होय, मी गुन्हा केलाय म्हणणारे खडसे संपले की संपविले?

Eknath Khadse
Eknath Khadse

पक्षाशी एकनिष्ठ राहणे हा गुन्हा असेल, तर हो तो मी गुन्हा केलाय, या एका वाक्यात गेल्या पाच वर्षांतही खदखद उफाळून समोर येतीय. होय, हे वाक्य आहे भाजपला गेल्या 42 वर्षांपासून महाराष्ट्रात वाढविण्यापासून सत्तेपर्यंत नेण्यापर्यंत नेणाऱ्या एकनाथ खडसे यांचे. भाजपने मंगळवारी 125 उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीत खडसेंना स्थान ने देण्यात आल्याने ही यादी भाजपची आहे की मुख्यमंत्र्यांची असा प्रश्न निर्माण झाला आहे.

उत्तर महाराष्ट्रातील प्रभावी नेते अशी ओळख असलेले एकनाथ खडसे हे अनेक वर्षांपासून मुक्ताईनगर मतदारसंघातून भाजपचे प्रतिनिधित्व करत आहेत. राज्यात भाजपचे अस्तित्व निर्माण करण्यापासून भाजपची व्याप्ती वाढविण्यापर्यंत त्यांचे मोठे योगदान आहे. पण, आता हेच खडसे भाजपसाठी कोणत्याच कामाचे राहिले नाहीत, कारण विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा करताना 125 जणांमध्ये त्यांना स्थान न देण्याबाबत ते दुर्लक्षित झाले आहेत का? 

खडसे हे महाराष्ट्रातील भाजपमध्ये ज्येष्ठतेनुसार सर्वांत पुढे आहेत. गोपीनाथ मुंडे यांचे निधन झाल्यानंतर खडसेंचे नाव सर्वांत ज्येष्ठ नेता म्हणून समोर येतो. पण, भाजपने 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस यांना आपला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा बनून पुढे आणले. तेथेच खडसेंच्या राजकीय कारकिर्दीच्या ऱ्हास होण्यास सुरवात झाली. महसूलमंत्रीपद असलेल्या खडसेंवर सत्तेत आल्यानंतर काही महिन्यांतच विविध आरोप झाले. या आरोपांमुळे त्यांना मिळालेल्या मंत्रिपदावरही पाणी सोडावे लागले. विशेष म्हणजे गेल्या पाच वर्षांत खडसेंवरील आरोपांच्या चौकशीचे काय झाले आणि त्यांना या प्रकरणात खरंच दोष होता का? हे कोणालाही न उलगडलेले कोडे आहे. मात्र, खडसे पक्षाशी प्रमाणिक राहिले आणि त्यांनी पक्षवाढीचे काम आणि प्रचाराचे काम नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही कायम ठेवले. पक्षाशी एकनिष्ठा काय असते, हे शिकण्यासारखे असलेल्या खडसेंबद्दल पक्षाकडून व्यवस्थित कसे दुर्लक्ष होते हेही पाहण्यासारखे आहे.

आयारामांना प्राधान्य
भाजपने आपल्या पहिल्या यादीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेल्या आयारामांना स्थान दिले आहे. शिवेंद्रसिंहराजे भोसले, वैभव पिचड, संदीप नाईक, हर्षवर्धन पाटील, राधाकृष्ण विखे पाटील यासारख्या काही आयारामांना तिकीटे देऊन भाजपसाठी झटणाऱ्या, लढणाऱ्या लढवय्यांना मात्र डावलण्यात आले. भाजपने यादीतून फक्त खडसेंनाच नव्हे तर विनोद तावडे, राज पुरोहित, सरदार तारासिंग या प्रमुख नेत्यांनाही डावलले. पण, पोरींना उचलून आणू अशी भाषा बोलणाऱ्या राम कदम यांना तिकीट द्यायला ते विसरलेले नाहीत. यावरून सध्याच्या भाजपचे सत्ता हे एकमेव केंद्र असल्याचे स्पष्ट दिसते. यात पक्षनिष्ठा, पक्षप्रेम याला काही स्थान नसल्याचे अधोरेखित होते.

खडसेंचा अर्ज दाखल
गेल्या पाच वर्षांपासून माझा गुन्हा काय असे खडसे सातत्याने सत्ताधाऱ्यांना विचारणाऱ्या खडसेंनी उमेदवारी मिळण्यापूर्वीच अर्ज दाखल केला आहे. मी पक्षाशी प्रामाणिक असून, दुसऱ्या यादीत नाव येईल अशी आशा त्यांना आहे. पक्षाशी एकनिष्ठ राहणे गुन्हा असेल तर तो मी केला आहे, असेही ते सांगायला विसरत नाहीत. त्यामुळे मुक्ताईनगरमधून खडसेंना तिकीट देऊन भाजप आपल्या ज्येष्ठ नेत्याचा मान ठेवेल की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

मुख्यमंत्री पदाला धोका पोहचेल अशा सर्वांना रोखण्यात आतापर्यंत फडणवीस यांना यश आलेले आहे. यामध्ये विनोद तावडे, पंकजा मुंडे यांची नावे विशेष करून घ्यावी लागतील. आता यातील खडसे हे नाव गेल्या काही वर्षांपासून गायब झाले आहे. आता त्यांना उमेदवारी नाकारून भाजप उरले सुरले खडसेही संपवितात की काय, हेच पाहावे लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com