपल्यापेक्षा वेगळ्या असू शकतात हे समजून घेतलं पाहिजे. म्हणूनच आपण कुठलीही कृती करू तेव्हा त्यातून आपल्या मुलाचा आत्मगौरव आपणच राखला पाहिजे आणि त्याचा आत्मसन्मानही जपला पाहिजे. मुलांबाबतचा कुठलाही निर्णय घेताना तो "घरानं' घेतलेला निर्णय असला पाहिजे. तो व्यक्तिकेंद्री नाही, तर "मूल'केंद्री असला पाहिजे. पालकांच्या अपुऱ्या इच्छा पूर्ण करण्याची जवाबदारी मुलांवर नाही किंबहुना ते त्यांचं कामच नाही.

"मला जे लहानपणी मिळालं नाही, ते ते मी माझ्या मुलाला देण्याचा सतत प्रयत्न करत असतो; पण त्याचीच घेण्याची तयारी नाही'- म्हणजेच "आम्ही मुलांसाठी इतकं करतो; पण त्याची त्यांना किंमतच नाही' असं जेव्हा पालकांना वाटू लागतं, तेव्हा त्यांच्या अहंकाराचा फुगा फुगलेला असतो. "आपल्याला जे जे वाटतं ते ते मुलाने करावं' असं पालकांना वाटणं सहाजिकच आहे. यात गैर काहीच नाही; पण या आग्रहाचं दुराग्रहात किंवा हट्टात रूपांतर होता कामा नये. कारण अजूनही अनेक पालक "विंडो 95'मध्येच अडकलेले आहेत; पण त्यांची मुलं मात्र "विंडो 10' मध्ये कधीच पोचली आहेत. ही "डिजिटल जनरेशन गॅप' खूप मोठी आहे. आपल्याच मुलांशी समन्वय साधण्यासाठी पालकांनी स्वत:ला अपडेट आणि अपग्रेड करण्याची गरज आहे. इथं पालकांनी दोन गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. जेव्हा पालकांनी सांगितलेली गोष्ट मुलांना पटत नाही, अशा वेळी पालकांनी मुलाचं म्हणणं समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि तरीही मार्ग निघत नसेल, तर घरातल्या सर्वांनी मिळून त्यातला सुवर्णमध्य शोधला पाहिजे आणि यासाठी मुलांना आपलं म्हणणं निर्भयपणे मांडता येईल असं मैत्रीपूर्ण वातावरण घरात असलं पाहिजे.

सुटी ही एक संधी आहे मुलांना वेगवेगळ्या माध्यमांची ओळख करून देण्याची. त्यांना नवनवीन गोष्टी शिकण्यास प्रवृत्त करण्याची; पण सक्तीनं शिकवण्याची नव्हे. पालकांनी सुटीसाठी एक मंत्र लक्षात ठेवायलाच हवा ः "या सुटीत मुलांना सतत काय कर ते सांगू नका. तू काय करायचं ठरवलं आहेस, त्यासाठी मी काय मदत करू शकतो, असं विचारा आणि मग काय-काय केलंस आणि काय नवीन शिकलास हेही विचारा.' लक्षात घ्या, मुलांना जर तुम्ही सतत हे कर, ते कर, असं कर नी तसं कर असं सांगत राहिलात, तर थोड्याच दिवसांत मुलं आपलं डोकं वापरणं विसरून जातील. शिकतील फक्त आज्ञा पाळणं. कुठलाही प्रश्न समोर आला, तर त्यावेळी ते फक्त तुमच्या आज्ञेची वाट पाहात थांबतील. आजपासून आपण मुलांवर विश्वास टाकायला शिकू या. त्यांना त्यांच्या गतीनं आणि त्यांच्या मतीनं काम करण्याची वारंवार संधी देऊ या. आपण जर मुलांना चुका करण्याची संधी दिली, तरच त्यांना चुकातून शिकण्याची हिंमत मिळते.

