सह्याद्रीचा माथा : गुरु-शिष्य परंपरा जपणारा व्हावा शिक्षक दिन

Rural School
Rural School esakal

शिक्षणाबद्दल जेवढंही लिखाण, चिंतन, मनन प्रसिद्ध होतं किंवा जेवढी चर्चा समाजात होते, तेवढी अन्य कुठल्याही विषयाची होत नाही. शहरी असो वा ग्रामीण, प्रत्येक कुटुंबातील मुलं शाळांमध्ये जातात. शाळांचे, शिक्षकांचे, विद्यार्थ्यांचे, पालकांचे, शासनाचे अनेक प्रश्न शिक्षणाशी संबंधित आहेत. सरकारी शाळा, खाजगी शाळा, अनुदानित शाळा, विनाअनुदानीत शाळा, आश्रमशाळा अशा अनेक प्रकारांत शाळांची विभागणी आहे.

पण या सगळ्याचं एकच प्रमुख लक्ष्य आहे आणि असलं पाहिजे ते म्हणजे विद्यार्थी कल्याण. आजचा विद्यार्थी जर देशाचा उद्याचा जबाबदार नागरीक असेल तर त्यात सर्वांत प्रमुख भूमिका ही शिक्षण व्यवस्थेची आहे. गुरु-शिष्याचं अत्यंत भावनिक असं नातं आपल्याकडे पूर्वापार रुढ झालेलं आहे. पण सध्याच्या व्यावसायिकीकरणाच्या नावाखाली शिक्षणाच्या मूळ मूल्य व्यवस्थेला धोका पोहोचत असल्याचं दिसून येतं. यंदाच्या शिक्षक दिनी यावर विचारमंथन व्हायला हवं. (Sahyadricha Matha Dr Rahul Ranalkar saptarang Marathi Article on teachers day nashik news)

शिक्षक हा शिक्षण व्यवस्थेचा केंद्र बिंदू असताना या शिक्षकांकडे मात्र शासन गरजेएवढं लक्ष पुरवत नाही. राज्यभरात शिक्षकांची ३१ हजार पदे रिक्त आहेत. अशैक्षणिक कामांचा मोठा ताण शिक्षकांवर असतो, त्यासाठी शासनाकडून प्रयत्न व्हायला हवेत. शिक्षकांचे प्रश्न आणि शिक्षणासमोरचे प्रश्न यांचा धांडोळा घ्यायचा झाल्यास त्यावर मोठी लेख मालिका किंवा खंडात्मक पुस्तकं होऊ शकतील, एवढी ही प्रश्नांची जंत्री आहे.

तथापि, सध्याच्या उपलब्ध गोष्टींमध्ये विद्यार्थ्यांसाठी अधिक चांगलं काय करता येणं शक्य आहे, यावरही विचार व्हायला हवा. अनेक प्रयोगशील शिक्षक ग्रामीण भागांमध्ये, आदिवासी भागांमध्ये ज्ञान दानाचं उत्तम काम करत आहेत.

त्यांच्या कार्याला सलाम करायला हवा. अगदी महापालिकेतील शिक्षक देखील चांगलं काम करत आहेत. नाशिक महापालिकेतील शिक्षकांनी कोरोना काळात आणि त्यानंतर गरीब कुटुंबातील मुलांसाठी केलेल्या कामाचं मोठं कौतुक होतंय, ही बाब देखील लक्षणीय आहे.

शाळांची किंवा शिक्षण प्रवाहांची दोन प्रमुख गटांमध्ये विभागणी करायची झाल्यास शहरी आणि ग्रामीण तसेच सरकारी आणि खाजगी शाळा अशी करावी लागेल. सध्या अगदी छोट्यातल्या छोट्या गावांमध्ये देखील पालकांचा ओढा हा खाजगी शाळांकडे आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा ओस पडत चालल्या आहेत. पटसंख्या दरवर्षी घसरतेय.