ही मोठी सुटी ही "घरानं शिकण्यासाठी' मोठी संधी आहे, असा विचार करू या. या सुटीत मुलांसोबत शिकण्याच्या पद्धती कशा विकसित करता येतील असा विचार करू या. इतर वेळी जो तो आपापल्या पद्धतीनं आणि आपापल्या वेळेनुसार; पण स्वतंत्रपणे शिकतच असतो. मात्र, सुटीत "घरानं मिळून शिकण्याचा' प्लॅन तयार करू या. एकमेकांना "शिकवणं' बंद करून, एकमेकांसोबत "शिकण्याचा' आनंद घेऊ या.
घरानं मिळून शिकण्याच्या प्लॅनमधल्या मी जरी चार गोष्टी तुम्हाला सुचवल्या, तरी त्यापुढच्या शंभर गोष्टी तुम्हाला नक्कीच सुचतील.
- दर रविवारी घरातल्या सर्वांचे मोबाईल सलग चार तास बंदच राहतील. ही वेळ "घरानं' ठरवायची आहे. रविवारी वर्तमानपत्रांसोबतच्या पुरवण्या हा अनमोल खजिनाच असतो. प्रत्येकाच्या आवडीचं त्यात काही ना काही असतंच. या चार तासांत पेपर आणि पुरवण्या वाचणं, पुस्तक वाचणं आणि जे जे वाचलं आहे त्याविषयी "घरानं' एकमेकांशी बोलणं.
- आठवड्यातून किमान दोन वेळा "घरानं' सोबत जेवणं आणि जेवत असताना टीव्ही न पाहणं. यावेळी "टीव्ही बंद' याचा असाही अर्थ आहे, की टीव्हीवच्या कुठल्याही कार्यक्रमाची चर्चाही न करणं.

- आपण सगळेच रोज काही ना काही शिकत असतोच. काही वेळा ती शिकलेली गोष्ट इतकी छोटी असते, की ती आपल्या लक्षातही राहत नाही. "घरासोबत जेवताना' आपण या आठवड्यात कुठल्या नवीन तीन गोष्टी शिकलो? कुठल्या दोन नवीन गोष्टी समजल्या? कुणाकडून शिकलो? कसं शिकलो?... याविषयी मोकळेपणानं गप्पा मारता येतील. लक्षात घ्या, जेव्हा पालक आपलं शिकणं मुलांसमोर उलगडू लागतात, तेव्हा सहाजिकच मुलांची शिकण्याची आस वाढते.
- अनेक घरांत कामाच्या काटेकोर वाटण्या केलेल्या असतात. घरातल्या कुणीच एकमेकांना त्यांच्या-त्यांच्या कामात मदत करायची नाही; पण टीका मात्र करायची. अशा वेळी घराचं घरपण संपू लागतं. या सुटीत आठवड्यातून किमान दोन तास सर्व घरानं हातात हात घालून सर्वांनी सर्वांची कामं करायची आहेत. उदाहरणार्थ, सर्वांनी मिळून भाजी निवडायची आहे. स्वयंपाकघरात किमान अर्धा तास काम करायचंच आहे. कपडे आणि पुस्तके यांची कपाटं आवरण्याचं काम "घरानं' मिळून करायचं आहे. हे घर आपलं आहे आणि या घरातलं कामही आपलंच आहे हा अनुभव "घरानं' मिळून घेताना कामाचे श्रम जाणवत नाहीत, तर नात्यातील गोडवा जाणवतो. सुटी यासाठीच तर आहे ना..?
"घरानं' घराकडून आनंदानं शिकण्यासाठी ही सुटी आहे. घरातल्या नातेसंबंधांचा अधिक उत्कटपणे अनुभव घेण्यासाठी ही सुटी आहे. स्वत:मध्येच "डागडुजी' करण्यासाठी ही सुटी आहे. आपलं मन मोठं करत त्यात "घराला' सामावून घेण्यासाठी ही सुटी आहे. "सुटी लहान थोरांना एकाच पातळीवर आणते. सोबत जगण्याचा आणि नवीन शोधण्याचा एक मंत्र त्यांना देते' ही चिनी म्हण तुम्ही ऐकलीच असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com