अनेक शाळा दोन शिक्षकी तसेच एक शिक्षकी आहेत. शिक्षकेतर एकही कर्मचारी हजारो शाळांमध्ये नाही. सरकारी शाळांमध्ये आर्थिक विवंचनेत असलेल्या पालकांची मुले प्रामुख्याने आहेत. फी शून्य, गणवेश, दप्तर, शैक्षणिक साहित्य जवळपास मोफत आणि शिवाय खिचडीची सोय आहे. तरी देखील निम्न आर्थिक स्तरात असलेल्या कुटुंबांमधली मुलं या शाळांमध्ये पाठवण्यासाठी पालक तयार नाहीत.

Rural School
पियूची वही, मी आणि माझी आई!

खाजगी शाळांनी ग्रामीण भागात चांगल्या रितीने बस्तान बसविले आहे. आर्थिक गणितही त्यांनी जुळवली आहेत. काही खाजगी शाळा चांगल्या दर्जाच्या देखील आहेत, पण शिक्षकांच्या गुणवत्तेच्या स्तराचा विचार करता सरकारी शाळांमधील शिक्षकांपेक्षा तो नक्कीच कमी आहे.

ज्यांची आर्थिक क्षमता नाही, अशा पालकांमध्ये पिवळ्या व्हॅनची क्रेझ निर्माण झाली आहे. अर्थात आपल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं, हा प्रामाणिक हेतू त्यामागे आहे. पण हे करत असताना शाळांची निवड करण्याची क्षमता या पालकांमध्ये नाही, हे सरकारी शाळांच्या पटसंख्येवरुन स्पष्ट होते.

सध्या आणि भविष्यकाळात मुलांसमोरची आव्हान वेगळ्या स्वरुपाची असणार आहेत. कुणी विचारही केलेला नसेल अशा प्रश्नांना त्यांना सामोरं जावं लागेल. त्यावेळी भारतीय संस्कृतीमधील मूळ प्रेरणा या पिढीला अत्यंत उपयोगी ठरणाऱ्या आहेत. वेळेत शाळेत पोहोचणे, प्रार्थना-परिपाठ नियमित म्हणणे, नीती मूल्यांचे धडे, स्वच्छतेचं महत्त्व, स्वतः स्वयंस्फूर्तीने अशा कामांत सहभागी होणं, स्वावलंबनाचे धडे, सहनशीलतेचं मूल्य रुजवणे अशा अनेक गोष्टींचा संस्कार पूर्वीच्या गुरु-शिष्य परंपरेतून आपोआप मिळत होता.

सध्या कुठेतरी या संस्कारांचा अभाव दिसून येतो. सध्या शाळा देखील फॅशनेबल झाल्या आहेत. इव्हेंटची भूरळ शाळांना पडली आहे. भाड्याने ड्रेस आणून सण साजरे करायचे, स्पर्धा घ्यायच्या. हे एका मर्यादेपर्यंत योग्य असलं तरी देखील बहुतांश ठिकाणी या मर्यादांचं कधीच ओलांडल्या गेल्या आहेत. ग्रामीण भागाचा विचार करता तिथल्या मुलांकडे वेळ असल्यानं सरकारी शाळेतील शिक्षक त्यांच्यावर हे संस्कार करण्यात- त्यांना घडवण्यात बऱ्याच अंशी यशस्वी होत आहेत.

प्रतिकुलतेत जेवढा विकास होतो, तेवढा अनुकूलतेत होत नाही. त्यामुळे मुलांना काहीअंशी प्रतिकूलतेत ठेवणं गरजेचं आहे. मुलांना कन्फर्ट झोन देण्याचा नादात पालक चूक करताना दिसून येतात. गॅजेट्सपासून दूर असलेली ग्रामीण भागातील मूलं भविष्यात उत्तम आणि मोठं कार्य निर्माण करु शकतात, हे सध्याचं वास्तव प्रकर्षानं जाणवतं. मुलांच्या विकासासाठी त्यांच्या कल्याणासाठी गुरु-शिष्य परंपरा टिकवण्यासाठी शहरी भागातील शाळांना आणि शिक्षकांनाही काही मुलभूत बदल त्यामुळेच करावे लागणार आहेत. किंबहुना ती काळाची सर्वांत महत्त्वाची गरज ठरेल.

Rural School
स्मितांकित शोकछाया!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com